भटकंती दक्षिणदेशीची

जानेवारी २०१७ मध्ये थोडी जास्तच भटकंती झाली. सुरूवात वाशी, शांतीवनसारख्या जवळच्या ठिकाणापासून झाली. मग पुढे हैदराबाद, पालाघाट, कोय्यम्बतुर, कोल्हापुर, राधानगरी, दाजीपुर करत मग उलटं वळण घेत कर्नाटकाकडे विजापुर, अलमत्ती, कुडलसंगम, ऐहोळे, पट्टदकल्ल, बदामी करत करत गोकाकमार्गे कोल्हापुरला आणि तिथून घरी परत.

मलाच काय माझ्या कुटुंबात सर्वांनाच भटकंती आवडते. माझी सर्वात आवडती गोष्ट अर्थात काहीतरी बहाण्याने खिडकी पटकावून बाहेरचा निसर्ग डोळाभर न्याहाळणं. कधी कधी खिडकीचाही अडसर वाटू लागतो. निसर्गाचं बदलतं रूप पहायला मजा येते. पालाघाटला तर तेव्हा वसंत बहरला होता. झाडांना आंबे, फणस लटकले होते. बहावा फुलला होता. कोल्हापुरहून दाजीपुरकडे जातांना कोकणात गेल्याचा भास होतो. काही ठिकाणी उन्हाळी भात लावलं होतं. तर कर्नाटककडे सरकतांना डोंगररांगा दिसेनाशा होत मैलोंन गणती शेतं दिसायला लागली. जसंजसं विजापुरकडे जाऊ लागलो सगळं रूक्ष दिसायला लागलं. पुन्हा अलमत्ती, कुडलसंगमकडे जातांना हिरवाई लागली. कुडलसंगमला तर काही ठिकाणी कपाशीची लागवड दिसली. पुन्हा ऐहोळेच्या दिशेने निघाल्यावर ते अंगावर येणारे उभेआडवे दगड दिसायला लागले. बदामीकडून गोकाककडे आल्यावर पुन्हा ओळखीचे डोंगर दुरून दिसू लागले. पिकं, निसर्ग पुन्हा वेगळे दिसू लागले.

भटकंतीत कधी कधी खाण्यापिण्याबाबत समोर काय वाढून येईल याची भीती नाही म्हटलं तरी असतेच. आम्ही तसे जाऊ त्या गांवचे होत तिथले पदार्थ प्रेमाने खातो. बरीच भटकंती दक्षिणेत झाल्याने खाद्यपदार्थ ओळखीचे, सवयीचे, आवडीचे आणि सारखेच होते. पण चवीत प्रत्येक ठिकाणी बदल होत होते. हैदराबादेत तेच पदार्थ अधिक तिखट होते. तिथल्या वेगवेगळ्या चटण्या मात्र फार बहारदार होत्या. डॉ.प्रकासम्मा यांच्या घरी उडदाच्या डाळीचे लाडू खाल्ले नि घरी आल्यासारखंच वाटलं. थेट अस्सेच लाडू सासू आणि मी मधल्या वेळचं खाणं म्हणून करीत असू त्याची आठवण झाली. केरळात तेच पदार्थ सौम्य मसाल्यांमध्ये केलेले होते. तिथे भाज्यांवर भर होता. कर्नाटकातलं सांबार आपल्या डाळीशी साम्य राखून होतं. विजापुरला शेंगा चटणी आणि वरण मिळालं (आणि त्याला ते शेंगा चटणी आणि वरणच म्हणत होते.) बदामीला आमच्या चक्रधारी बंधूंनी मसालाभात घेतला तर तो शेंगदाणे, भाजलेल्या डाळ्या टाकलेला फोडणीचा भात निघाला. कोल्हापुरात पिठल्याचे वेगवेगळे प्रकार तर होतेच पण सर्वत्र पाट्या लावलेल्या होत्या “अख्खा मसुर मिळेल”. काय प्रकार आहे ते पाहिलं तर अख्ख्या मसुराची दबदबीत उसळ होती. छान लागत होती. राहुल कोसंबीच्या घरी बऱ्याच वर्षांनंतर हरभऱ्याच्या पाल्याची भाजी आणि पावटे घातलेली जरा वेगळी फणसाची भाजी खायला मिळाली.

भाषेच्या गंमतीजंमती तर विचारूच नका. कोल्हापुरात राहुलचं “मी गाडी चालवायलोय” किंवा गजानन अपिनेचं थोडं सीमेवरचं “मी वाचलो ते पुस्तक सर” असं कोल्हापुरी ऐकायला मजा आली. स्थानिक भाषा जागतिक (?) भाषेला आपलं वळण देण्याचा कसा  प्रयत्न करते त्याचा हैदराबादेत छान प्रत्यय आला. गोवलकोंडाला जातांना पाटी दिसली –‘बुकिंगा कैंटर’ . पालाघाटला लग्नसमारंभात सगळे सापडा, सापडा करीत खायला खेचून नेत होते. चंदर म्हणे कशासाठी सापडवलं त्यानी तुला. त्याला म्हटलं,”काही नाही. सापडा म्हणजे खायला चल असं म्हणायला कुणीतरी सापडल्याचा आनंद असावा.” पट्टदकल्लला न्याहारीला गेलो. काय़ आहे खायला म्हणून चौकशी केली तर कळलं च्यावच्याव भात. आम्ही मनात म्हटलं कुठल्यातरी चिनी पदार्थाचा कानडी अवतार दिसतोय. तर ताटात काय आलं माहीताय? उप्पीट आणि शिरा. अशी धम्माल. तर अशा अनेक गंमतीजमती सवडीनुसार सांगायच्याच या भटकंतीबद्दल. सध्या एव्हढंच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s