खापरपणजीच्या गोष्टी

मी तर सासरमाहेरच्या जवळपास वीसएक नातवंडाची आजी झाले. नातवंडांना गोष्टीही सांगते त्यांनी आग्रह केला की. मग मला हटकून माझ्या आजीची- आईच्या आईची आठवण येते. वडीलांची आई हयात नव्हती आणि ही आजी आमच्या घरी रहात असे. तेव्हा आम्ही तिच्याकडे गोष्ट सांगायचा हट्ट करीत असू. पण आजी ज्या गोष्टी सांगे त्या पृथ्वीच्या पाठीवरल्या कुठल्या लहान मुलांना कळत असतील किंवा कळल्या तर आवडत असतील असा प्रश्न आज कुणालाही पडू शकेल –अपवाद फक्त बोलक्या शंखोबाच्या गोष्टीचा. कारण आज मुलांना सांगायच्या गोष्टींविषयीच्या कल्पना बदलत चालल्या आहेत. पण त्या गोष्टी आपल्या परीने मनोरंजकच होत्या म्हणायच्या. तर या माझ्या आजीच्या म्हणजे आताच्या लहान मुलांच्यासाठी खापरपणजीच्या गोष्टी.

गोष्ट पहिली

एक बाई नेहमी आपल्या नवऱ्याला सांगे, “तुमी घरात नसलास की माका गमत नाय. अन्नाचो योक कण जात नाय की य़ोक घ्वाट पानी पिवक व्हत नाय.” अन् नवरा तर पडला व्यापारी. त्याला कामानिमित्ताने नेहमीच बाहेर जावं लागे. त्याला आपल्या बायकोचं आपल्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून फार अभिमान वाटे. पण एकदा सहज त्याच्या मनात आलं की बघू या तरी कशी आपली बायको आपण नसतांना उपाशीतापाशी रहाते ते. म्हणून त्याने काय केलं तर बायकोला खोटंच सांगितलं की आज कामासाठी परगावी जायचंय. पण प्रत्यक्षात तो घराबाहेर पडून दूर जाऊन परत माघारी वळला आणि घराच्या मागे बायको दिसेल अशा बेताने लपून राहिला.

इकडे नवरा बाहेर गेल्याची खात्री करून झाल्यावर बायको चांगली पाय पसरून बसली. म्हणाली, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिनं कोपऱ्यात ठेवलेला चांगला रसाने भरलेला ऊस घेतला. चांगला निगुतीने सोलला. मग निवांतपणे बसून खाल्ला. थोड्या वेळाने पुन्हा तिला प्रश्न पडला, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिनं चांगला भलामोठ्ठा नारळ घेतला, तो खवून काढला. त्यात गूळ, वेलची घालून त्याचं सारण केलं. आणि मग घावन काढायला तांदळाचं पीठ भिजवलं, मग एक घावन बीडाच्या तव्यावर टाकला, त्याच्या अर्ध्या भागावर सारण टाकून दुमडला, उरलेल्या भागावर घावनाचं पीठ पसरलं, तो अर्धा भागातला घावन होत आल्यावर त्यावर सारण टाकून तो दुमडला. पुन्हा उरलेल्या अर्ध्या भागावर घावनाचं पीठ पसरलं. त्यावर सारण टाकलं. असं करीत करीत सात कप्प्यांचा भलाथोरला घावन केला. केळीच्या पानावर वाढून घेतला. त्यावर तूप सोडलं. चवीचवीनं सगळा घावन खाल्ला. थोड्या वेळाने पुन्हा तिला प्रश्न पडला, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिने पुन्हा एक नारळ खवला, त्याचं दूध काढलं, पुन्हा गूळ चिरला. तांदूळ धुवून शिजवून त्यात नारळाचं दूध, गूळ घालून खीर केली. या खिरीला कोकणात सोजी म्हणतात. मग शांतपणे वाटीत घेऊन प्यायच्या भानगडीत न पडता पातेल्याला तोंड लावून ती खीर पिऊन टाकली. मग तिचा जीव थंड झाला. मग तिने छानपैकी झोप काढली. इकडे नवरा मधल्या काळात आपली लपण्याची जागा सोडून वळसा घालून बाहेरून आल्यासारखे दाखवीत घरासमोर येऊन दार ठोठावू लागला. बायको लगबगीने उठली. नवऱ्याला समोर पाहून म्हणाली, “बरां झाला लवकर इलास. तुमका म्हायत आसा ना तुमी घरात नसलास का माका गमत नाय. अन्नाचो येक घास जात नाय का पान्याचो येक घ्वाट जात नाय. पण माका येक सांगा तुमचा काम इतक्या लवकर कसा झाला?”  नवरा म्हणाला, “अगो काय सांगू तुका. मी गावाच्या वढ्याजवळ गेलंय नि समोरून येदो मोठ्ठो नाग इलो. केवडो? ह्या कोपऱ्यात तो ऊस होतो का नाय तेवडो मोठ्ठो. तेचो फडो केवडो मोठो म्हायत आसा तुका? अगो आपलो सात काप्याचो घावन असता मा तेवडो मोठो तेचो फडो काय समाजलां?” बायको मनातून घाबरली पण वरवर काळजी दाखवित म्हणाली, “अगे बाय! काय केलास मगे?” “अगो तुजा माज्यावर प्रेम आसा, मी नसलंय तर तू उपाशीतापाशी रंवतस मा, म्हणान् देवानंच माका वाचवल्यान. तो नाग माका बघून असो आपल्या बिळात पळालो, आपली सोजी कशी पोटात जाता लप लप लप लप अगदी तस्सो.” आता मात्र बायको पुरती समजून चुकली आणि पुन्हा तिने नवऱ्याला त्याच्यावर आपले प्रेम असल्याने तो नसतांना आपण काही खातपित नाही अशा थापा मारणं बंद केलं.

आता ही गोष्ट लहानपणी ऐकणाऱ्या मुलग्यांना आपल्या बायकोच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. तिने सांगितलेल्या गोष्टींची तिच्यावर पाळत ठेवून खात्री करून घ्यावी असंच मोठेपणी वाटलं तर त्यात नवल नाही. त्या काळी आपला संसार हेच बाईचं सर्वस्व असे. आणि संसारातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी आपलं मन मारून जगणं किंवा खोटं बोलणं इतकेच पर्याय त्यांच्याकडे असावेत हे कुणाच्या ध्यानी कसं येणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s