
खरं तर कोकण काय आणि केरळ काय तांदळाच्या शेवया दोन्हीकडे केल्या जातात. दोन्हीकडचे तसे बरेच पदार्थ हे तांदूळ, गूळ, नारळ आणि आंबा,फणस,केळी यासारखं तिथे मुबलक उपलब्ध असलेलं साहित्य वापरून केले जातात. त्यामुळे बऱ्याच पदार्थात साधर्म्य आढळतं. कोकणात या तांदळाच्या शेवयांना शिरवळ्या म्हणतात, केरळात इडीअप्पम्. आता मी जी पाककृती देतेय ती आहे खरी श्रीलंकेतली. इडीअप्पम् हे भारताच्या दक्षिणेकडल्या राज्यात आणि श्रीलंकेत, मलेशियात गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वरूपात खाल्ले जातात. ते तांदूळ किंवा नाचणीपासूनही बनविले जातात. तांदळाच्या या शेवया केल्यावर कडला करी म्हणजे चण्याच्या तिखट कालवणासोबत, फणसाच्या कढीसोबत, माशांच्या आमटीसोबत ,भाज्यांच्या स्ट्यूसोबत खाल्ल्या जातात तितक्याच प्रेमाने आपल्याकडे कोकणात खातात तशा नारळाच्या दुधात गूळ घालूनही खाल्ल्या जातात. या इडलीच्या आकारातही केल्या जातात किंवा नुसत्याच केळीच्या पानावर काढून खाल्ल्या जातात. माझी बहीण शुभलक्ष्मी सावंत हिने मला नाचणीच्या शेवयांची एक पाककृति सांगितली होती. या शेवया इडलीपात्रात एक थर देऊन त्यावर मोदकाचं सारण म्हणजे गूळचूणाचा एक थर (गूळ आणि ओलं खोबरं) देऊन त्यावर पुन्हा नाचणीच्या शेवयांचा एक थर द्यायचा. या शेवया तांदळाच्या पीठाच्या शेवयांचा एक थर आणि नाचणीच्या पीठाच्या शेवयांचा एक थर अशा प्रकारे केल्यावर त्याचं पोषणमूल्य तर वाढतंच शिवाय दिसायलाही फार सुंदर दिसतात. श्रीलंकेत या गोड सारण भरलेल्या शेवयांना लवारिया म्हणतात. त्यात गूळखोबऱ्याचं सारण असतं. हाच प्रकार थोड्या वेगळ्या प्रकारे आंबा, केळी किंवा इथे मी फणस वापरलाय तो घालून करता येतो.
तर ही जी पाककृती आहे ती अशी
साहित्य : तांदळाचं पीठ, पाणी (दोन्ही सम प्रमाणात), गूळ चवीनुसार, आवडीनुसार आणि मुख्य म्हणजे पथ्यानुसार कारण त्यात आपण फणसाचा गर घालणार आहोत तोही गोड असतो. तेल, तूप थोडेसे. नारळाचा चव, वेलचीपूड आणि आवडत असल्यास जायफळ पूड, केळीच्या पानाचे लांब तुकडे.
कृती : प्रथम दोन पेले पाण्यात किंचित मीठ आणि एक चमचा तेल, तूप किंवा लोणी घालून ते पाणी उकळवा. उकळ आल्यावर दोन पेले तांदूळाचे पीठ हळूहळू घालून ते कलथ्याच्या (उलथन्याच्या) टोकाने ढवळा. पाच मिनिटे झाकून ठेवून मग साधारण गरम असतांना हाताला तेल लावून नीट मळून त्याचे लांबट गोळे करून घ्या. दुसरीकडे गूळ, नारळाचा चव आणि फणसाचा गर यांचं एकत्रित मिश्रण चुलीवर ढवळून थोडंसं कोरडं करून घ्या, फार कोरडं नको. त्यात वेलचीपूड, जायफळ पूड घालून ढवळून घ्या आणि थंड करीत ठेवा. मग पीठाचे उकड काढलेले लांबट गोळे चकलीच्या सोऱ्यात शेवेची मध्यम आकाराची चकती घालून (किंवा घरात शेवगा – शेवया करायचा साचा -असल्यास त्यातून काढून ) फिरवून केळीच्या पानाच्या लांबट तुकड्यांवर ती शेव पाडून घ्या. ती खाली दिलेल्या चित्रातल्या प्रमाणे पसरायला हवी.

आता सुरूवातीचा काही भाग सोडून सारण त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे घाला आणि मासवड्या किंवा अळूवडी करतांना करतो तशी गुंडाळी केळीच्या पानासकट करीत जा. या गुंडाळ्या तयार झाल्यावर त्या मोदकपात्रात किंवा पाचकपात्राला शिट्टी न लावता पंधरा मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम शेवया तय्यार. खातांना तुमच्या पथ्यात बसत असेल तर गरम शेवयांवर तुपाची धार सोडायला हरकत नाही.
छानच!
LikeLike
धन्यवाद
LikeLike