“यात एक ऐब आहे. तो पाण्यात भिजल्यावर चालत नाही” नव्या भ्रमणध्वनियंत्राबद्दल चंदरची तक्रार. मी म्हटलं, “हा शब्द तुझा फार लाडका आहे ना?” “ अगं तो भाऊबाबांच्या शब्दसंपदेमधला खास शब्द होता.” भाऊबाबा म्हणजे माझे आजेसासरे. जुन्नरच्या पूर्वेला चार पाच किलोमीटरवरल्या तेजेवाडी नावाच्या खेड्यातील एक शेतकरी.
एकदा ते चंदरला म्हणाले, “हरिचंदर, जा पळ, नव्या घरात खुंटीला गल्लास टांगलाय तो आण.” चंदर नव्या घरी गेला. तिथल्या सगळ्या खुंट्या धुंडाळूनही त्याला गल्लास म्हणजे पेला सापडला नाही. तो हात हलवित परत आलेला पाहून भाऊबाबा म्हणाले, “XXXX, तुला गल्लास माहीत नाही?” तर गल्लास म्हणजे भाऊबाबांच्या शब्दकोशाप्रमाणे कंदिल. असे अप्रचलित शब्द फेकून ऐकणाऱ्याला गोंधळात पाडणे ही भाऊबाबांची खास लकब होती.
मी भाऊबाबांना फक्त छायाचित्रातच पाहिलंय. पण त्यांच्याविषयी ऐकलंय मात्र बरंच. बाईंच्या म्हणजे आमच्या सासूबाईंच्या तोंडी खास भाऊबाबांचे असे बरेच शब्द, लकबी असत. उदाहरणार्थ गावात किंवा कुटुंबात काही विशेष घडलं की त्या म्हणत,” जरा त्याची इन्कुरी कराय पाह्यजे.”
भाऊबाबा म्हणजे एक वल्ली होती. इतरांपेक्षा वेगळं काही करायला त्यांना नेहमीच आवडे. मग ते डोक्यावरचं पागोटं का असेना वेगळं असलं पाहिजे. बाराबंदी किंवा कोपरीवर ते जाकिट घालीत. धोतरावर गुलबट छटा यावी म्हणून ते सावलीत वाळवित. दगडधोंड्यापासून ते खिळे, सुऱ्या, मोडकी जुनी अवजारं असं सर्व काही ते जमवून ठेवीत. माझ्या पाठच्या दिराला, रमेशलाही हे असं सगळं जमवायला आवडतं. तो ते सगळं घेऊन एखादं जुनं बंद पडलेलं घड्याळ उघडून बसला की बाई म्हणत,”बसला बोवा माहा सासरा खिरपाळ घेऊन.”
भाऊबाबा कधी कुठल्या प्रश्नाला सरळ उत्तर देत नसत. गांवाकडचे लोक संभाषण सुरू करायला विचारतात तसं कुणी विचारलं, “ काय भाऊबाबा, आंगूळ चाललीय वाटतं?” अशा वेळी आमच्या आजेसासूबाईंशी खटकलं असलं की भाऊबाबा म्हणत, “व्हय. म्हतारीच्या नावानं आंगूळ करतोय.” भाऊबाबा घराच्या ओट्यावर बसलेले दिसले की जवळून जाणारा माणूस विचारी, “काय भाऊबाबा, बसलाय का?” यावर भाऊबाबांचं उत्तर असे, “नाय. उभा राह्यलोय.”
समोरचा श्रोतृवृंद पाहून त्याप्रमाणे गोष्टी रचणे हाही त्यांचा एक छंद होता. उदाहरणार्थ त्यांनी रचलेली ही गोष्ट. पर्जन्यछायेच्या त्या प्रदेशात उन्हाळ्यात गुरांसाठी चारा नसे. मग पाऊस पडून चारा होईपर्यंत गुरं घाट (दाऱ्या घाट किंवा नाणेघाट असावा) उतरून जाऊन एका गावात गुरं ‘राखोळी’ घातली जात. एकदा भाऊबाबा घाटातून जातांना विसावा घ्यायला एका दगडावर टेकले. अन् दगड हालायला की हो लागला. बघतात तर काय? अगं बाबौ, भला थोरला अजगर होता तो दगड म्हणजे. म्हातारीशी भांडण झालेलं असलं ( आणि बरेचदा तसं झालेलं असे) की भाऊबाबा दोन दोन दिवस जेवत नसत. सासरा उपाशी आहे मग आपण कसं खायचं हा प्रश्न आमच्या सासूबाईंना पडे. पण एकदा भाऊबाबांचा कब्जा धुवायला काढल्यावर खिशात खारीक, खोबरं असा शेलका ऐवज सापडल्यावर त्यांच्या दोन दोन दिवसांच्या उपासाचं गुपित त्यांना उमगलं.
विक्षिप्तपणाला त्यांच्या वर्तनात मोठं स्थान असे. बहुधा भोवतालच्या रटाळ जगण्यावर शोधून काढलेला तो उपायही असेल. चारचौघांना मान्य असलेल्या चाकोऱ्यांबाहेर जाण्याची अदम्य इच्छाही त्यामागे असावी. असा विक्षिप्तपणा अलीकडे दुर्मिळ झाला आहे.
