पद्मा खरं तर आमच्या मैत्रिणीची सरस्वतीची भाची. पण लहानपणापासून बहिणीकडे वाढलेल्या सरूची ही भाचरंच सर्वस्व. त्यामुळे पद्मा सरूबरोबर पर्यायाने आमच्यासोबत नेहमी असे. तर तिच्या लग्नासाठी आमंत्रण आलं आणि पालक्कड किंवा पालघाटजवळच्या कलापथि गावी जायला तिथून सर्वात जवळ असलेल्या कोय्यम्बत्तुर ( सरू कोईमतुरचा असाच उच्चार करते आणि विमानतळावरही तो तसाच लिहिलेला आढळला) विमानतळावर दाखल झालो. आम्हाला न्यायला आलेले फक्रुण्णा भलतेच चटपटीत निघाले, आम्ही त्यांना शोधायच्या आधीच त्यांनी आम्हाला गाठलं. नाव फक्रुद्दीन. पण “खाली नाम से कैसे बुलानेका?” म्हणून सरू त्यांना फक्रुण्णा म्हणत असे आणि आम्ही ही त्या तरूणाचं तेच नामकरण करून टाकलं. त्यावरून आमच्या ओवीची गंमत आठवली. बंगळुरूच्या सवयीने आम्ही हैदराबादला रस्ता विचारतांना तिने अण्णा अशी हाक मारली तर कुणीच बघेना. मग तिच्या मित्राने तिला भैय्या किंवा भाई म्हणून हाक मारायला सांगितलं तर जादू झाल्यासारखा प्रतिसाद मिळाला. तर फक्रुण्णांनी आमची गाठोडी कलापथि गावात आणून टाकली. आमच्या जाण्याचं त्या सर्वांना एव्हढं अप्रुप वाटत होतं कि आमची अगदी बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या मुलींसारखी बडदास्त ठेवली गेली. कुठल्याही कामाला हात लावणं तर सोडाच आमच्या तिथल्या बंधुंनी अगदी आमची अंथरूणंही आम्हाला घालू दिली नाहीत. खाण्यापिण्याचं आणि भ्रमणध्वनिवरून धडाधड छायाचित्र पाडण्याचं काम फक्त उरलं. तेव्हा ते पचवायला आम्ही गावात फेरफटका मारायला लागलो.
उतरत्या कौलांची घरं गल्लीच्या दुतर्फा होती. बाहेरून ती एकसारखी दिसली तरी आतून घरमालकाच्या सांपत्तिक स्थितीनुसार वेगवेगळी होती हे आम्ही अनुभवलं. सरूचं घर आणि आम्ही शेवटल्या रात्री जिथे राहिलो ती दोन्ही घर पारंपरिक मल्याळी घरं होती. लाकडी खांबांवर छताची चौकट बांधलेली, आडव्या काळ्या लाकडी तुळया. सरूच्या घरात मोठ्या खांबासारखं काहीतरी होतं कोपऱ्यात. विचारलं तर कळलं कि छतावरून येणारं पावसाचं पाणी गोळा करून साठवण्याची सोय होती. एक प्रकारचं वॉटर हार्वेस्टींगच ते. पण त्याच गल्लीच्या टोकाशी आम्ही दोन दिवस राहिलो ते घर म्हणजे एक आधुनिक बंगला होता.
बाहेरून या सर्व घरात एक साम्य होतं. ते म्हणजे प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूला बसण्यासाठी केलेले ओटे आणि रांगोळी काढण्यासाठी बसवलेले काळे चौकोनी दगड. दोन्ही दिवसात गावात तरूण मुलांचा वावर फारसा दिसला नाही. वयस्कर माणसंच जास्त होती. तरूण मुलं बहुधा शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेरगांवी असावीत. नवऱ्याला लाडाकोडाने हाताला धरून नेणाऱ्या, त्याची काळजी वहाणाऱ्या (त्यात सरूची आईही होती) म्हाताऱ्या अधिक होत्या. मग या नवनवीन रांगोळ्या कोण एव्हढ्या उत्साहाने काढतं हे माझं कुतूहल काही शमलं नाही.

कलापथि ही जवळच्या तामिळनाडूतून स्थलांतरित झालेल्या तामिळी ब्राह्मणांची पहिली वस्ती (अग्रहारम्). सततच्या आगी, जीवित आणि मालमत्तेची हानि या सगळ्याला घाबरून त्यांनी आपल्या रक्षणासाठी गणपतीचं मंदिर बांधलं. हे गांव दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथले ब्राह्मण विद्वान पंचक्रोशीतली धर्मकार्य करीत. (त्यामुळेच कि काय आपल्याकडे कविसंमेलनात जसे श्रोत्यांपेक्षा व्यासपीठावर कवी संख्येने अधिक असतात तसे पद्माच्या लग्नात दोन्हीकडचे पुरोहितच जास्त दिसत होते.)
गावाची रचना साधीच. काटकोनात वळणाऱ्या छोट्या गल्ल्या. प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी किमान एक देऊळ. मला केरळ आणि पश्चिम बंगाल या साम्यवादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यांचं काही कळत नाही या बाबतीत. केरळमधले डाव्या विचारसरणीचे पुढारीही कपाळावर भस्माचे पट्टे मिरवतात. बहुधा त्यांनी आपला साम्यवाद आणि धर्म यांचे वेगवेगळे कप्पे केले असावेत. काही दुकानं. एक दोन ठिकाणी दुकानावर पाटी दिसली ‘Brahmin Products’. म्हणून कुतूहलाने पाहिलं तर पूजेच्या साहित्यासोबत पापड, कुरडया, लाडू असे पदार्थ दिसले. हे बहुधा ‘सोवळ्यातले’ असावेत. एकदा आमच्या ओवीने असंच चेन्नईवरून अय्यंगार ब्राह्मणांनी केलेले पापड आणले होते. संध्याकाळी ओट्यांवर म्हातारी माणसं उदासवाणी बसलेली असत. महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात नवीन माणसं दिसल्यावर “ काय, कोण गावचं पाव्हणं म्हणायचं?” “खयसून इलास?” इत्यादी चौकशा होतात तशा इथे कुणी करीत नव्हतं. हे उदासवाणं, झोपाळू गाव आणि त्या शांत गल्ल्या माझ्या नेहमीच स्मरणात राहतील.
न्याहारीला इडली, वडे, डोसे, इडीअप्पम, तोड्याची जिलेबी अशा सर्व दाक्षिणात्य पदार्थ पाहून आम्हाला जरा भीतीच वाटली कि न्याहारी अशी तर जेवणात काय असेल. पण जेवण म्हणजे आपल्या ओणम् साद्याचा छोटा अवतार होता. अवियल, काळण, इस्ट्यू, पापडम्, सांबार, भात, रस्सम् या साऱ्यासोबत दोन प्रकारची पायसम् होती. त्यात माझ्या आवडीचं अडापायसम् होतं.
लग्न अगदी साधेपणाने कोणत्याही बडेजावाशिवाय पार पडलं. छोट्या गावात होतं त्याप्रमाणे वधूची तयारी घरातल्या बायकांनी केली. साध्याशा पण स्वच्छ आणि हवेशीर कार्यालयात विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रात मंगलाष्टकं झाल्यावर वाजवा रे वाजवा अशी हाकाटी होते आणि मग वाजवायला सुरूवात होते ती वरातीपर्यंत. इथे गंमत म्हणजे प्रत्येक विधि पार पडल्यावर खूण केली जाई मग तब्बल दोन मिनिटं घडघडघड वाजत राही. मग पुढल्या विधीपर्यंत शांतता. वरातीतही नाचकाम, बँडबाजा काही नाही.
लग्नसोहळा पार पाडल्यावर सरूने फक्रुण्णाला दिमतीला देऊन आम्हाला जवळपासची ठिकाणं पहायला पिटाळलं. गेल्या महिन्यात मलमपुझ्झा, अलमत्ती आणि राधानगरी अशी तीन वेगवेगळ्या राज्यातली धरणं पहायचा योग होता. अलमत्तीला फक्त धरणाचा थगारा बघता येत होता. तिथेही धरणाजवळ अशाच आधुनिक बागा, संगीताच्या तालावर नाचणारी कारंजी होती. हे सगळं नयनरम्य होतं. लोकांना तिथे मजेत वेळ घालवता येत होता. राधानगरीला यातलं काहीही नव्हतं. धरणाची छायाचित्रच घ्यायला काय भ्रमणध्वनि, कॅमेरा काहीही घेऊन जाता येत नव्हतं. वर धरणाचं दृश्य पहायला गेलो तिथे उभं रहायलाही धड जागा नव्हती. पण तरीही मला राधानगरी आवडलं. तिथं असीम शांतता होती. समोर धरणाचं सुंदर दृश्य होतं आणि अलिकडे शेतीभातीचं नैसर्गिक दृश्य.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा कोय्यम्बत्तुरला पोचलो परतीच्या प्रवासासाठी. तिथे अजून फार प्रमाणावर गगनचुंबी इमारती नाहीत. छोटी टुमदार घरं अजूनही आहेत. तमिळ आणि केरळी माणसांना श्वासाइतकी आवश्यक अशी मंदिरं आहेत. कार्यालयात जातानांही भरजरी साड्या, दागिने आणि हो फुलांचे मोठे गजरे माळणाऱ्या दाक्षिणात्य सुंदरी आहेत. या तीन दिवसात आमची ही फुलं माळायची हौस भागली. तिथला मोगरा काही वेगळाच आणि मल्लिगे तर छानच. एकूण एक लक्षात रहाण्याजोगी भटकंती झाली.