आठवडाभरापूर्वी आमच्या शेजारच्या इमारतीतले एक गृहस्थ सकाळी सात वाजता किराणा खरेदीसाठी घरापासून मोजून चार मिनिटांवर असलेल्या डी मार्टला जायला बाहेर पडले, त्यानंतर ते घरीच परतले नाहीत. खूप शोधाशोध झाली, पोलीसांकडे तक्रार करुन झाली, सामाजिक माध्यमांवरुन निरोप धाडले गेले. काहीच झालं नाही. पण आज चक्क ते घरापासून पायी वीस मिनिटांवर असलेल्या चर्चच्या परिसरात सापडले. सगळ्यांना एकच उत्सुकता – ते का निघून गेले?
आजवर नात्यागोत्यात, ओळखीपाळखीत अशी बरीच माणसं घराबाहेर गेल्यावर नाहीशी झाली, त्यातली काही एकदोन दिवसात सापडली, काही महिन्यांनी सापडली, तर काही सापडलीच नाहीत. मनोरुग्ण असलेल्या माणसांची गोष्ट वेगळी. ती आपल्या मर्जीने जात नाहीत. पण चांगल्या खात्यापित्या घरात, प्रेमाची, काळजी घेणारी माणसं आजूबाजूला असतांना माणसं घर सोडून का जातात?
घरातल्यांवर रुसून जाणाऱ्यात पौगंडावस्थेतली मुलं बरीच असतात. आमच्या नात्यातला असाच एक मुलगा घरात सगळे कामं सांगतात म्हणून रुसून गेला. रोज कुणी तरी घरच्यांना सांगे त्याला कुर्ल्याला पाहिलं, त्याला कल्याणमध्ये पाहिलं. नंतर बाहेर राहून त्याला शेवटी आपला निभाव लागणार नाही असं वाटलं की काय कुणास ठाऊक, काही महिन्यांनी तो स्वतःच घरी परतला. पण सगळीच मुलं अशी सुदैवी नसतात. काही पाकिटमारी करणाऱ्या टोळ्यांच्या हाती, गुंडांच्या हाती सापडतात आणि परतीची वाट सापडत नाही.
पण चांगले संसार मांडून बसलेले लोकही असे रुसून जातात. गंमत म्हणजे त्यांनी आधी तशी धमकी दिलेली असते पण घरातले लोक ते फारसं मनावर घेत नाहीत. जाऊन जाऊन जाणार कुठे, कोण याला घेणार अशी थट्टा करतात. जेव्हा हे खरोखर घडतं तेव्हा मात्र ते हादरतात, पश्चात्तापाच्या आगीत होरपळतात.
आमचा एक मित्र एकदा असाच निघून गेला. सगळ्या मित्रांनी शक्य होती ती सर्व ठिकाणं पालथी घातली. बायकोने तर रात्रीबेरात्री रेल्वे स्थानकावर झोपलेल्यांची पांघरुणं काढून त्यांचे चेहरे पाहून खात्री करुन घेतली. शेवटी त्याने खात्यातून पैसे काढून घेतल्यावर तो सुरक्षित असावा असं वाटलं. काही दिवसांनी तो एका मित्राला भेटला आणि शेवटी घरी परतला. पण तोवर सर्वांचा जीव टांगणीला लागलेला.
म्हातारी माणसं जेव्हा विस्मरणाचे आजार होऊन नाहीशी होतात तेव्हा तर काळजाचा ठोका चुकतो. एका मैत्रिणीचे वडील असेच. खाली गेटपर्यंत जातो म्हणून गेले आणि चुकून बाहेर पडले, मग त्यांना घर सापडेना. सुदैवाने दोन दिवसांनी ते सापडले. पण बरेचदा पुरुषांच्या बाबतीत असं घडतं की निवृत्त झाल्यावर त्यांना घरच्यांशी जुळवून घेता येत नाही. पूर्वी जो मान मिळायचा तो आता मिळत नाही म्हणून त्यांचं मन उडून जातं आणि ते घर सोडून जातात. बरं म्हातारपणात मन इतकं मानी होतं कुटुंबियांच्या बाबतीत की काहीजण अशा टोकाच्या विचारांपर्यंत पोहोचतात की त्यांना घरच्यांकडून काही घेणं म्हणजे भीक मागण्यासारखं वाटू लागतं.
सहसा बायका घरातल्यांशी जुळवून घेतात. तसंही बाहेर पडण्यातले धोके त्यांना अधिक घाबरवतात. पण तरुण मुलींना मात्र त्याचा अनुभव नसतो, तरुणपणातला एक आत्मविश्वास असतो. अशा बाहेर पडलेल्या मुलींना फार वाईट अनुभव येतात बरेचदा. त्यावर लिहायला खूप आहे, पण प्रौढ बायका घर सोडून गेल्याच्या घटना मात्र फार कमी आढळतात.
बरेचदा अशा लोकांच्या बाबतीत दुर्घटना घडतात, पोलीसांना तपशील न सापडल्याने त्यांचे मृतदेह कुठल्यातरी अनोळखी ठिकाणी चिरविश्रांती घेतात. कधी घरच्यांना कळतं कधी कळत नाही, ते वाट पहात रहातात वर्षानुवर्ष. आपलं नक्की काय चुकलं याचा विचार करीत अपराधगंड बाळगत जगतात काही वर्षं. मग आपलं माणूस नसण्याची त्यांना सवय होऊन जाते कधीतरी, फक्त आठवण उरते.
अशा घटना बाजूला ठेवल्या तर इतर लोकांचं काय? ते खरंच का निघून जातात?
मला असं वाटतं की काही लोकांना या पळून जाण्याचं एक रोमँटिक आकर्षण असतं. रोजच्या जगण्यातला कंटाळवाणा दिनक्रम सोडून काहीतरी रोमहर्षक जगावंसं वाटतं. जिथे पुढच्या क्षणी काय घडेल काय करावं लागेल याचे ठोकताळे बांधता येत नाहीत. त्या माणसांच्या लेखी ते एका वेगळ्याच जगात जाऊ पहात असतात. पण बाहेर पडल्यावर त्यांना ते त्यांच्या मनातलं जग सापडतं का? नाही सापडलं म्हणून ते असेल त्याच्याशी तडजोड करत त्याच जगात रहातात की तडजोड करता येत नाही म्हणून परत येतात? काय असतं त्यांच्या मनात? ते का निघून जातात? ते का परतून येतात किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते का परतून येत नाहीत?

फारच अस्वस्थ करणारं आहे हे !
LikeLike