
खाजणाकडे जायच्या पायवाटेच्या तोंडावर एक दोन तरी वाहनं थांबलेली असतात. डी मार्टकडे माल घेऊन येणारे टेम्पो, खरेदीला येणाऱ्यांच्या गाड्या, दुचाक्या. तशी हल्ली कुठल्या तरी कंपनीच्या लोकांना घरी नेणारी मिनी बस दिसते. “अरे, तो हा आला का? तो तमका कुठे गेला? अहो मॅडम, चला लवकर.” असं करता करता बस दहा पंधरा मिनिटं थांबते. मग पंधरावीस तरुण मुलंमुली बसली की बस सुटते. आज बस अशीच थांबली होती. तेवढ्यात टाळेबंदीपासून घडली नव्हती अशी गोष्ट घडली. बाहेर रेंगाळणाऱ्या एका पस्तीशीच्या तरुणाला दहा बारा वर्षांच्या दोघातिघा मुलांनी गाठलं. त्यांच्यापाशी असलेल्या छोट्या पिशव्यांमधून लहान मुलांची पुस्तकं, वह्या काढून ते त्याला दाखवू लागले. त्यानेही पाचसहा पुस्तकं चाळून तीनेक विकत घेतली, एकाद दुसरी वही घेतली. मग ती मुलं खिडकीतून आत डोकावत आपलं विक्री कौशल्य आजमावून पहायला लागली. पण कुणीच त्यांना धूप घातला नाही. तेव्हा नाईलाजाने ती दुसरी गिऱ्हाईकं गाठायला निघून गेली.
मला एकदम मी लोकलने बँकेत जात असे तेव्हा आमच्या डब्यात इंग्रजी पुस्तकांची चवड हातावर तोलत सफाईने आत उडी मारुन डब्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ती विकत फिरणारी अशीच छोटी मुलं आठवली. एकतर ती पुस्तकं अशीही पायरेटेड त्यामुळे स्वस्त. शंभरदोनशे रुपयांना मिळत. पण बायका त्यातही मोलभाव करुन निम्म्या किंमतीला मागत. वर आपण काही म्हणावं तर आपल्यालाच शिकवत, “अहो, तुम्हाला काही कळत नाही. शेंडी लावण्यात हुश्शार असतात ही पोरं. केवढा फायदा काढतात. फूटपाथवर पहा, पन्नास रुपयांना मिळतात.” मी बऱ्याचदा या मुलांशी गप्पा मारीत असे. त्यातली काही पळवली गेलेली तर काही घरातून पळून आलेली. त्यांना हे सगळं करणं भाग असे. हा त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचा एक भाग होता. त्यांच्यासारखी इतर मुलंही कानातले, स्वस्त चिनी वस्तू, टिकल्या असलं काहीबाही विकत. पोलीस, गुंड, वयाने मोठे असलेले इतर फेरीवाले या सर्वांना तोंड देत देत जगत असत. रेल्वे फलाटावर कुणा दानशूराने ठेवलेल्या पाणपोयीवर पाणी पित, फलाटावरच्या वडापाव, सँडविचच्या स्टॉलवर खातांना दिसत कधी मधी, रात्री आपापल्या रहाण्याच्या ठिकाणी किंवा फलाटावर झोपायला जात. कधी एखादी माझ्यासारखी ओळखीची बाई दिसली की मागे लागत, “ले लो ना मॅडम, आज बोवनी नही हुवा है.”
या तीन महिन्यांत त्यांना कोणी खाऊपिऊ घातलं असेल? की तीही आठवणीतून गेलेल्या आपल्या गावाला निघून गेली असतील पायी पायी? की इथेच राहिली असतील टाळेबंदी संपल्यावर असं पुन्हा मांजरासारखं दोन पायांवर उभं राहून जगण्याची धडपड करायला?