शेवटल्या बाकांचे सरदार

तशी मी अभ्यासात बरी होते. शाळेत घालायला वडील घेऊन गेले तोवर मोठ्या बहिणींचं ऐकून पुस्तक पाठ झालं होतं. तेव्हा वर्षानुवर्षे पुस्तकं तीच असत आणि आम्हा बहिणींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर असे. त्यामुळे पान पहिलं धडा पहिला इथपासून सगळं पाठ होतं. मुख्याध्यापक माझी प्रगती पाहून चकीत झाले. म्हणाले ही तर तिसरीतच जाऊ शकेल थेट पण आपण दुसरीत घालू. वडील म्हणाले थांबा जरा. त्यांनी आजूबाजूला शोध घेत माझ्या परिचयाचं नसलेलं एक पुस्तक हाती दिलं. मला एक अक्षरही वाचता आलं नाही, तेव्हा कुठे त्यांच्या ध्यानी आला खरा प्रकार. पण नंतर अर्थातच भराभर शिकले. प्राथमिक शाळेतल्या आमच्या वर्गशिक्षिका हेमलता जोशी यांनी वर्गात एक मोठा लाकडी पेटारा ठेवलेला असे. चांगले गुण मिळवणाऱ्या किंवा काहीही चांगलं करणाऱ्याला (उदाहरणार्थ की चांगलं गाणं, खेळ, नृत्य, चित्र काढणं) त्या पेटाऱ्यात लपलेल्या खजिन्यातून काहीतरी मिळत असे. मी पहिला क्रमांक मिळवत असल्याने मला एक खेळण्यातलं घड्याळ आणि एक शाईचा छोटुकला पेन मिळाला होता.

असं असलं तरी का कुणास ठाऊक मला शेवटच्या बाकावर बसायला फार आवडत असे. सहसा पहिला क्रमांक मिळवणारी मुलं पुढच्या बाकावर बसतात. शेवटच्या बाकावरची मुलं ढ, उडाणटप्पू ठरवली जातात. हे माहीत असूनही मी शेवटच्या बाकावर बसत असे. कदाचित शाळेतली एक घटना त्याला कारणीभूत असावी. बोकील नावाचे एक शिक्षक वर्गात जाळ्यात अडकलेल्या सिंहाची ती सुप्रसिद्ध गोष्ट सांगत होते. ते जाळं कसं होतं हे सांगतांना माझ्या फ्रॉककडे बोट दाखवीत म्हटलं, “हिच्या फ्रॉकसारखं होतं बरं का ते जाळं.” त्या काळी अंगावर एक, दांडीवर एक इतकेच कपडे असत. तेसुद्धा मोठ्या भावंडांनी वापरुन जुने झालेले धाकट्यांना मिळत. शिवाय परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. तिथे नवा फ्रॉक कुठून मिळायला. तोपर्यंत मलाही तो घालायला लाज वाटत नसे. पण शिक्षकांनी असं म्हटल्यावर सगळे माझा फ्रॉक पाहून हसायला लागले. नंतर चिडवायलाही लागले. त्यामुळे बहुधा मी पुढे बसायचं नाही असं ठरवलं असावं.

पण मला तिथे बसायला अनेक कारणांनी आवडत असे. पुढे बसल्यावर शिक्षकांचं लक्ष असेच. शिवाय माझ्या मागे बसणारी माझी मैत्रीण मीना माझ्या रिबिनी सोडून वेण्यांच्या टोकांना वळवून ती गोल झाली की त्यात बोटं फिरवीत बसे. उत्तर आलं नाही की सगळ्या वर्गासमोर इज्जत का फालुदा. हे सगळं असे. पण माझ्या मागच्या बाकांवरच्या मैत्रिणी अधिक आपल्याशा वाटत. त्या आखडू नसायच्या. लोकांना वाटतं तशा निर्बुद्ध नसायच्या. कदाचित त्यांना दुसरं काही महत्त्वाचं वाटत असेल, आवडत असेल अभ्यासाऐवजी इतकंच. मला तर अशी पक्की खात्री आहे की शेवटच्या बाकावर बसलेल्यांना आपल्या ठरीव शिक्षणपद्धतीचा निषेध करायचा असावा आणि म्हणून ते इतके दूर बसत असावेत. शिक्षक काहीतरी गिरवत बसायला सांगून वर्गाबाहेर गेले की आम्ही आपापाल्या दप्तरातला (माझं तर खाकी जाड कापडाचं होतं) खजिना एकमेकींना दाखवत असू. त्यात सरांनी लिहून उरलेले खडूचे तुकडे, पेन्सिलींचे तुकडे, पेपरमिंटच्या गोळ्या आणि चॉकलेट यांची वेष्टणं, सिगरेटच्या पाकीटातला चंदेरी कागद, रंगीबेरंगी गोट्या, खडे, चक्क बांगड्याचे तुकडे असं बरंच काही असे. कधी कधी जास्तीच्या गोष्टींची देवाणघेवाणही होई. “कुण्णालाही सांगू नकोस हं. आईने बजावलंय. मला ना जांभळ्या रंगाची सुसू होते.” असं एकदा मैत्रिणीने सांगितलं होतं. तेव्हा काहीच कळलं नव्हतं. पण अशी गुपितं कानात सांगितली जात. घरुन क्वचित मिळालेल्या पैशांचे खारे दाणे, बोरं वाटून घेतली जात. कधी कधी वर्गातला हुशार आणि शिष्ट मॉनिटर बंडू म्हापणकर आमच्या बाकाकडे येऊन खिडकीबाहेरच्या पिंपळाकडे बोट दाखवत थापा मारी, “तो सुरा पाहिलास त्या झाडाच्या खोडावरचा? तो मी अमावाश्येच्या रात्री येऊन खोवून ठेवलाय. नाहीतर भुतं येतात.” पण ते तितकंच. बाकी शिष्ट मुलांचा आणि आमचा फारसा संबंध नसे. पण या सगळ्यामुळे माझ्या अभ्यासावर काही परिणाम होत नसे. त्यामुळे असेल, वर्गशिक्षक माझ्या शेवटच्या बाकावर बसण्याला आक्षेप घेत नसत.

नंतर मी गिरगावातली ती शाळा सोडून घराजवळच्या नगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत गेले. ती शाळा छोटी होती. वर्ग लहान. तिथे मी लाडकी होते शिक्षकांची आणि वर्गातल्या मुलींचीही. त्यामुळे मी कुठेही बसले तरी फरक पडत नसे. आणि मी कुठेही बसत असे. पण त्याचा काही बाऊ केला जात नसे.

पण त्यानंतर आठवीत मात्र एका खाजगी शाळेत गेले. तिथे आम्हा ‘उल्टीपाल्टी’च्या मुलांची वेगळी तुकडी असे. सकाळी घरातली पाण्याची कामं, दूधकेंद्रावरुन दूध आणणं हे सगळं उरकून पहिल्या दिवशी मी जेमतेम वेळेवर पोचले. वर्गात सगळ्यांनी लवकर येऊन जागा पटकावल्या होत्या. योगायोगाने माझ्या आवडत्या शेवटच्या रांगेतल्या एका बाकावर जागा मोकळी होती. तिथे एक जरा थोराड दिसणारी मुलगी- सुधा तिचं नाव – बसली होती. मी तिच्याशेजारी जाऊन बसले. माझं कुणाशीही जमे तसं तिच्याशीही चांगलं मेतकूट जमलं. तिलाही बरं वाटलं. कारण तिच्या जरा मजबूत देहयष्टीमुळे बाकावर जागा मिळत नाही म्हणून किंवा इतर कशामुळे असेल वर्गातल्या इतर मुली तिच्याशी साध्या बोलतही नसत. शिक्षक नवे होते. त्यामुळे सुरुवातीला काही त्रास झाला नाही. पण एक दिवस आमच्या इंग्रजीच्या सोगावसन नावाच्या बाईंनी एक प्रश्न विचारला तेव्हा सुधा मला बाईंनी काय विचारलंय हे विचारीत होती. मागच्या बाकावरच्या लोकांची ही एक अडचण असते- नीट ऐकू येत नाही किंवा ऐकू आलं तरी समजायला वेळ लागतो त्यामुळे ती मुलं कायम शेजारच्या किंवा पुढच्या बाकावरल्या मुलांना विचारत बसतात आणि शिक्षकांना वाटतं त्यांचं लक्ष नाही किंवा त्यांना वर्गात गोंधळ माजवायचाय. तसं त्या बाईंना वाटलं. त्यांनी मला म्हटलं, “दे बघू उत्तर, येतंय तरी का?” माझं इंग्रजी तसं बरं होतं. आमच्या आधीच्या शाळेत तर मला मड्डम म्हणून चिडवीत. मी बरोबर उत्तर दिलं. तर बाई म्हणाल्या, “कोणी रे हिला प्रॉम्प्टींग केलं? सांग कोणी उत्तर सांगितलं तुला.” मी म्हटलं “कुणी नाही बाई. माझं मीच सांगितलं.” एकतर त्यांना बाई म्हटलेलं आवडत नसे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे त्या भडकल्या “खरं सांग, खोटं बोललेलं मला आवडत नाही. किती मार्क्स मिळाले होते सातवीत इंग्रजीला?” मी म्हटलं, “पंच्याऐंशी.” आता हे मी मराठीत सांगितल्यामुळे त्या फारच भडकल्या “खोटं बोलतेस अजून? तुला ठाऊक नाही मी काय शिक्षा करते ती.” आता कुठे माझ्या आधीच्या शाळेतल्या वर्गभगिनींना कंठ फुटला, त्या नक्की कोण बोलतेय ते बाईंना कळू नये अशा पद्धतीने एका सुरात म्हणाल्या, “नाही मॅडम, तिला खरंच तितके मार्क्स  मिळाले होते. आमच्या वर्गात होती ती.” मग त्या विचारात पडल्या. पण त्यांनी एक वाईट गोष्ट केली ती म्हणजे मला पुढे बसवलं आणि पुढचे काही दिवस वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावून खात्री करुन घेतली. पण मीही तशी लबाड होते. त्यांचा तास संपला की मी पुन्हा मागे जाऊन सुधाजवळ बसत असे.

पुढे महाविद्यालयांमध्ये हा प्रश्न उद्भवला नाही. कारण पहिली दोन वर्षं वर्गात मुलांची संख्या जास्त असली तरी तिथेही भाषिक गट असत (त्यातही जातवार असतील कदाचित) आम्ही आठ मराठी मुली एकत्र बसत असू आणि नीट ऐकू यावं म्हणून चौथ्या बाकावर बसत असू. पुढे पदवीसाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयात तर वर्ग छोटाच असे. तिथे मागे बसलं तरी फार फरक पडत नसे.

पण खूप वर्षांनी मागच्या बाकाचे सरदार होण्याचा अनुभव एम.ए.च्या वर्गात आला. मी आणि चंदर दोघेही दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी एल्फिन्स्टन महाविद्यालयात एम.ए.चे वर्ग भरत तिथे पळत पळत जात असू. पुढची बाकं भरलेली असत. शिवाय आपल्यामुळे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना व्यत्यय नको म्हणून हळूच मागच्या बाकावर बसत असू. पदवी शिक्षण पार पडल्यावर तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा शब्द न् शब्द लिहून न घेता स्वतः काही वेगळा विचार, विश्लेषण करणं आवश्यक आहे. पण या संध्याकाळच्या वर्गात सगळेच आमच्यासारखे नोकरी करणारे होते म्हणून असेल कदाचित पण बरेचजण अशा प्रकारे लिहून घेत. आमच्या पाठच्या वर्गातली एक मुलगी तर असं लिहून घेत असतांना तिच्या वहीत कुणी डोकावलं तर हाताचा आडोसा करीत असे किंवा चक्क वही मिटून टाकीत असे. आम्हा दोघांना तसं लिहून घ्यायची गरज भासत नसे. मध्येच एखादा मुद्दा आवडला, वेगळा वाटला तर लिहून घेणं वेगळं. प्राध्यापकांनाही तसा काही फरक पडत नसे. पण आमच्या तत्कालीन विभागप्रमुख होत्या त्यांना मात्र त्या सांगत असत ते सगळं लिहून घेतलं नाही तर राग येत असे. “हे महत्त्वाचं आहे.” असं त्या अधून मधून ठासून सांगू पहात. पण आम्ही दोघं गालावर हात ठेवून एकाग्रतेने फक्त ऐकत असू. अर्थात कधी फार कंटाळवाणं वाटलं तर मुद्दा लिहिलाय असं दाखवत शेरेबाजी लिहिलेल्या वह्या एकमेकांकडे सरकवत असू. बाईंनी अनेक विद्यार्थी पाहिलेले असल्याने त्यांना ते कळत असावं. त्यामुळे आम्ही उडाणटप्पू आहोत असं त्यांना वाटे आणि त्या येता जाता रागारागाने पहात. पण पहिली परीक्षा झाली आणि आमच्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर त्यांचा तो राग गेला. मग आमची चांगली मैत्री झाली.

शाळा महाविद्यालयातच नव्हे तर सभासमारंभाना गेल्यावरही मला मागे बसावसं वाटतं. आपल्या पुढे बसलेले हुषार लोक काय काय करताहेत कार्यक्रम चालू असतांना हे पहायला मज्जा येते. शिवाय वर म्हटलं तसं गंभीरपणे ऐकतोय, लिहून घेतोय असं दाखवत एकमेकांना ताशेरे दाखवत टवाळकी करता येते. बरेच लोक कार्यक्रम कंटाळवाणा झाला की पटकन् पळायला बरं म्हणून शेवटच्या रांगांमध्ये बसतात. हे असे लोक आमच्यासारखं खर्रेखुर्ऱे शेवटच्या बाकांचे सरदार नव्हेत. कारण कार्यक्रम चांगला झाला की त्यांची चलबिचल होते, पुढे बसायला हवं होतं असं त्यांना वाटू लागते.

परवा आमच्या एका मित्राने गुरुपौर्णिमेदिवशी फेसबुकावर लिहिलं होतं – सगळ्या शिक्षकांनी शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांना नमस्कार करायला हवा, कारण त्यातला कुणीतरी शिक्षणसंस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या डोक्यावर येऊन बसू शकतो. पण खरं पहाता आमचे दुसरे एक मित्र म्हणतात तसं आमचे हे जे पुढच्या बाकावर बसणारे, गुणवत्ता यादीत येणारे मित्र आयुष्यात पुढे काय करतात आणि आमच्यासारखे मागच्या बाकांवरचे सरदार काय करतात यावर जरा संशोधन व्हायला हवं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s