नोकरीपेशा विद्यार्थी

सत्तरच्या दशकात आमच्यासारखे बरेच लोक नोकरी करून शिकत असत. लालबाग परळसारख्या कामगार वस्तीत घरची ओढगस्तीची परिस्थिती असेच. शिवाय घरात मुलंही जास्त असत. त्यामुळे शिकायची इच्छा असणाऱ्या मुलांना कमाई करून शिकण्यापलिकडे दुसरा पर्याय नसे. मुलं सहसा ‘पेपरची/दूधाची लाईन टाकणं’ म्हणजे घरोघरी वर्तमानपत्र, दूध पोहोचतं करणं, किंवा सरकारी दूध विक्री केंद्रावर काम करणं ( हे काम मुलीही करीत असत, माझी एक वर्गमैत्रीण वासंती कदम ही आमच्या घराजवळच्या दूध विक्री केंद्रावर काम करीत असे) अशी कामं करीत आणि रात्रशाळेत शिकत. मुली हातात कला असेल तर कागदी किंवा कापडी फुलं, बाहुल्या करणं, वाळवलेल्या पिंपळाच्या पानावर चित्र रंगवणं किंवा भिंतीवर टांगण्यासाठी केल्या जाणाऱ्या लाकडाच्या कटआऊटवर चित्रं रंगवणं (हे बहुधा एअर इंडियाचा महाराजा किंवा बाहुली किंवा स्त्रीच्या आकारात असत, नंतर त्यांची जागा मिकी, डोनाल्ड वगैरेंनी घेतली), शिवणकाम, भरतकाम करणं अशी कामं करून घरखर्चाला हातभार लावत. शालेय शिक्षण संपलं की खरा प्रश्न आ वासून समोर उभा ठाके. महाविद्यालयाचा खर्च परवडत नसे. आर्थिक दृष्ट्या मागासलेले म्हणून फीमध्ये सूट मिळाली तरी कपडे, वह्यापुस्तकं इ. खर्च असतच. सुदैवाने त्या काळी तुम्ही किमान मॅट्रीक पास असाल तर तुम्हाला छोट्या नोकऱ्या मिळणं अवघड जात नसे. त्यातून टंकलेखन, लघुलिपी वगैरेंच्या सरकारी परीक्षा दिल्या असतील तर मग नक्कीच अशा नोकऱ्या मिळत. त्या काळी अशा लोकांसाठी काही ठराविक महाविद्यालयांत का होईना पण एक चांगली सोय होती. ती म्हणजे सकाळचे किंवा संध्याकाळचे वर्ग. त्यामुळे दिवसा नोकरी करून शिकता येई. त्याकाळी समाजवादी विचारसरणीचा पगडा राज्यकर्त्यांवर असल्याने दुर्बल घटकांचा विचार अग्रभागी असे. आदर्शवाद शिल्लक होता. त्यामुळे कामगारवस्तीत, बैठ्या चाळीत रहाणाऱ्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांसाठी या सोयी असत. उदाहरणार्थ कीर्ती महाविद्यालयात जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मुलं येत. महर्षि दयानंदमध्ये गिरणगांवातली. मी ज्या दोन महाविद्यालयात शिकले त्या दक्षिण मुंबईतल्या जयहिंद आणि एल्फिन्स्टन या दोन्ही महाविद्यालयात सकाळचे वर्ग घेतले जात. या महाविद्यालयांमध्ये दिवसाच्या वर्गांना दक्षिण मुंबईत रहाणारी उच्चभ्रू मुलं येत असली तरी काही अपवाद वगळता सकाळच्या वर्गांना गिरगावातल्या, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर इथल्या  चाळींमधली मुलं येत. अपुऱ्या उत्पन्नात, अपुऱ्या जागेत आयुष्य कंठणाऱ्या कुटुंबांतून ती येत असत. या सगळ्यातून कुटुंबाला, स्वतःला बाहेर काढण्यासाठी चांगलं शिक्षण घेतलं, तर चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळेल हे ध्येय त्यांच्या नजरेसमोर असे. एरव्ही दिवसा पूर्ण वेळाचे वर्ग असत. एल्फिन्स्टनमध्ये वामन चव्हाण, सुरेश चव्हाण, सरला गोडबोले, मेघा पाटील, अरूण गायकवाड, पांडुरंग वैद्य, सिद्धेश्वर पाध्ये, शांताराम बर्डे हे माझे सगळेच  वर्गमित्र कुठे ना कुठे नोकरी करीत होते. अरूण रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये, सरला सैन्यदलाच्या लेखा कार्यालयात, वामन, सुरेश बँकेत, तर मी पाणी शुद्ध करणाऱ्या क्लोरीवॅट नावाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी दारोदार फिरणाऱ्या मुली तयार करण्याचं, स्वतः महिलामंडळं आणि इतर संस्थांमध्ये जाऊन त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात डेमो देऊन विक्रीचं काम करीत असे. दिवसा शिकणाऱ्या मित्रांमध्ये नाटककार राजीव नाईक, कलिका पटणी, नंदकुमार सांगलीकर होते. कधी कधी आमच्या बाई विजया राजाध्यक्ष आमची एकत्र व्याख्यानं सकाळी घेत असत तेव्हाच या विद्यार्थ्यांशी आमचा संबंध येई. एरव्ही आमचं अस्तित्व महाविद्यालयात जाणवणं, आमच्याविषयी दिवसा शिकणाऱ्या मुलांना माहीत असणंही कठीणच  असे.

सकाळचे वर्ग पहाटे सहा वाजल्यापासून सुरू होत. त्यामुळे घरातून पाचच्या सुमारास निघावं लागे. त्याकाळी मुंबईतल्या लोकलच्या बायकांच्या वर्गात पहाटे फारशी गर्दी नसे. तरीही कुलाब्याला मासे आणायला जाणाऱ्या कोळणी, सकाळच्या पाळीत काम करणाऱ्या रूग्णसेविका, मुंबई टेलिफोन निगममध्ये सकाळच्या पाळीत काम करणाऱ्या स्त्रिया आणि आमच्यासारखे विद्यार्थी असत. पण बोरीबंदरला उतरल्यावर एल्फिन्स्टन महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता निर्मनुष्य आणि धोकादायक असे. सहसा मी बसने जात असे. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची बहीण कमल कित्येकदा माझ्यासोबत असे. पण कधी पैशांची तुटार असली की चालत जायची पाळी येई. आम्ही नोकरी करीत असलो तरी त्या काळी आमच्यासारख्यांना घरी पगार द्यावा लागे व त्यातून काही ठराविक रक्कम येण्याजाण्याच्या व इतर खर्चापोटी घरातील वडीलधारी व्यक्ती देत असे. त्या पैशात भागवावे लागे. मला त्याकाळी वडील पंचवीस रूपये देत असत. त्यातले लोकलचा प्रवास धरून येण्याजाण्याच्या खर्चासाठी दहाबारा रुपये खर्च  होत. सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे न्याहरी केलेली नसे. मग साडेनऊच्या सुमारास व्याख्यानं संपली की जोरात भूक लागलेली असे. जवळपास सगळ्यांचीच स्थिती माझ्यासारखी असल्याने महाविद्यालयाच्या महागड्या कँटीन किंवा उडप्यापेक्षाही इराण्याकडचा कटींग चहा आणि बनमस्का दोघात मिळून घेणं स्वस्त पडत असे. अर्थात तो मागवायच्या आधी आम्ही आमच्या खिशाचं काय म्हणणं आहे ते ध्यानी घेत असू. माझी फिरती नोकरी असल्याने मी अर्धं काम उरकून घरी जाऊन जेवून पुन्हा बाहेर पडत असे. बाकीचे आपापल्या कामावर जात. घरी जायला संध्याकाळ उजाडत असे. त्यात तुम्ही लघुलिपिक म्हणून काम करीत असाल किंवा निदान परीक्षा दिलेली असेल तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सराव करणं गरजेचं असे. त्यात घरी पोचल्यावर हाती आलेला मोजका वेळ निघून जाई.

माझा  नवरा हरिश्चंद्र थोरात हाही त्यावेळी बॉम्बे स्टेशनरी मार्ट या फोर्टातल्या प्रसिद्ध दुकानात नोकरी करून कीर्ती महाविद्यालयाच्या संध्याकाळच्या वर्गात शिकत असे. संध्याकाळच्या वर्गांना जाणाऱ्यांचीही परिस्थिती जवळपास अशीच असे. घरून खाऊन बाहेर पडत. कामावरून परस्पर महाविद्यालयात जातांना आमच्यासारखेच कुठेतरी थोडे खाऊन घेऊन पळत पळत जात. त्यातून काही महत्त्वाच्या कामानिमित्ताने कार्यालयात थांबावं लागलं की महाविद्यालयात वर्ग सुरू झाल्यावर गुपचूप खालच्या मानेनं वर्गात घुसावं लागे. मी एम.ए. करीत असतांना जनता साप्ताहिकात नोकरी करीत असे तेव्हा माझ्यावरही हा प्रसंग वरचेवर येई. कारण हे वर्ग संध्याकाळी घेतले जात. सुदैवाने ते वर्गही एल्फिन्स्टनमध्येच घेतले जात आणि तिथे वर्गाला एक मागचं दार होतं. तिथून घुसून मागच्या बाकावर बसणं सोयीचं होई. पण त्यामुळे शिकणं फारसं गंभीरपणे मनावर न घेणारे हे उनाड विद्यार्थी आहेत असा काही प्राध्यापकांचा समज होई. माझ्या आणि हरिश्चंद्र थोरातांच्या बाबतीत आमच्या बाई सरोजिनी वैद्य यांचा असा समज झाला होता. अर्थात आमच्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर तो दूर झाला ती गोष्ट वेगळी.

एक गोष्ट आमच्या बाजूची असे ती म्हणजे अशा नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल आमच्या शिक्षकांना विशेष ममत्व असे आणि ते आम्हाला पुस्तकं पुरवित, विशेष वेळ देऊन मार्गदर्शन करीत. माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापिका सरोजिनी शेंडे आणि विजया राजाध्यक्ष या कधीही आमच्यासाठी वेळ द्यायला तयार असत. तोच अनुभव थोरातांनाही रमेश तेंडुलकर, सुभाष सोमण या त्याच्या गुरूंकडून येत असे. हे गुरूजन प्रसंगी विद्यार्थ्यांची फीसुद्धा आपल्या खिशातून भरत असत. तसंच त्या काळी आम्ही एखाद्या विषयावर एखाद्या शिक्षकाचं प्रभुत्त्व असेल तर खुशाल दुसऱ्या महाविद्यालयातही जाऊन बसू शकत होतो. लावणीवरचे शांताबाईंचे किंवा नाटकांवरचं पुष्पाबाई भाव्यांचं व्याख्यान ऐकायला, तेंडुलकर सरांना मर्ढेकरांच्या कवितेवर बोलतांना ऐकायला असे कुणाकडून कळल्यावर आणि जमत असेल तर आम्ही इतरत्र जाऊन व्याख्याने ऐकत असू. एकदा तर सौंदर्यशास्त्र हा आमचा विषय नसतांनाही डॉ. रा.भा. पाटणकर सरांची परवानगी घेऊन आम्ही त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं.

दुसरं म्हणजे त्या काळी बहुतांश महाविद्यालयांची ग्रंथालयं ही रात्री आठ वाजेपर्यंत उघडी असत आणि ग्रंथपालही मदत करीत. कीर्ती महाविद्यालयाच्या बर्वे सरांसारखे ग्रंथपाल तर वाचणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांना मदत करायला तत्पर असत.

असं असलं तरी नोकरीपेशा विद्यार्थ्यांना नोकरीच्या वेळा सांभाळून व्याख्यानांना हजर राहू शकण्याचीच मारामार असल्यामुळे या सगळ्याचा लाभ घेणं फारसं जमत नसे. बहुतांश विद्यार्थी त्यांच्या नोकरीत वेतनवाढ किंवा पदोन्नतीसाठी पदवी मिळवण्याचा खटाटोप करीत असले तरी निव्वळ शिक्षणाची आस असलेलेही काही कमी नव्हते. त्याकाळी शनिवारचा दिवस बहुधा अर्ध्या दिवसाच्या कामाचा असे आणि रविवारी सुट्टी असे. सुदैवाने आत्तासारखे कामाचे तास अनियमित नसत. तेव्हा शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस याचा उपयोग अभ्यासासाठी केला जाई.

आम्हा मराठीच्या विद्यार्थ्यांना दादर पूर्वेला असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मोठाच आधार असे. ते रविवारीही उघ़डं असे आणि रात्री आठ वाजेपर्यंत तिथल्या संदर्भ विभागात बसून वेगवेगळी पुस्तकं घेऊन अभ्यास करता येई. तिथला कर्मचारी वर्गही तत्पर असे. आपल्याला हव्या असलेल्या विषयावरची पुस्तकं आम्हाला माहीत नसली तरी तो विषय सांगितल्यावर तेच पुस्तकं सुचवीत किंवा किमानपक्षी पाच सहा पुस्तकं आणून देत. पाचारणे, जोशीबाई यांच्यासारख्या जेष्ठ ग्रंथपालांइतकेच ज्ञानदेव खोबरेकर, भगत हे आमचे तरूण मित्रही त्याबाबतीत माहीतगार होते. अर्थात त्यावेळी ग्रंथालयाची ती इमारत हे साठोत्तरी कवि, लेखकांचं एक मोठं केंद्र होतं. समकालीन प्रसिद्ध कवी, लेखकांची तिथे येजा असे. अनियकालिकांची चळवळ चालविणाऱ्या तुळशी परब, सतीश काळसेकर, मनोहर ओक, चंद्रकांत खोत यांच्यासह नामदेव ढसाळ, अरूण कांबळे, दया पवार, बाबूराव बागूल, अर्जुन डांगळे वगैरे मंडळी येत असत. रहस्यकथा लिहिणारे श्रीकांत सिनकर तिथे नेमके काय वाचायला येत ते माहीत नाही. पण तेही तिथे पडीक असत. संग्रहालयाच्या बाजूच्या पायरीवर कवी गुरूनाथ धुरी कायम मुक्कामी असत. त्यामुळे त्याला कवीचा कट्टा हे नाव मिळालं. प्रसिद्ध समीक्षक वसंत पाटणकर आणि त्यांचे मित्र नीळकंठ कदम, चंद्रकांत मर्गज, अशोक बागवे यांचा गटही तिथे असे. या कट्ट्यावर संध्याकाळी उशिरा शांताराम पंदेरे आणि त्यांच्या युक्रांदच्या कार्यकर्त्यांचा अड्डाही जमत असे. तिथल्या सभागृहातही साहित्याशी संबंधित विविध कार्यक्रम होत असत. तिथेच मराठी वाङ्मय कोश, इतिहास संशोधन मंडळ यांची कार्यालयं होती. या सगळ्या वातावरणाचा परिणाम आमच्यावर होत होता. त्यामुळे आम्हीही वेगवेगळ्या साहित्यिक, सामाजिक चळवळींकडे ओढले जात होतो. आमचेही गट असत. वामन चव्हाण, प्रकाश कार्लेकर, शशिकला कार्लेकर, तुकाराम जाधव, विजय नाईक, विजय पाटील, अरविंद रे अशा काहीजणांचा आमचाही गट होता आणि मध्येच अभ्यासाची पुस्तकं टेबलावर तशीच टाकून खाली चहावाल्याकडे तावातावाने चर्चा करण्यात आमचा वेळ जात असे हे खरं असलं तरी अभ्यासही होत असे. त्या काळात एक गोष्ट करता आली ती म्हणजे एक एक कवी (त्यात समकालीनांसोबत संत, पंत आणि तंतही आले), लेखक निवडून त्याच्या समग्र साहित्याचे वाचन, त्यावर आलेली समीक्षा किंवा इतर लेखन हे वाचता आलं. अर्थात हे ग्रंथसंग्रहालयामुळेच शक्य होऊ शकलं. पण सगळ्या विषयाचे विद्यार्थी आमच्याइतके भाग्यवान नसत.  फक्त पदवी मिळवायचा ज्यांचा उद्देश असे ते गाईड वाचून परीक्षा देण्याचा पर्याय स्वीकारत.

जरी आमचं अस्तित्व महाविद्यालयात जाणवत नसलं तरी आमच्या परीने आम्ही वेळात वेळ काढून विविध उपक्रमात सहभागी होत असू. मी जयहिंदमध्ये असतांना तर  आमच्या सकाळच्या सत्रात शिकणारे, बीपीटीमध्ये नोकरी करणारे वामन आडनावाचे मित्र आमच्या मराठी वाङ्मय मंडळाचे चिटणीस होते. मीही एल्फिन्स्टनच्या वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमात असे. महाविद्यालयातर्फे मला मराठी आणि हिंदीतल्या वेगवेगळ्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धांना पाठवलं जाई. माझ्या कामाच्या वेळा तशा लवचिक असल्याने ते जमतही असे.

असं असलं तरी दिवसा पूर्ण वेळ महाविद्यालयात शिकणाऱ्या, बाकीचं काही व्यवधान नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली निर्भेळ मजा आम्हाला फारशी अनुभवायला मिळत नसे. संपूर्ण वेळ विद्यार्जनासाठी देऊ शकणे हा खरे तर प्रत्येक तरूणाचा हक्क असायला हवा. त्यासाठी शासन आणि समाजाने काही सोयी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. कारण शिक्षण हे काही फक्त अर्थार्जनाचा हेतू समोर ठेवून करायची गोष्ट नव्हे. शिक्षण तुम्हाला समाजाकडे, आयुष्याच्या विविध पैलूंकडं पहाण्याची एक अंतर्दृष्टी देते. ही अंतर्दृष्टी तरूणांना लाभणं  समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. आजही असे विद्यार्थी असतात. महाविद्यालयांच्या वेळा अशा विद्यार्थ्यांना अनुकूल नसल्या तरी काही विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्यांच्या वेळा अशा असतात की पूर्ण वेळ महाविद्यालयात जाऊनही नोकरी जमू शकते. जसं की दुपारपर्यंत शिकण्यासाठी वेळ घालवून संध्याकाळी वकील, डॉक्टर किंवा सनदी लेखापाल अशा व्यावसायिकांकडे अर्धवेळ नोकरी करणं. मॉलमध्ये किंवा कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी किंवा रात्रपाळीत काम करणं. पण आपली शिक्षणव्यवस्था अशा विद्यार्थांचा विचार करत नाही. त्यांना नोकरी करून नीट शिक्षण घेता यावं यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेगळी सत्रं महाविद्यालयांमध्ये फारशा ठिकाणी उपलब्ध नाहीत.

दूरशिक्षणाची सोय त्यावेळेला नुकतीच सुरू झालेली असली तरी प्रत्यक्ष महाविद्यालयात असणं, आजूबाजूला इतर विद्यार्थी असणं, प्राध्यापक समक्ष पुढे असणं या जिवंत गोष्टी दूरशिक्षणात नसत. संध्याकाळचं किंवा सकाळचं महाविद्यालय आम्हाला चैतन्याने रसरसलेलं वाटे. त्याकाळी ही सोय नसती तर आमच्यापैकी अनेकांना शिकताच आलं नसतं. कदाचित दूरशिक्षणासारख्या व्यवस्थेमधून पदव्या मिळवता आल्या असत्या. नाही असं नाही. पण मग शिकणं ही गोष्ट एवढी अर्थपूर्ण, आनंददायक आणि सर्जनशील झाली नसती. सकाळ संध्याकाळच्या या सत्रांचे माझ्यासारख्या लोकांवर खूप मोठे ऋण आहे.

या निम्न किंवा निम्नमध्यम वर्गातल्या नोकरीपेशा विद्यार्थ्यांहून वेगळे असे नोकरीपेशा विद्यार्थीही आहेत. यांना चांगला लठ्ठ पगार, सोयीसवलती असतात. पण आजकाल अशा नोकऱ्या टिकवायच्या आणि त्यातही वरच्या शिडीवर जायचं तर त्या त्या पेशाला अनुकूल अशी अधिक शैक्षणिक पात्रता मिळवत रहावी लागते. बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या इ. ठिकाणी काम करणारे अधिकारीही आजकाल व्यवस्थापनाची पदवी घेऊ लागले आहेत. प्रसंगी नोकरी सोडून ते ही पदवी घेतात. अर्थात पदवी मिळाल्यावर  अधिक चांगल्या पगाराची नोकरी त्यांच्याकडे चालत येते. याशिवाय बँकांमधल्या कामाशी संबंधित वित्त व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन असे अभ्यासक्रमही केले जातात. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परदेशी पाठवतात. जर्मनी, चीन, जपान इ.ठिकाणी काही वर्षांसाठी जावं लागलं तर तिथली भाषाही शिकून घ्यावी लागते. अशा भाषांचेही अभ्यासक्रम असतात. हे विविध अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खाजगी संस्थांसाठी हा एक मोठा व्यवसाय असतो आणि इतर कुठल्याही व्यावसायिकांप्रमाणे  या खाजगी संस्था आपल्या गिऱ्हाईकांचा खास विचार करतात, त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रमाच्या वेळा ठेवल्या जातात किंवा महाजालावर त्यांची सामग्री उपलब्ध करून दिली जाते. हे थोडे महाग असले तरी ज्या वर्गासाठी ते असतात त्यांना ते परवडू शकतात. असं असलं तरी अशा नोकऱ्या करणाऱ्यांच्या कामाच्या वेळांना मर्यादा नसते, ताणही बराच असतो. हे सगळं सांभाळून अभ्यासक्रम पुरा करणं हे जिकीरीचंही होतं, शारिरीक, मानसिक आरोग्यावर ताण पडतो हेही तितकंच खरं.

या सगळ्यांव्यतिरिक्तही अशा विद्यार्थ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. बरेचदा आपल्या मनात असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आईवडीलांच्या अपेक्षा यामुळे आपल्या आवडीचं शिक्षण घेता येत नाही. मग तडजोड करावी लागते. परंतु आयुष्यात स्थैर्य आल्यावर किंवा थोडा वेळ मिळाल्यावर काही लोक आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून आपल्या आवडीचा विषय शिकतात किंवा छंद जोपासतात जसं की गायन, नृत्य, छायाचित्रण. हे करणाऱ्या लोकांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं असल्याने वेळ, वय वगैरे गोष्टींचं बंधन वाटत नाही. आमच्या ओळखीचे एक मूत्ररोगविशेषज्ञ दिवंगत डॉ. टिळक यांनी वयाच्या पन्नाशीनंतर मराठी साहित्याचा अभ्यास करायला घेतला. त्यांच्या व्यवसायात त्यांचं मोठं नाव होतं, त्यांच्याकडे बरेच रूग्ण उपचार घेत असत, त्यामुळे त्यांना काम आटोपून अभ्यास करायला वेळ होत असे. कुणीतरी सुचवल्याने त्यांनी माझ्या नवऱ्याचं मार्गदर्शन घेतलं. मराठी साहित्यात नुसती पदवी घेऊनच ते थांबले नाहीत तर विद्यावाचस्पती ही पदवी म्हणजे डॉक्टरेटही त्यांनी मिळवली. असेही बरेच लोक असतात.

हे सगळं असलं तरी समाजाचा खालचा स्तर अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. कारण पोटाची भ्रांत त्यांना धड शिकू देत नाही. आमच्याप्रमाणेच अजूनही कित्येक मुलंमुली लहानपणीच पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात. त्यामुळे शिक्षण घेणं त्यांना शक्य होत नाही. कारण आज शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. शिक्षणसंस्था शिक्षणसम्राटांच्या हाती आहेत. रात्रशाळा, सकाळची किंवा संध्याकाळची महाविद्यालयं बंद पडत चालाली आहेत. महापालिकेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. कारण इंग्रजीत शिक्षण हेच खरं शिक्षण असा समज दृढ करून देण्यात आल्याने झोपडपट्टीत राहून अपार कष्ट करणाऱ्या आईबापांनाही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांनी शिकावं असं वाटतं आणि ते परवडेनासं झालं की ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होते.  शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर निम्न वर्गातल्या विद्यार्थ्यांची जी गळती होते आहे ती त्याच वेळी रोखली जायची असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जिचा पाया घातला ती कमवा आणि शिका  योजना महाविद्यालयीनच नव्हे तर शालेय पातळीवरही अंमलात आणली गेली पाहिजे. म्हणजे आईवडीलांना पैशाअभावी मुलांचं शिक्षण थांबवावं लागणार नाही. नोकरीपेशा विद्यार्थ्यांचा एक नवा, आशादायी वर्ग तयार होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s