
आमची ही मैत्रीण एके काळी प्रचंड वाचणारी, वाचून वाचून जाड बुडाचा चष्मा डोळ्यांवर चढलेला. गावी हौसेने बांधलेल्या घरातल्या गच्चीवर एक ग्रंथालय करण्याचं स्वप्न पहाणारी. पण त्या दिवशी तिला विचारलं “काय वाचतेहेस सध्या?” तर तिचं उत्तर ऐकून दचकलेच एकदम. “काही नाही गं, वॉट्स अॅपवर येतं तेच वाचते. खूप असतं तिथे काही काही.”
तेही खरंच आहे म्हणा. तिथे काय नसतं? कविता असतात, दुसऱ्यांच्या कविता ऐकवणारे असतात, पुस्तकांचे दुवे दिलेले असतात. अख्खं पुस्तक वाचायचा किंवा अख्खा लेख वाचायचा कंटाळा असलेल्यांसाठी काही लोक दुसऱ्यांच्या लेखातले, पुस्तकातले ‘निवडक’ भाग, वाक्यं किंवा वाक्यांश टाकत असतात, (तेवढ्यावरून तो लेख, ते पुस्तक वाचल्याचा दावा आपल्यालाही करता येतो.) ‘जिवंत’ नाटकं असतात, बसल्या जागी जगभर फिरून यायची सोय असते (प्रवासवर्णन कशाला वाचायचं उगाच), वेगवेगळ्या विचारवंतांच्या नावावर खपवलेले ‘सुविचार’ असतात (त्यामुळे वैचारिक वगैरे काही वाचायची गरज उरत नाही.), संगीताच्या मैफिली असतात. नृत्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एक मिनिटात करता येणाऱ्या कलाकृती, पाच मिनिटात उरकता येणाऱ्या पाककृती सगळंच असतं. आमच्या लहानपणी फूटपाथवर “कोई भी चीज उठाओ, बे बे आना” असं ओरडणाऱ्या विक्रेत्याकडे असत, तशा सगळ्या जगातल्या यच्चयावत गोष्टी असतात. काही लोकांकडे तर अशा सगळ्या गोष्टींचा धबधबाच सुरु असतो. एकामागोमाग एक कोसळत असतात. कधी कधी त्यात एखादी ‘मोलाची आणि मह्त्त्वाची’ गोष्ट हरवून जाते.
एरव्ही आपण खरंखुरं पुस्तक वाचतो, गाणं ऐकतो, नृत्याच्या आस्वाद घेतो, नाटक पहातो तेव्हा वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या किंवा पहाणाऱ्या रसिकाच्या मनात ती कलाकृती पुन्हा नव्याने घडत जाते, तिच्या अर्थाची वर्तुळं विस्तारत जातात. इथल्या धबधब्यात नहाणाऱ्यांना फक्त पाणी अंगावरुन जाऊ द्यायचं असतं. एकतर त्यांच्यापाशी फार वेळ नसतो (बरंच काही वाचायचं, पहायचं असतं ना ) शिवाय काही पोस्टी उघडल्या की नको बाई किंवा नको बुवा, काही फार इंटरेस्टिंग नाही वाटतं असं म्हणून पुढे सरकता येण्याची सोय असते. त्यामुळे धबधब्यात उड्या मारीत बसायचं न बाहेर पडायचं. पण गंमत म्हणजे एखादी कलाकृती फॉरवर्डतांना मात्र तिची मालकी त्यांनी स्वतःकडे घेऊन टाकलेली असते. म्हणजे ते नाव मूळ कलाकाराचं देतातही कित्येकदा. पण वाहव्वा मात्र त्यांना स्वतःला अपेक्षित असते. ते पुन्हा पुन्हा कोण अंगठे देतंय, कोण बदाम पाठवतंय, कोण वा म्हणतंय, कोण तू फारच थोर आहेस हे कुठून सापडतं तुला असं म्हणतंय, इतकंच नाही तर कोण तू काय थोर लिहिलंयस/केलंयस असं म्हणतंय ते तपासून पहातात. कोण दुर्लक्ष करतंय हे ध्यानात ठेवतात. अशी दाद न देणाऱ्यांचा त्यांना मनापासून राग येतो. त्यांचा अहंकार त्यामुळे दुखावला जातो. तरीही अर्थात ते हार मानत नाहीत. पुन्हा वेगळं काहीतरी फॉरवर्डतात. या वेळी दाद मिळेलच अशी त्यांना खात्री असते. काही लोकांकडून मिळतेही, काही लोकांकडून मिळत नाही. मग ते कायम आपल्या संपर्कातल्या सर्वांना आवडेल अशा पोस्टच्या शोधात रहातात. त्यांच्या आयुष्यातला सगळा वेळ यातच खर्ची पडतोय हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. मुख्य म्हणजे स्वतः काही नवं वाचण्याची पहाण्याची ऊर्मि नष्ट होतेय हेही त्यांना उमगत नाही.
यांच्या व्यतिरिक्त खरा धोकेबाज गट आहे तो म्हणजे गुगलवरुन माहिती मिळवून ती एकत्र करुन लेख लिहिणारे किंवा खरं तर एखादा व्हिडियो बनवून ती माहिती आपणच शोधून काढलीय अशा प्रकारे पसरविणारे. ती वाचणारेही त्यांच्या ‘ज्ञानाचा साठा’ पाहून विस्मयचकीत आणि आदरभावाने सदगदीत होतात. अशा आपण खरोखरीच ‘ज्ञानी’ आहोत असा समज असणाऱ्यांना तर काही अभ्यास करायची गरजच भासत नसते. शिवाय वर सांगितलेल्या गटातले लोक त्यांचं फॉर्वर्डतात तेव्हा त्यांनी या पोस्टची मालकी स्वतःकडे घेऊन टाकल्याने त्यांचीही तीच भावना असते.
दुसरा गट आहे काही तथाकथित विचारवंतांचा, लेखकांचा (खरं तर लिहिणारे सगळेच लेखक, पण हे आभाळातून पडलेले). यांना कधी कधी काही सुचतच नाही. मग ते एक गट तयार करतात. एखाद्या विषयाचं सूतोवाच करतात. काही विचारशक्ती शिल्लक उरलेले लोक हिरीरीने आपली मतं मांडतात, मग यांच्या ‘विचारांना दिशा’ मिळते. मग ते ‘स्वयंस्फूर्ती’ने आणि ‘आत्मनिर्भर’ होऊन एक लेख लिहून टाकतात.
असे लाखो विचारवंत या विद्यापीठीत आज घडीला घडत आहेत. त्यामुळे पुस्तकांची गरज उरलेली नाही अगदीच. प्रकाशकांनी याची कृपया नोंद घ्यावी.
