
रोज सकाळी चालायला खाली उतरलं की वेगवेगळ्या घरांतून वेगवेगळे स्वयंपाकाचे, नाश्त्याच्या पदार्थांचे वास येत असतात. आम्लेटपाव, कुरकुरीत भाजलेला टोस्ट, मेदूवडा सांबार, डोसे, उप्पीट. मीही काहीतरी तयारी करुन ठेवलेली असते वर गेल्यावर नाश्ता करण्यासाठी. पण या वासांनी चालण्यावरचं लक्ष विचलीत होतं.
आज दोन्ही मांजरी कुठेतरी शिकारीला गेल्या असाव्यात. गायब आहेत. त्यामुळे बागेत चिमण्या आणि साळुंख्या निर्वेधपणे काहीतरी टिपताहेत.
ड्यूटीवर नसलेला सुरक्षारक्षक कानाला फोन चिकटवून वाकड्या मानेने भाजी नीट करीत बसलाय. ड्यूटीवर असलेला डोक्याला तेल लावून भांग पाडीत बसलाय.
पुन्हा रस्त्याला लागून असलेल्या बाजूने चालतांना लक्ष गेलं. पलीकडल्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक पाटी हल्लीच उगवलीय. ‘Cash on credit card’. नोटाबंदीनंतरच्या काळात अशा पाट्यांचं पीक आलं होतं. आताही लोकांच्या हाती पैसे नाहीत. त्यामुळे पुन्हा त्यांनी डोकं वर काढलंय. एकीकडे ही पाटी आणि दुसरीकडे बाजूच्या डी मार्टमधून भरभरुन सामान खरेदी करुन कारमध्ये टाकून घेऊन जाणारे. तरी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात साडेसहा वाजल्यापासून डी मार्टला जाणाऱ्यांची रांग असे तशी नसते म्हणा आता. सगळंच मिळायला लागलंय. रस्त्यावर भाजीवाले, फीsssश, फीsssश लो फीsssश असा आवाज देत बाईकवरुन मासे विकणारे, शहाळेवाला सगळे जात असतात.
आता सगळं पूर्वीसारखं चालल्यासारखं वरकरणी तरी वाटतंय खरं, पण किती काळ वाटत राहील हे असं? पुन्हा लाट आली तर काय होईल? मग हे चक्र पुन्हा मागे जाईल का हे विचार भेडसावत असतात. असो.