रस्ता १०

परवा फूटपाथच्या कडेला काही तरुण मुलं कोंडाळं करुन बसलेली दिसली. स्वस्तातले, रस्त्यावर विकत घेतलेले असलेले तरी चांगले कपडे, आधुनिक पद्धतीची केशभूषा, हातात चांगले मोबाईल,

शरीरयष्टी पाहता खात्यापित्या घरची वाटणारी ही मुलं अशी का बसलीत असा विचार करीत असतांनाच तिथे एक माणूस आला आणि त्यांना काही सांगू लागला. मुलं लगेच उभी राहून लक्षपूर्वक ऐकू लागली. थोड्या वेळाने लक्षात आलं की मध्यंतरी अदानी कंपनीची पाइपलाईन टाकतांना पेव्हर ब्ल़ॉक तुटले होते, ते बसवून फूटपाथ रुंदीकरणाचं काम चाललंय तिथे ही मुलं काम करीत असावीत. खरं तर अशा कामाला येणारी मुलं फार हडकुळी म्हणावी अशी सडसडीत असली तरी त्यांचा कामाचा उरक दांडगा असतो. सकाळी ठरल्या वेळी काम सुरु झालं की जेवणाची सुट्टी होईस्तोवर इकडेतिकडे न बघता सटासट काम उरकून टाकायची त्यांची पद्धत असते. पण ह्या मुलांना कष्टाची सवय नसावी. कामातही शिस्त दिसत नव्हती. लाद्या ढकलगाडीत भरुन आणतांना हात भरून येत. मग रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या आड जरा थांबून तो मुलगा विश्रांती घेई. लाद्या उचलून लावणाऱ्या मुलाला त्या नीट रचून ठेवता येत नसत. त्यांच्याकडे पाहिल्यावर कळे की कष्टकरी आईबापांची मुलं असली तरी बाप कुणा शेटकडे ड्रायव्हर, आई कुणा शेटाणीकडे स्वैंपाक करणारी किंवा डायमंडच्या फॅक्टरीत काम करणारी. जरासं बरं आणि नियमित उत्पन्न आणि उत्पन्नाची थोडीफार आणखीही साधनं असलेले आणि बाब्या तू शिकून साहेब हो आम्ही कष्ट करतो असं म्हणणाऱ्या आईवडीलांची ही मुलं असावीत. पण कोरोनाच्या काळात इतकी वर्ष नियमित कमावणाऱ्या आईबापांचं  उत्पन्न बंद झालं असावं आणि कधी काही करायला न लागणाऱ्या ह्या मुलांना आता अशी कष्टाची कामं करायला लागत असावीत. कोरोनाने एकाएकी वर्ग बदलून टाकलेत. कनिष्ठ मध्यम वर्ग रस्त्यावर आलाय. टुकीत राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना महिन्याची दोन टोकं जुळवणं कठीण होतंय.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात आमच्याकडे भाजी घरपोच पोचवणाऱ्या निखिलचं उदाहरण बोलकं आहे. सुखवस्तू, नोकरीपेशा निखिलची नोकरी टाळेबंदीच्या काळात बंद झाली. मग त्याने धडपड करून पालघर, नाशिकहून भाजी मागवून गृहनिर्माण संस्थांमध्ये विकण्याचा उद्योग सुरु केला होता. पण धंध्यात जम बसतोय न बसतोय तोच त्याच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ह्यालाही बंदी केली गेली. आत माल सडून खराब झाला. पुन्हा नोकरी शोधावी लागली. सुदैवाने कोरोनाकाळात जेष्ठ नागरिकांसाठी काम कऱणाऱ्या  एका स्वयंसेवी संस्थेत त्याला नोकरी मिळाली. तिथे उत्पन्न फारसं नसलं तरी नोकरी मिळाली हेच समाधान

कित्येक शिक्षकांनीही भाजीविक्रीचा व्यवसाय स्वीकारल्याच्या बातम्या वाचल्या. अलीकडे तर चक्क एका शिक्षकाने बारमध्ये नोकरी धरल्याचं कळलं.

असे कित्येकांनी आपले मूळ व्यवसाय बदलले. उत्पन्न कमी झालं असलं तरी ते किती का होईना आहे हेच महत्त्वाचं ठरतंय. ‘सुवर्ण कोकण’ची उत्पादनं आम्हाला घरपोच देणाऱ्या बाणेंचा मूळ व्यवसाय चष्मे बनविण्याचा. पण आता ते माल पोचवताहेत. अर्थात जिथे जातात तिथेही चश्म्याचं काम असेल तर सांगा हे म्हणायला विसरत नाहीत. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना कधीतरी आपलं मूळ काम आपल्याला परत मिळेल अशी आशा आहे. पण खरंच तसं होईल का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s