मुंबईतली मांसाहारी भोजनगृहं

माझ्या लहानपणी उपाहारगृहात खायला जाणं ही चैन समजली जाई. आमची शाळा दूर असली तरी सकाळी जेवून निघत असल्याने आणि एकूणच आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळत नसत. कधी मिळालेच तर चणेशेंगदाणे किंवा शाळेजवळच्या बिस्कीटाच्या दुकानात स्वस्तात मिळणारा बिस्कीटाचा चुरा (यात खाऱ्या बिस्कीटांचा थोडी साखर घातलेला चुरा छान लागे) खात असू. आमची शाळा शारदासदन शाळेच्या इमारतीत होती, त्यांच्या कँटीनचा बटाटेवडा चांगला असे पण तो खाल्ल्याचे फार आठवत नाही.

दादर, गिरगावात जी उपाहारगृहं असत ती मुख्यतः ब्राह्मणी खाद्यपदार्थ पुरवणारी असत. गिरगावातल्या कुलकर्ण्यांच्या उपाहारगृहात लोक भजी आणि वालाची डाळिंबी खायला जात. तेव्हा उडप्यांची उपाहारगृहं नुकती उगवू लागली होती. इराण्यांची मात्र ठिकठिकाणी असत. तिथे लोक बनमस्का, खारी यांच्याबरोबरच खिमा पाव, ऑम्लेटपाव खायला जात. मी रहात असे  त्या लालबाग भागात लाडूसम्राट हे प्रसिद्ध दुकान होतं, तिथले लाडू तर लोक खातच शिवाय दादरच्या पणशीकरांकडे किंवा गिरगावातल्या उपाहारगृहात लोक पियूष प्यायला जात तेही तिथे मिळत असे. तिथे मिसळही चांगली मिळे. काळाचौकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर सरदार नावाचं उपाहारगृह होतं. तिथली वांगी भजी प्रसिद्ध होती. तिथे मराठी पदार्थ अधिक असत. नंतर तेही उडप्यांसारखे इडली, डोसा ठेवू लागले.

पण भोजनगृहांच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती होती. दादर गिरगावातल्या भोजनगृहात पुरणपोळी, खरवस, डाळिंबी उसळ, अळूचं फदफदं, उकडीचे मोदक, बटाटा भजी असे पदार्थ रोजच्या जेवणातल्या भाजीआमटीसोबत घेता येत. पण महाराष्ट्रात शाकाहारातही जे प्रांतानुसार वैविध्य आहे ते तेव्हाच्या भोजनगृहांत फारसं आढळत नसे.

मांसाहाराच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती. गिरगाव ते सायन बांद्र्यापर्यंत पसरलेल्या मुंबईत मांसाहारी भोजनात वैविध्य होतं. भायखळा भागात पारसी, मुस्लीम आणि ख्रिश्चन या तिन्ही पद्धतीची मांसाहारी भोजनगृहं होती. बांद्र्यात आणि माहीम भागात गोव्याकडच्या ख्रिश्चन पद्धतीचा आणि मुस्लीम पद्धतीचा मांसाहार देणारी भोजनगृहं होती आणि  मी लालबागहून गिरगावात शाळेत जातांना फोरास रोड भागात तर खूपच छोटी छोटी मांसाहारी भोजनगृहं, भटारखाने आणि तिथे हातावर थापून बनवलेल्या रोट्या रस्त्यालगत असलेल्या शेगड्यावर शेकणारे स्वयंपाकी दिसत असत. असे भटारखाने आजही माहीम भागात आढळतात. फोर्टातल्या हुतात्मा चौकाच्या, जुन्या हँडलूम हाऊसच्या मागच्या गल्ल्यांमध्ये कारवारी आणि केरळी पद्धतीचा मांसाहार पुरवणारी छोटी उपाहारगृहं होती, त्यातली काही अजूनही शिल्लक आहेत. तिथे सकाळच्या वेळी इडीअप्पम्, मलबार परोठा इ. पदार्थ नाश्त्यासाठी मिळत.

लालबाग परिसरात तेव्हा गिरणी कामगार खानावळ्यांमधून जेवत असत. तिथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण तर मिळेच, शिवाय तिथेच आपापली ट्रंक, वळकटी ठेवून गिरणीतली पाळी संपल्यावर वळकटी पसरून झोपताही येई. शिवाय घाटी लोकांची, मालवण्यांची अशा वेगवेगळ्या खानावळी असत तिथे आपल्या आवडीप्रमाणे जेवता येई. पण काही ठिकाणी आमटीच्या नावाखाली पातळ पाणी, भात वाढतांना तर भातवाढीत भाताचा किती पातळ थर घ्यायचा याची स्पर्धा असल्यासारखं वाढत. माझे सासरे घाटावरचे असले तरी चंदर आणि ते काही काळ एका मालवणी बाईकडे जेवत आणि चंदरला ते जेवण आवडत असे. समुद्रातले मासे खाण्याची आवड तिथेच जोपासली गेली.

या खानावळींसोबत कोपऱ्याकोपऱ्यांवर भंडारी भोजनगृहं असत. ही साधारण बोळकंडीसारखी रचना असलेली, मोजकी टेबलं टाकून भिंतीकडे तोंड करून जेवता येईल अशी असत. वाढप्यांच्या कळकट पोशाखाकडे आणि एकूण स्वच्छतेकडे जरा काणाडोळा करावा लागला तरी चव छान असे. तिथे मालवणी पद्धतीचे तळलेले मासे, माशाची विशेषतः बांगड्याची कढी, तिखलं, तिसऱ्या, खेकडे यांच्याइतकेच वज्री, कलेजी, भेजा असले पदार्थ जास्त खाल्ले जात किंवा जवळपासच्या चाळीत रहाणाऱ्या कुटुंबांतून कधी कधी मागवले जात. माझ्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणीची आई लालबागच्या कामगार मैदानाच्या जवळच्या अशाच एका भोजनगृहातून मटण आणायला स्टीलचा डबा देऊन पाठवत असे. भारतमाता सिनेमाजवळ क्षीरसागर आणि दत्त बोर्डींग ही मांसाहारी भोजनालयं नामांकित होती (अजूनही आहेत).  परेल, डिलाईल रोड, ग्रँट रोड भागातही अशी भोजनगृहं मला आढळली होती. चवीच्या दृष्टीने पदार्थ उत्तम असत आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडणारे असत. आमच्या कार्यालयाच्या जवळ, कुलाब्यालाही सेंट्रल नावाचं, तर रिझर्व बँकेच्या मुख्यालयाजवळही असं  एक भोजनगृह होतं. सेंट्रल अजूनही चालू आहे. तिथे जवळच्या ससून डॉकवरून घेतलेले ताजे मासे असल्याने आलंलसूण न लावता केलेले मासेही चवीला छान लागतात. गिरगावात शाकाहारी भोजनगृहासोबत काही मोजकी मांसाहारी भोजनगृहं होती. रेळे बिल्डींगमधलं समर्थ आणि खोताच्या वाडीतलं अनंताश्रम.

आमची शाळा तिथून जवळच असली तरी तिथे जायचा योग फार उशिरा म्हणजे मी बँकेत नोकरी करायला लागल्यावर आला. आसपासच्या कार्यालयातले, बँकांमधले कर्मचारी तिथे जेवणाच्या सुट्टीत खादाडी करायला जात. विशेषतः श्रावण सुरू व्हायच्या आधी तिथे जाऊन जेवायला गर्दी होत असे. जेवायला आलेले नोकरदार संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा घरच्यांच्या खास आवडीनुसार पदार्थ बांधूनही घेत. असे नोकरदारच नव्हे तर आसपासच्या परिसरातील ज्यांच्या घरातल्या बायका काही कारणाने बाहेरगावी गेल्या असतील किंवा अख्खं कुटुंबच बाहेर गेलं असेल असे एकांडे पुरूषही बायका घरी परतेपर्यंत तिथे सकाळसंध्याकाळ जेवायला येत. जयवंत दळवीही तिथे नेहमी जेवायला येत असं म्हणतात. मी एकदा त्यांना तिथे पाहिलंही होतं. ते भोजनगृहाच्या एका विशिष्ट भागातच बसत म्हणे. तिथला स्वैंपाक हा चुलीवर केला जाई. ताजा मसाला पाट्यावर वाटतांना तिथले कर्मचारी दिसत. मसालेही त्यांनी घरी केलेले असत. चपात्या घरच्या चपात्यांसारख्या लागत. मासेही खास ताजे खरेदी केले जात. या सगळ्यामुळेही असेल पण चव उत्कृष्ट असे. पुढे दोन भावातल्या भांडणापायी ते भोजनगृह बंद केलं गेल्याची बातमी वाचल्यावर अनेक खवय्ये हळहळले. नंतर अर्थात मालवणी मांसाहारी पदार्थांच्या भोजनगृहांचा सुळसुळाट गल्लोगल्ली झाला.

मात्र त्या काळी कोल्हापुरी, सातारी पद्धतीच्या मांसाहाराची भोजनगृहं जशी फारशी नव्हती तशीच आजही. विदर्भ, मराठवाड्याकडच्या मांसाहाराबाबतही तेच घडतंय. आगरी आणि कोळी पद्धतीचे पदार्थ देणारी भोजनगृहं तेव्हा मर्यादित असली तरी आता मात्र जागोजागी उपलब्ध आहेतच शिवाय मालवणी खाद्यजत्रेसारख्याच कोळी, आगरी खाद्यजत्राही भरतात. गोमंतकीय पद्धतीचा मांसाहार गेली बरीच वर्षे दादरच्या गोमंतकमध्ये मिळतो. पार्ल्यात गजालीमध्येही बरेच लोक मांसाहारासाठी जातात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचा वैशिष्ट्यपूर्ण मांसाहार काही तुरळक ठिकाणी उपलब्ध होता तसाच तो आजही असला तरी त्यांचाही महोत्सव दर वर्षी आयोजित केला जातो.

नव्वदच्या दशकात एकदा आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘तेंडुलकर्स’मध्ये जेवायला गेलो होतो. तिथला सारस्वती पद्धतीचा कोळंबीचा रस्सा आणि बोंबिल (जे अजिबात तेलकट नव्हते) अप्रतिम होते. पण नंतर तो डायनर्स क्लब झाल्यावर तिथे जाणं अशक्य झालं. तसंही असे प्रकार जनसामान्यांच्या आटोक्याबाहेरचेच. माहीम आणि अंधेरीला असलेलं अवचटांचं दिवा महाराष्ट्राचाही असंच. तिथे कुणीही जाऊ शकतं. जरा वेगळे पदार्थ जसं की भरलेले बोंबिल, भरलेले खेकडे, खिमा थालीपीठ, उकडीचे खिमा मोदक (हा प्रकार मी स्वतःही ऐंशीच्या दशकात करुन पाहिला होता), नारळाच्या दूधातलं कोलंबीचं सूप वगैरे मिळत असले तरी तेही जरा सामान्यांच्या आटोक्याबाहेरचंच.

मुस्लीम पद्धतीचे बिर्याणी, कबाब, खिमा, मटण इ. पदार्थ तर कुलाब्यापासून वांद्र्या कुर्ल्यापर्यंत सगळीकडे मिळत. कुलाब्यातल्या बडे मियाँच्या गाडीवर संध्याकाळी तोबा गर्दी उसळत असली तरी जरा उच्च मध्यमवर्ग दिल्ली दरबारकडे मोहरा वळवत असे. बडे मियाँनेही आता अशा उच्चभ्रूंसाठी एशियाटीक ग्रंथालयापासून दोन मिनिटांवर वातानुकूलित भोजनगृह उघडलंय. खास रमजानच्या काळात आणि एरवीही बारा हंडी, डोंगरी, महंमद अली रोडवरच्या मांसाहारी भोजनगृहांमध्ये सर्वसामान्यांइतकीच गर्दी जरा उच्च वर्गातल्या लोकांचीही असते, याचं कारण तिथे उपलब्ध असलेलं मांसाहारी पदार्थ आणि गोडाच्या पदार्थांचं वैविध्य. विशेषतः वेगवेगळे कबाब, बिर्याणी, हलीम, फिरनी, मालपुवा यांना फार मागणी असते. आता बरेच जण तिथल्या आठवणी काढत मनातल्या मनात मिटक्या मारत असतील.

पण सर्वसामान्य ते उच्च मध्यमवर्गीय लोक हमखास आढळायचे ते इराणी रेस्तराँत. पूर्वी ही मुंबईत पावलोपावली आढळत. तिथला बनमस्का आणि कटींग किंवा नुसताच कटींग घेऊन तास न् तास लोक बसत. विशेषतः तथाकथित इंटेलेक्चुअल लोकांचा तो अड्डाच असे. पण ज्यांना जेवणावर फार वेळ किंवा पैसा खर्च करायचा नसे त्यांच्यासाठी तिथे खिमा पावसारखे झटपट पदार्थ असत. काही ठिकाणचं पुडींग, मावा केक हे प्रसिद्ध असे. अजूनही मरीन लाइन्सल कयानी, चर्चगेटला स्टेडियम वगैंरेसारखे जुने इराणी तग धरुन आहेत. आणि  अजूनही सर्व आर्थिक स्तरातले, सर्व धर्मांचे लोक त्यांना उदार आश्रय देत असतात.

1 thoughts on “मुंबईतली मांसाहारी भोजनगृहं

यावर आपले मत नोंदवा