तरुणपणातल्या धडपडी

तरूणपणी आपण जगण्यासाठी जी धडपड करतो, त्यातून बराच अनुभव गाठीशी येतो. मीही माझ्या तरूणपणी अशीच धडपडत होते. नवव्या इयत्तेत असल्यापासून ते इंटर उत्तीर्ण होईपर्यंतची पाच वर्षं मी चारूशीला गुप्ते ह्या लेखिकेची लेखनिका आणि चिटणीस म्हणून काम केलं. एस.एस.सी.पर्यंत मी काळाचौकीहून मलबार हिलवरल्या त्यांच्या घरापर्यंत रोज येजा करीत असे. एस.एस.सी. नंतर मी त्या ज्या जयहिंद महाविद्यालयात शिकवत असत तिथेच प्रवेश घेतला आणि त्याआधीपासूनच त्यांच्या घरी राहून काम करायला सुरुवात झाली. मी त्यांचा मुलगा प्रणय ( हा फार मोठा वार्ताहर होता, त्या वेळी तो न्यूयॉक टाइम्समध्ये काम करत होता) ह्याच्या खोलीत राहत असे. त्याच्या खोलीतून समुद्र दिसत असे आणि त्याच्या पुस्तकांचा संग्रह फार चांगला होता. ह्या दोन गोष्टींमुळे मी तिथे जरा रमले.

बाई फार स्थूल होत्या. त्यामुळे त्यांना बऱ्याच व्याधी होत्या. त्यांना अधून मधून चक्कर येत असे. त्यामुळे कुणीतरी सतत त्यांच्या सोबत रहावं लागत असे. खरं तर मी त्यावेळी छत्तीस किलो वजन असलेली मुलगी. बाईंना चक्कर आली की आधार देणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने त्यांना ते आधीच जाणवत असे. मग आम्ही कुठेतरी बसत असू चक्कर जाईपर्यंत.

त्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यामुळे त्या बैठकांना जात तेव्हा मला सोबत घेऊन जात. मुख्य चित्रपटगृहात मला एखादा चित्रपट पहात बसवून त्या छोट्या सभागृहात बैठकीला जात. त्या काळात मी बरेच चित्रपट आधी शेवट मग सुरुवात अशा पद्धतीने पाहिले. एकदा असाच शेवट पाहिलेला असल्याने मी बाहेर येऊन बसले आणि चित्रपटाचा नायक कबीर बेदी “So, how did you like it?” असं विचारत आला. मी त्यावेळी बिनधास्त असल्याने कुठलंही दडपण न घेता नाक उडवत बरा होता असं उत्तर दिलं. आमच्या घरात मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये ह्याचे दंडक असल्याने एरव्ही मला हे चित्रपट पाहता आले नसते हेही खरं.

त्या काळात एका बायकांच्या मासिकासाठी बाईंनी बऱ्याच गायक, संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या सगळ्या वेळी मी त्यांच्यासोबत असे. आशा भोसले, सुमन कल्याणपुर, वाणी जयराम, जयदेव, सी. रामचंद्र आदींचा त्यात समावेश होता. त्यापैकी वाणी जयराम त्या वेळी वरळीला एका जुनाट इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर राहत. पहिला मजला असला तरी जिने उंच होते आणि काळोख होता. त्यामुळे बाई पहिल्या वेळी कशाबशा आल्या. नंतर उरलेली मुलाखत घेण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं. मग ठरलेल्या वेळी बाईंनी दिलेली प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रणयंत्र घेऊन मी वाणीताईंकडे गेले. त्या तेव्हा अगदी साधेपणाने राहत. घरात नोकरचाकर नव्हते. त्यामुळे त्यांनीच दार उघडलं आणि त्यांच्या हातचा डोसा आणि कॉफी ह्यांचा आस्वाद घेत मी मुलाखत पूर्ण केली. सी. रामचंद्रही शिवाजी पार्कला एका जुन्या इमारतीच्या गच्चीवरल्या घरात राहत. तिथे बाईंना जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिथेही प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रण यंत्र घेऊन मी संध्याकाळी गेले. त्यांच्या पत्नीने दार उघडलं. पण सी. रामचंद्रांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं,”संध्याकाळी मी कुणाला भेटायच्या स्थितीत नसतो. तुम्ही उद्या सकाळी या.” दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर मात्र ते छान प्रसन्न होते आणि मुलाखत चांगली झाली. सुमन कल्याणपुरांकडे गेलो होतो तेव्हा बहुधा दिवाळी होती. आम्ही गेलो तेव्हा त्या दिवाणखान्यातल्या एका प्रचंड समईभोवती रांगोळी काढत होत्या. ती रांगोळी इतकी सुंदर होती की नजर सतत तिथे वळत होती. सगळ्या ठिकाणी छान आगतस्वागत होई. मंगेशकर कुटुंबियांबाबत मात्र अंतर राखून वागविल्याचा अनुभव आला. खरं तर बाईंचा आणि त्यांचा परिचय फार जुना होता, तरीही असा अनुभव यावा हे नवल. हृदयनाथांच्या बाबतीत मात्र वेगळा अनुभव एकदा आला होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात एकदा त्यांचा कार्यक्रम होता. प्रचंड गर्दीमुळे माझ्या धाकट्या बहीणीला चक्कर आल्यावर त्यांनी स्वतःजवळचं तांब्याभांडं घाईघाईने खाली पाठवलं होतं.

बाईंबरोबर असतांना कित्येक मोठे राजकीय नेते, अभिनयक्षेत्रातली माणसं, कवी, लेखक ह्यांच्याशी संबंध येई. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या बंगल्याच्या मागच्या बागेत खुद्द वत्सलाबाईंनी आम्हाला जेवण वाढल्याची आठवण आहे. राजेश खन्ना त्यांचा विद्यार्थी होता. त्याने एकदा आमच्यासाठी गाडी पाठवली होती. त्या गाडीत गीतकार कपिलकुमार होते. त्यांनी अनुभव ह्या चित्रपटासाठी लिहिलेली गीतं मला आवडत असत. बाईंनी ओळख करून देतांना ही हिंदीतही लिहिते असं सांगितल्यावर त्यांनी माझ्या काही कविता ऐकून चांगलं लिहितेस, लिहित रहा असं सांगितल्यावर बरं वाटलं.

माझं मुख्य काम लेखनिकेचं असलं तरी इतर अनेक कामं करावी लागत. जसं की रामकुमार भ्रमर ह्यांची तमाशावर आधारित एक कादंबरी होती. तिचं भाषांतर बाईंनी करायला घेतलं. खरं तर त्यांचं हिंदी अगदी बेतास बात होतं. मी आठवीत असतांनाच कोविदपर्यंतच्या परीक्षा दिल्याने माझं हिंदी तसं चांगलं होतं. त्यामुळे त्या भाषांतरात मला त्यांना बरीच मदत करावी लागली. त्या आनंदबन नावाचं एक त्रैमासिक लहान मुलांसाठी प्रकाशित करीत असत. एके काळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या त्यांच्या भाषणांमुळे त्या फार लोकप्रिय होत्या. तेव्हा बरेच मोठे मोठे लोक त्या त्रैमासिकासाठी साहित्य देत असत. पण नंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्यावर फारसा मजकुर मिळत नसे. मग काहीतरी भर घालावी लागे. त्या इंग्लंड, अमेरिका आणि रशियाची वारी करून आल्या होत्या. तिथून येतांना त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं आणली होती. त्यातल्या एखाद्या पुस्तकातल्या लोककथेचं किंवा परीकथेचं भाषांतर मी अशा वेळी अंकासाठी करीत असे. माझ्या नावावर आधीच काही मजकुर असेल तर मग हे भाषांतर टोपण नावाने प्रसिद्ध होई. आभा त्रिवेदी हे एक टोपणनाव आठवतं कारण ते मी बरेचदा वापरत असे. बाकी जी काही मनात येतील ती नावं वापरली जात. माझा मधुकर मोहिते नावाचा मित्र अंकासाठी लिहित असे. त्यामुळे एक भाषांतर तर त्याच्याच नावावर खपवलं होतं. त्या काळात बाई वरचेवर आजारी पडत.  कधी कधी बाईंना बरं नसलं तर संपादकीयही लिहावं लागे. अंकातला मजकुर आला की छापखान्यातच बसून तिथल्या तिथे प्रुफ रीडिंग करून मी देत असे. छापखान्यातल्या लोकांना इतकी लहान मुलगी प्रुफ रीडिंग करते ह्याचं फार कौतुक वाटे आणि ते माझ्यासाठी चहा बिस्किटं मागवीत. अंक तयार झाला की वेष्टनावर पत्ते डकवून, मग अंक वेष्टनात गुंडाळून दोन भल्या मोठ्या थैल्यांमध्ये भरून जीपीओत जाऊन दिले की मगच माझं काम संपत असे.

बाई लहान मुलांसाठी एकांकिका स्पर्धाही आयोजित करत. वैद्य नावाचे मंत्रालयातले एक गृहस्थ त्यांना मदत करत असले तरी पत्रव्यवहार करणं, आयत्या वेळी पडणारी कामं करणं हेही माझं काम होतं. बाई विविध वृत्तपत्रांसाठी, नियतकालिकांसाठी लिहित. ते लेख त्या त्या कार्यालयात नेऊन देणं हेही माझं काम असे. त्या खुशाल मला पत्ता देऊन मुंबईभर कुठेही पाठवीत. पोस्टमन, पोलीसदादा ह्यांना पत्ता विचारत मी शोधत जाई. पण माहीत नसलं की पंचाईत होई. एकदा फ्री प्रेस जर्नलचं कार्यालय शोधता शोधता मी शेअर बाजारात पोचले. तेव्हा शेअर बाजारात बायका नसत. त्यामुळे एक तरुण मुलगी आलीय म्हटल्यावर जोरजोरात आरडाओरडा करणारे सटोडिये काही काळ स्तब्ध होऊन मागे वळून पहात राहिले. माझी चूक उमगून तिथून पळाले. नंतर अर्थात ते कार्यालय मला सापडलं. पण ह्या भटकंतीमुळे मला मुंबई चांगलीच माहीत झाली. बेस्टचे बरेचसे मार्ग मला पाठ असत.

एकदा बाईंकडे इंडिया अब्रॉडशी संबंधित वॉल्टर किंवा तसंच काहीसं नाव असलेला अमेरिकन तरुण राहायला आला. तो मुंबईत बसने प्रवास करीत असे. त्याला कुठेही जायचं असलं की हा साडेसहा फूट उंचीचा माणूस कमेरत वाकून मला विचारी, “Chyubangi, how do I go to fountain?” मग मी त्याला कुठून कुठली बस घेऊन कसं जायचं ते समजावीत असे. आमचा हा संवाद ऐकण्याजोगा आणि बघण्याजोगाही असे. गुप्त्यांच्या घरात दारूला मनाई असल्याने त्याच्यासाठी कोरा चहा बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवण्याचं आणि उकडलेल्या भाज्या आणि मासे करण्याचं कामही माझ्या गळ्यात होतं. त्याने मी रांगोळी काढतांना माझं एक रंगीत छायाचित्र घेतलं होतं आणि ते तिथे प्रसिद्धही केलं होतं. ते अजूनही घरात कुठेतरी आहे.

मी बी.ए.च्या पहिल्या वर्षाला जयहिंद महाविद्यालय सोडून एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बाईंची नोकरी सोडली. अर्थात त्यांच्याकडल्या पाच वर्षांनी मला बराच वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव दिला, जो आयुष्यात पुढे फार उपयोगी पडला, बाईंचं हे ऋण माझ्यावर नेहमीच राहील.

एल्फिन्स्टनमधल्या आमच्या विजया राजाध्यक्ष आणि सरोजिनी शेंडे ह्या दोन्ही गुरुंना माझी परिस्थिती माहीत असल्याने त्या दोघीही मला काही कामं मिळवून देत. शिवाय मी शिकवण्याही करीत असे. त्यामुळे माझा खर्च भागत असे. एकदा राजाध्यक्षबाईंनी यंदे नावाच्या एका गृहस्थांशी ओळख करून दिली. त्यांनी पाणी शुद्ध करणारं क्लोरीवॅट नावाचं उत्पादन तयार केलं होतं. त्याकाळी मिनरल पाणी किंवा झिरोबी वगैर नसल्याने ते खपतही होतं. पण त्यांना ते विकण्यासाठी दारोदार जाणाऱ्या विक्रेत्यांना तयार करण्यासाठी तसंच महिला मंडळं आणि कार्यालयांमधून त्याविषयी माहिती देऊन विक्री करण्यासाठी कुणाची तरी गरज होती, त्यासाठी त्यांनी मला नेमलं. मी माझ्या ओळखीपाळखीतल्या आणि नात्यागोत्यातल्या काही तरूणींना तयार केलं. असं फिरतांना काय सावधगिरी घ्यायची ते मला गुप्तेबाईंकडच्या अनुभवामुळे माहित होतंच. ते त्यांना शिकवलं. सुरुवातीला मी त्यांच्यासोबत वस्त्यांमधून जात असे. काही लोक शांतपणे नुसतंच ऐकून घेऊन नकार देत, काही बाटल्या विकत घेत. काही म्हणत आम्ही तुरटी वापरतो, त्याने शुद्ध होतं पाणी. लालबाग, भायखळा, कुलाबा इथल्या पारसी लोकांच्या वसाहतींमध्ये वेगळा अनुभव येई. एकतर घरांमध्ये फक्त वृद्ध असत. दुसरं म्हणजे त्या दरम्यान अशा एकट्या वृद्धांचे खून होण्याच्या घटना वाढीला लागल्याने दहशत होती. त्यामुळे ते दारच उघडत नसत. आतूनच “कोण छो?” विचारीत. ह्यावर मी एक शक्कल काढली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना गाठून त्यांच्या वार्षिक सभेच्या किंवा कार्यक्रमाच्या वेळी दहा मिनिटं मला देण्याची विनंती केली. त्याचा खूप उपयोग झाला. महिला मंडळांमध्येही त्यांच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात मी उत्पादनाविषयी बोलत असे. तिथेही चांगला खप होई. ह्या भटकंतीत कुठेही भूक तहान लागली तर उपाहारगृहात एकटीने जाऊन खाण्याची सवय लागली. त्यामुळे पुढच्या आयुष्यातही कुणाच्या सोबतीवाचून माझं अडत नसे. दोन वर्षं हे काम मी केलं. त्यानंतर एम.ए.ला असतांना जनता साप्ताहिक आणि नंतर बँकेत नोकरीला लागले आणि ह्या सगळ्या धडपडींना पूर्णविराम मिळाला. पण ह्या धडपडींमुळे मी बऱ्याच बाबतीत स्वावलंबी झाले हे मात्र खरं.

2 thoughts on “तरुणपणातल्या धडपडी

  1. तुझी धडपड कळत होती पण आज समजल की मला जाणवली त्याही पेक्षा खूप कष्ट घेतलेस. तुझा नेहमीच अभिमान वाटत आला. तू अशा आठवणी लिहीत रहा. छान लिहीतेस.

    Like

यावर आपले मत नोंदवा