आजी आम्हाला जोजवत हे गाणं म्हणायची. खरं तर तिला घोवाघरी म्हणजे नवऱ्याच्या घरी कधी राहता आलंच नाही. नवरा अचानक वारला आणि पोटी पोर आली म्हणून सासरच्यांनी माहेरी पाठवली. तिची आई खंबीर होती आणि तिनेही माहेरच्यांवर भार न होता दुकान चालवलं म्हणून निभावलं. नाहीतर अशा बायकांची फार परवड होते. त्या काळीच नव्हे, तर आजही.
पूर्वी ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ असं म्हणत तिला परत पाठवलं जाई. आता आईवडील पाठीशी असतात. पण ते गेल्यावर भावांना आपल्या संसारात ही अडगळ नकोशी होते. नोकरी करणारी असेल तर ठीक नाहीतर तिची अवस्था मोलकरणीहून वाईट होते. कारण तिच्या श्रमांना मोलच मिळत नाही.
आजकाल बायका कमावत्या असल्याने कर्ज घेऊन घर घेतात. कित्येकदा सासरची मंडळी तिथेच रहातात. पण ह्या तिच्या मालकीच्या घरातही बाईला ‘आमच्या घरात असं चालणार नाही’ असं ऐकून घ्यावं लागतं. सत्ता सासरच्यांची, नवऱ्याची असते. तरीही हे घर सुनेच्या नावावर आहे ह्याची खंतही असते. एका मैत्रिणीची लहान मुलगी तिला एकाएकी म्हणाली “तू ह्या घराची मालकीण आहेस आणि आम्ही सगळे तुझे नोकर आहोत.” ती हबकली. मग मुलीकडून युक्तीने सगळं काढून घेतल्यावर कळलं की तिच्या सासूने हे नातीला सांगितलं होतं. तिने मुलीला समजावलं की असं काही नाही. घर सर्वांचं आहे. ती बिचारी नोकरी सांभाळून घरातली सगळी कामं करीत सकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत राबत असे. तिची कशावरही मालकी, सत्ता नव्हती.
घोवाघरी रहाणं नेहमी शहाणपणाचं ठरतंच असं नाही याची दोन वेगळी उदाहरणं माझ्याकडे आहेत.
एका बाईंच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईशी संबंध ठेवले. नवरा अपघातात गेल्यावर त्याच्या आईवडीलांना फंड, ग्रॅच्युइटी मिळाली, दुसऱ्या बायकोला अनुकंपा तत्वावर नोकरी आणि ह्या बाईंना घर मिळालं. डोक्यावर छप्पर शाबूत राहिलं असलं तरी त्या अर्धशिक्षित असल्याने नोकरी मिळेना. अखेर काबाडकष्ट करून तीन मुलींचं संगोपन केलं.
दुसऱ्या उदाहरणातल्या बाईंच्या वडीलांनी त्यांच्या नवऱ्याला दारू पिऊन आला म्हणून त्याच्याच घरातून बाहेर काढलं. नवरा परागंदा झाला तो आजतागायत आलाच नाही. वडील हयात असेपर्यंत सगळं ठीक होतं. पण ते गेल्यावर त्यांच्या एका भावाने ते घर बळकावलं. त्याच्यासोबत बाईंचा मुलगा त्या घरात राहिला आणि मायलेकराची ताटातूट करून बाईंना दुसऱ्या भावाच्या घरात ठेवलं गेलं. मुलाचं शिक्षण जरी मामांनी पूरं करीत आणलं असलं तरी त्या बदल्यात मायलेकरांना खूप राबवून घेतलं जातं. बाहेरच्या कुणाशी बोलायला बंदी आहे.
अशा प्रकारे ह्या दोन्ही बायका नवऱ्याघरी असल्या तरी त्यात त्यांना काहीच मिळालं नाही. आता चित्र बदलत असलं तरी स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे ही जाणीव दिसत नाही. आपल्या आवडीनिवडींपेक्षा सासरच्यांच्या आवडीनिवडी जपणाऱ्या बायकांनाच मान्यता मिळते. अगदी मान्यवर बायकांकडूनही त्यांना स्वैंपाक यावा अशी अपेक्षा दिसते. हे चित्र बदलत नाही तोवर तरी ह्या गाण्यात काही अर्थ नाही.
सर्वांना परवडेल असं नाही, पण जर नवराबायकोने प्रत्येकी पन्नास टक्के मालकी असलेलं घर घ्यावं. अर्थात त्यासोबत बायको एक व्यक्ती असून तिला आपल्याइतकेच हक्क, अधिकार आहेत, ह्याची जाणीवही असणं आवश्यक आहे.