श्रमोपाहार१

आमच्या घरकामात मदत करणाऱ्या मावशींनी  माझ्या गरोदरपणात मला खावीशी वाटे म्हणून फणसाची भाजी माझ्यासाठी खास करुन आणली. भाजी छानच होती, माझे डोहाळे पुरवल्यामुळे मी त्यांचे आभार मानतांना म्हटलं, “छान होती भाजी, फक्त जरा तिखट होती. पण चव आली त्यामुळे तोंडाला.” “जल्ला मेला सगला दिस पान्यात हात…” असं म्हणत त्यांची गाडी सुरु झाली. तात्पर्य हे की पाण्यात संबंध वेळ हात (आणि पायही) असल्याने सर्दी होऊ नये म्हणून त्या तिखट खातात. तिखटामुळे आपल्या घशातला सर्दीचा चिकटपणा स्वच्छ व्हायला मदत होत असली तरी वरचेवर तिखट खाल्ल्याने त्यावर काही परिणाम होत नाहीच, शिवाय इतकं तिखट खाल्ल्याने पित्तप्रकोप, मूळव्याध ह्यांसारखे आजार मात्र सोबतीला येतात.

माझं बालपण लालबाग परेल ह्या कष्टकऱ्यांच्या मुंबईत गेलं. तिथे डोक्यावरच्या पेटाऱ्यात  खारी बिस्किटं, बटर, कडक पाव घेऊन हिंडणारे फिरते विक्रेते असत. चहात बुडवल्यावर हे सगळं टम्म फुगत असे. त्याची एक वेगळीच मज्जा असे. गिरणीत काम करणारी माणसं  ह्यातलं काहीतरी – विशेषतः कडक पाव घेऊन तो चहासोबत खाऊन न्याहारीचा प्रश्न मिटवून टाकीत. दिवसभर कष्ट करणारी आमच्या ह्या मावशींसारखी माणसं स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्षच करतात. सकाळी न्याहारी करायला सवडही नसते.  मग नुसताच चहा प्यायचा. किंवा फारतर आधल्या दिवशीची चपाती गरम करुन चहासोबत खायची, शिळ्या भाताला फोडणी देऊन खायचं किंवा परवडत असेल तर खारी, बटर चहासोबत खायचं हाच त्यांचा नाश्ता. कष्ट करणाऱ्या मंडळींनी खरं तर संमिश्र कर्बोदकं आहारात घेतली पाहिजेत. त्यातून त्यांना दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. हल्ली पीठ चाळून घेऊनच वापरलं जातं. खऱं तर कोंड्यासकटच्या धान्यातून मिळणारं कर्बोदक अधिक चांगलं असतं कारण त्यात चोथा असतो. धान्यांप्रमाणे संमिश्र कर्बोदकं  मटार, चवळी ह्यासारख्या शेंगांमध्ये, बटाटा, रताळे ह्यांसारखे कंद (ह्यांच्या विषयीच्या गैरसमजातून ह्या भाज्या आहारातून बादच झाल्या आहेत) आणि केळ्यासारखी फळं, लाल भोपळ्यासारख्या भाज्यांमधून मिळतात. पण हे सगळे घटक वापरुन न्याहारीसाठी काही पदार्थ करावा इतकी उसंत मिळत नसते. परिणामी काही काळाने आरोग्य बिघडत जातं. ह्यासाठी आज सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांमधून करता येण्याजोगे दोन पदार्थ इथे देते. एक कामाच्या दिवशी करायचा आणि दुसरा सुट्टीच्या दिवशी मुलाबाळांसह घरात काही विशेष, वेगळं खाता यावं ह्यासाठी.

शिळा भात बरेच वेळा उरलेला असतो. बऱ्याच घरांतून तो फोडणीला घालून खाल्ला जातो. काही लोक त्यात बेसनाचं पीठ घालून त्याची भजी करतात. ह्याच शिळ्या भाताचा वापर करुन आपल्याला एक चटकदार पदार्थ करता येईल ज्यातून ऊर्जाही मिळेल आणि जीवनसत्वही मिळतील आणि जिभेचे चोचलेही पुरवले जातील. ह्यासाठी लागणारे घटक जसं की कांदा, कोथिंबीर, लसूण, बटाटा किंवा लाल भोपळा हे घरात सहसा उपलब्ध असतात. पण त्या व्यतिरिक्त एका भाजीचा वापर आपण करणार आहोत, जी आजूबाजूला सहज उपलब्ध असते. ती भाजी म्हणजे शेवग्याचा पाला. शेवग्याच्या पानात जीवनसत्व अ, क आणि लोह भरपूर प्रमाणात असते. विशेषतः बायकांना ह्यातल्या लोहाची फार गरज असते.

  • भाताचं थालीपीठ

लागणारे जिन्नस : एक वाटी भात, एक मध्यम कांदा बारीक चिरलेला, एक गच्च वाटी भरून शेवग्याचा पाला बारीक चिरलेला, चार पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किंवा रताळं, पाव चमचा हळदपूड, मालवणी मसाला एक चमचा (तुम्हाला मालवणी मसाला आवडत नसल्यास किंवा घरात उपलब्ध नसल्यास घरी रोजच्या वापरासाठी केलेला मसाला चालेल किंवा धणेजिरे पूड आणि लाल तिखट चालेल), एक मूठ कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी बेसनपीठ ( बेसनपीठाऐवजी आधल्या रात्रीची उरलेली एखादी डाळ असल्यास चालेल, पण फार पातळ नको), चवीनुसार मीठ, लसूण बारीक चिरुन, लाल भोपळ्याचा छोटा तुकडा किसून

कृती  : भात हाताने बारीक करुन घ्यावा, बटाटा/रताळं कुस्करुन घ्यावं. बाकी साहित्य त्यात मिसळून थापता येण्याजोगं पीठ झालं असेल तर ठीक फार घट्ट वाटलं तरच पाणी घालावं. बेसनाऐवजी डाळ वापरली असेल तर तिखटमीठ त्या अंदाजाने कमी करावं, डाळ पातळ असेल तर भाताचं, बटाट्याचं प्रमाण थोडं वाढवावं किंवा घरात असलेल्या पीठांपैकी काही जसं की गव्हाचं, ज्वारीचं  किंवा नाचणीचं पीठ अंदाजाने घालावं . ओल्या रुमालावर किंवा प्लास्टिकच्या तुकड्यावर थापून थालीपीठाला थोडी भोकं पाडावीत. बीडाच्या तव्यावर किंवा निर्लेपच्या तव्यावर भोकातून किंचित तेल सोडून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घ्यावं. ह्यासोबत दही, स़ॉस काहीही चांगलं लागतं पण दुसऱ्या पदार्थासाठी दिलेली चटणी केल्यास उत्तम.

  • सारणाच्या शेवया

लागणारे जिन्नस :

शेवयांसाठी:  तांदूळपीठ २ वाट्या, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल

गोड सारणासाठी : खवलेलं ओलं खोबरं एक वाटी, गूळ पाऊण वाटी, केळं, आंबा (कुठलाही पायरी किंवा रायवळही चालेल), किंवा फणस ह्यांपैकी कोणतेही एक फळ बारीक चिरुन किंवा रस, आवडत असल्यास वेलचीपूड, जायफळपूड

तिखट सारणासाठी : बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी एक वाटी, किसलेलं गाजर एक वाटी, उकडलेले मटारदाणे एक वाटी, आलं,लसूण, हिरवी मिरची ह्यांचा ठेचा आवडीनुसार, चवीनुसार मीठ, लिंबू रस एक चमचा

चटणीसाठी : दोन मध्यम टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे किंवा डाळ्या अर्धी वाटी, लसूण ३-४ पाकळ्या, कढीपत्त्याची पानं अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, लाल तिखट आवडीनुसार

कृती : दोन वाट्या पीठासाठी दोन वाट्या पाणी घेऊन त्यात किंचित मीठ, एक चमचाभर तेल घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर आच बंद करुन पीठ हळूहळू सोडून उलथन्याच्या टोकाने ढवळून पीठ नीट मिसळून घ्यावं. थोडं गार झाल्यावर तेलाचा हात लावून नीट मळून घ्यावं.

गोड सारण करतांना शक्यतो ताडाचा गूळ मिळाल्यास घ्यावा. ताडाच्या गूळात बी २ हे जीवनसत्व असतं जे मज्जातंतूना बळ पुरवतं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, कोबाल्ट हे त्यात बऱ्यापैकी असतात, त्याने ऊर्जा तर मिळतेच शिवाय रक्तक्षय होऊ नये यासाठी त्याचा फार उपयोग होतो. सारणाचे सर्व पदार्थ शिजवून साधारण कोरडे करुन घ्यावेत.

तिखट सारण करतांनाही सर्व घटक पदार्थ एकत्र परतून घेऊन त्यातला पाण्याचा अंश जाईल इतपत कोरडे करुन घ्यावे.

चकलीच्या सोऱ्यात शेवेची चकती लावून उकड काढलेलं पीठ घालून केळीच्या पानावर किंवा प्लास्टीकच्या कागदावर लांबट आकारात शेवया पाडाव्या. गोड किंवा तिखट सारण घालून पानाच्या किंवा प्लास्टिकच्या सहाय्याने गुंडाळी करावी. मोदकपात्रात घालून वाफवावी.

चटणीसाठीचे सगळे जिन्नस एकत्र वाटावे. आवडत असल्यास खोबरेल तेलात राई, हिंगाची फोडणी देऊन चटणीवर घालावी आणि तिखट शेवयांसोबत वाढावी.

संपर्क ९८१९९६३०४५

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s