जिने

काल अशाच गप्पा मारतांना आम्ही लालबागला राहत होतो तिथल्या चाळीतल्या जिन्यांचा विषय निघाला. लालबागमध्ये चांगल्या चारमजली चाळी असत. मध्ये मोकळा चौक, चारी बाजूंनी खोल्या आणि एका बाजूला त्या खोल्यांकडे जाणारे जिने असत. हे जिने रहिवाशांनी तळमजल्यावरून पाणी वाहून नेल्याने निसरडे झालेले, अंधारलेले तर असतच, शिवाय त्यातले काही जिने कोपऱ्यावर वळतांना पायऱ्या त्रिकोणी आकाराच्या केलेल्या असत. त्यांना कठडाही नसे, आधाराला भिंतीला धरु पहाता येत नसे कारण त्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या, निसरड्या झालेल्या असत. संध्याकाळच्या वेळी छोटीशी कळशी घेऊन खारीचा वाटा उचलणाऱ्या माझ्यासारख्या सातआठ वर्षांच्या मुलीला भीती वाटे पडण्याची. अशा वेळी आमच्या जिन्याखालच्या जागेत बस्तान मांडलेला सायमन (ह्याला आबालवृद्ध सगळेच सायमन म्हणून हाक मारीत) मला धीर देई “घाबरु नको बेबी, मी हाय.” पण तरीही माझ्या मनातली भीती जात नसे. पण लपाछपी खेळायला ह्या जिन्यांचा खास उपयोग होई. काही माणसं घरातल्यांवर रुसून जिन्यावर जाऊन बसत. खास प्रसंगावेळी हे जिने स्वच्छ धुतले जात. तेव्हा त्यात भाग घ्यायला मजा येई. तेव्हा मी लहान मुलगी होते. आता जाणवतंय तेव्हा किती नववधू आल्या असतील ह्याच जिन्यांवरुन स्वप्नं पाहत. नंतर सासुरवाशीण झाल्यावर आपल्यासारख्याच सासुरवाशीणीला ह्याच जिन्यांवरुन पाणी आणता आणता सुखदुःखं सांगितली असतील. आम्हा सात बहिणींच्या पाठीवर भाऊ झाला तेव्हा हे जिने चाळीतल्या उत्साही लोकांनी धुवून काढून पताका लावून चाळ सजवली होती. अशी किती बाळं आनंद वाटत ह्या जिन्यांवरून आली असतील.

आमचं सदानंद निवास, आमचे एक आजोबा राहत ते अनंत निवास अशा बऱ्याच चाळीतले जिने असे असत. आमची मानलेली भावंडं राहत त्या हरी ओम निवासातले जिने मात्र चांगले होते. पण तिथे चौकात कचरा टाकण्याची पद्धत होती. त्यामुळे तिथल्या जिन्यांमध्ये कुबट वास पसरलेला असे. चिंचपोकळीकडून काळाचौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माझी मैत्रीण अरुणा राहत असे. त्यांची चाळ छोटीशी एकमजली होती. अशा एकमजली चाळीही बऱ्याच असत. त्यांचे जिने सहसा लाकडी आणि तेही फार सरळसोट असत. इतके सरळसोट की जिना चढतांना पुढच्या पायरीला गुडघा घासला जाईल. ते जिने चढणं हे एक दिव्यच असे. आमच्या जवळच्या एका चाळीचे जिने मला फार आवडत. लोखंडी, नक्षीदार आणि गोल, वळत जाणारे ते जिने सुंदर दिसत. नंतर मोठेपणी कूपरेजवरुन कुलाब्याच्या बेस्टच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर – पोलीस दल किंवा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती होत्या, तिथे असे जिने पाहिले. दक्षिण मुंबईतल्या काही जुन्या इमारतींमध्ये ते दिसत.

मलबार हिलवरच्या हँगिंग गार्डनमधल्या म्हातारीच्या बुटात जायलाही असे वळणारे गोल जिने होते. तिथून वर जायला मज्जा येई. मुंबई विद्यापीठाच्या आवारातल्या राजाबाई टॉवरला असे जिने होते म्हणे. पण तिथे कधी जाताच आलं नाही.

आमच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या भक्कम, दगडी, पण अंधारलेल्या जिन्यांना मस्तपैकी कोनाडे होते बसायला. तिथल्या अंधारात त्या कोनाड्यांमध्ये बसायला फार भारी वाटत असे. माझ्या काही कवितांचा जन्म ह्या जिन्यांच्या कठड्यांवर झालेला आहे. तिथं अंधारात बसून राहायला बरं वाटे

मी जिथे काही काळ काम केलं त्या ‘जनता साप्ताहिका’चं कार्यालय रिगल सिनेमामागे असलेल्या टुलोक रोडवरल्या नॅशनल हाऊसमध्ये होतं. तिथले जिनेही त्या प्राचीन इमारतीसारखे जीर्ण, लाकडी होते. आपण जिने चढायला लागलो की जिन्याच्या पायऱ्या करकर वाजत. एखाद्या दिवशी ह्या पायऱ्या तुटतील अशी भीती वाटे. पण साधारण दहा वर्षापूर्वीपर्यंत ते तसेच होते. आता ती इमारत पाडली गेली.

हळूहळू लालबागच्या चाळीही अशाच पाडल्या गेल्या की हे जिने आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी, जगण्याची ती विशिष्ट शैली हे सगळंही लुप्त होईल.

वडाला बांधलेली सावित्री

परवा बऱ्याच बायकांनी नटूनथटून वडाला दोरा बांधत फेऱ्या घातल्या. ज्यांना वडाकडे जायची फुरसत नव्हती किंवा जवळपास वड नव्हते त्यांनी फांदी पूजली. त्यामुळे बऱ्याच वडांची कत्तल झाली. आता पुढल्या वर्षी ती झाडं उपलब्ध नसल्याने आणखी काही झाडं तोडली जातील. असंच वर्षानुवर्ष चालू राहील. आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमाखातर बायका हा उपास करतात की केवळ परंपरा आहे म्हणून करतात हा प्रश्न मला नेहमी पडतो. नवऱ्याच्या खूप प्रेमात असलेल्या बायका करतही असतील मनापासून. पण बऱ्याच बायका असुरक्षिततेच्या भावनेतून करीत असाव्यात. कारण नवरा आहे तोवर आपण सुरक्षित आहोत ही भावना बऱ्याच बायकांची असते. ‘अखंड सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद आजही बायकांना का आवडावा? कारण त्याचा अर्थच मुळी नवऱ्याच्या आधी मर असा होतो. आणि कुणीतरी आपल्याला लवकर मर असं म्हटलेलं कुणाला का आवडावं? पण बायकांना चक्क ते आवडतं. इतकंच नाही तर आजही सौ अमुकतमुक अशी स्वतःची ओळख करुन दिली जाते. आमच्या एका सहकारी मैत्रीणीने नवे संचालक आले असतांना आपली ओळख नवऱ्याच्या नावासकट सौ अमुकतमुक अशी करुन दिली होती. पूर्वी बायका कमावत्या नव्हत्या तेव्हा नवरा गेल्यावर बाईचे फार हाल होत. सासरची माणसं अशा बाईला घराबाहेर काढत बरेचदा. मग माहेर नसेल तर कुणाच्या तरी आश्रयाला जावं लागे. माझी आजी अशीच आमचे आजोबा ऐन तरुणपणात गेल्यावर माहेरी आली. कुणावर भार पडू नये म्हणून एक छोटं दुकान चालवायची. पण तरुण आणि देखण्या निराधार बाईला गावगुंडांचा त्रास होतो तसा तिलाही झाला. ती सोबत तिखटाची पुडी, कोयता बाळगून असे. आजही बायका कमावत्या आहेत तरीही ही भीती कमी न होता उलट वाढलीच आहे. पण म्हणून आपण लवकर मरावं असं तर बायकांना वाटू नये ना. एक सहकारी मैत्रीण मात्र अशी निघाली जी म्हणत असे “मुळीच नको, मला नवऱ्याच्या नंतर मरायचंय” मला जरा नवल वाटलं आणि कौतुकही. पण तिने जे सांगितलं ते ऐकल्यावर ते लगेच मावळलं. ती म्हणाली,” अगं, माझ्या नवऱ्याला जबरदस्त मधुमेह आहे. त्याचं सगळं खाणंपिणं, पथ्यपाणी, औषधं मीच सांभाळते. त्याला काही म्हणता काssही माहीत नसतं. मी आधी गेले तर त्याची फार पंचाईत होईल. त्याचे फार हाल होतील. त्यामुळे तो असतोवर मला जगायंचय.” तिचं नवऱ्यावरचं प्रेम वाखाणण्याजोगं असलं तरी एखाद्या व्यक्तीला आपल्या आजाराचा तपशील माहीत नसणं हे काही कौतुकास्पद नाही. पण खरंच मी असे कित्येक नवरे पाहिलेत. जे फक्त “अगं माझी गोळी दिली नाहीस” म्हणून आरोळी देतात. स्वतःची औषधं सोडा त्यांना स्वतःचा फोन नंबरही माहीत नसतो. तोही कुणी विचारला तर बायकोला हाक मारत म्हणतात, ”अगं, माझा फोन नंबर काय आहे गं?” अशा लोकांच्या बायका एकाएकी खूप आजारी पडल्या आणि इस्पितळात दाखल करावं  लागलं तर तिला कोणते आजार होते, कधी आणि कोणते अपघात किंवा शस्त्रक्रिया झाल्या होत्या, कोणत्या गोष्टी किंवा औषधांचं वावडं आहे किंवा ती सध्या कुठल्या गोळ्या घेते ह्यातलं काही माहीत नसतं. टीव्हीवरचा एक लोकप्रिय कार्यक्रम बघतांना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच पुरुषांना बायकोच्या साध्यासुध्या आवडीनिवडी ठाऊक नसतात. (एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीविषयी मात्र बरंच काही माहीत असतं). नवरा असो वा बायको आपल्या आजारांविषयीचा तपशील आणीबाणीच्या वेळेसाठी आणि जोडीदाराच्या माहितीसाठी, लिहून ठेवणं गरजेचं आहे. गंमत म्हणजे बायका जर कमावत्या असतील तर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील त्यांना स्वतःला कधीच ठाऊक नसतो. बऱ्याच घरांमधून “तुला काय कळतंय त्यातलं. मी करतो दे.” असं म्हणत नवऱ्याने सूत्रं हातात घेतलेली असतात. आमच्या बँकेच्या गुंतवणूक विभागात बरीच वर्षं काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीची गुंतवणूकही नवऱ्यानेच केलेली होती. किंबहुना ही एकच गोष्ट नवऱ्यांना माहीत असते.

संसारात एकमेकाच्या आवडीनिवडी सांभाळत, एकमेकांना सांभाळत, एकमेकांना फुलवत वाटचाल करायची अपेक्षा असते. पण कित्येकदा एकाच बाजूने सगळी जबाबदारी पेलत बायका कर्तव्यबुद्धीने स्वतःला परंपरांच्या वडाला करकचून बांधून घेत असतात.

रस्ता ९

समोरच्या खारफुटीत राहणारं ते जोडपं आज सकाळी कामावर जोडीने निघालेलं दिसलं. पण ती दोघंच नव्हती. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगी आणि एक बाई होती. चौघं एकत्र बोलत, हसत येत होती. रस्त्यावर पोचल्यावर नवऱ्याने त्या तरुण मुलीला आणि बाईला रिक्षा पकडून दिली आणि दोघंही नेहमीसारखी एकमेकांशी न बोलता चालू लागली. म्हणजे चारचौघांत असतांना त्यांच्याकडे हसण्याबोलण्याचे विषय असतात, मग दोघंच असल्यावर त्यांचा संवाद का खुरटतो, मला जरा काळजीच वाटायला लागली त्यांच्या संसाराची…

ते तिथून गेल्यावर एक तरुण आपली कार घेऊन आला. खारफुटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी त्याने कार लावली. गाडीतून आपल्या अडीच-तीन वर्षांच्या मुलीला घेऊन तो खाली उतरला. मग गाडीच्या टपावर मुलीला बसवून तिची छायाचित्र घ्यायला लागला. मुलगीही अगदी मान कलती करुन पोझ देत होती. मग तिचा चिमुकला हात धरून तो चालायला लागला. रस्त्याच्या कडेला तिला एक लाल कार दिसली. ती वळून वळून पाहत राहिली. मला एकदम आठवलं माझ्या नवऱ्याला लहानपणी तो मुंबईला आला असतांना रोज एक अशीच लाल कार दिसत असे, ती त्याच्या मनात भरली होती. मग तो रोज वडीलांकडे हट्ट धरीत असे आपण ती घेऊ या ना. महिन्याची दोन टोकं कशीबशी जुळवणारे वडील त्याला रोज काहीतरी वेगळा बहाणा सांगत…. आता त्या मुलीचे पाय दुखायला लागले. वडीलांनी तिला पाठीवर उचलून कांदे बटाटे केलं. दोघंही खिदळत होती. मग थोड्या वेळाने गाडीत बसून निघून गेली. किती प्रेम होतं त्या तरुणाचं आपल्या मुलीवर. किती जीव टाकतात आईबापं पोरांसाठी. पण उद्या हीच मुलगी मोठी झाल्यावर आईबापांच्या मनासारख्या क्षेत्रात गेली नाही किंवा हिने जातीधर्माबाहेर लग्न केलं तर केवढा दुरावा येईल. कदाचित नाहीसुद्धा होणार तसं. पण आजूबाजूला पाहिलं की जे दिसतं त्यामुळे मनात शंका येतात. आमच्या एका मित्राने मुलीचं नाव टाकलं. का तर तिने ज्या मुलाशी लग्न केलं तो त्याला पसंत नव्हता. आपल्या मनासारखा डॉक्टर किंवा इंजिनियर न होता गायक, कवी असं काही झालेल्या मुलाशी उभा दावा मांडणारेही मी पाहिलेत. हिचं नाही ना होणार असं काही?

आज पाऊस नव्हता. उन्ह चढायला लागल्याने रस्ता जरा निर्मनुष्य व्हायला लागला होता. त्याचा फायदा घेत एक अगदी सतरा अठरा वर्षांचं जोडपं रस्त्याच्या कडेला थांबलं होतं. मुलगा बाईकवर ऐटीत बसला होता. मुलगी जरा घाबरत बाईकला टेकली होती. काय झालं कुणास ठाऊक एकाएकी दोघांमध्ये वादावादी झाली. त्या मुलीने एका पिशवीतून काहीतरी आणलेलं ती त्याला देत होती. ते नाकारुन त्याने तिला रस्ता दाखवला. मग तिनेही चिडून हातातली पिशवी जवळच उभ्या असलेल्या उघड्या जीपच्या मागच्या बाकावर टाकली, रिक्षा पकडली आणि निघून गेली. ती गेल्यावर काही मिनिटांनी त्याने ते पिशवी घेतली. उघडून पाहिलं तर आत एक कागद होता त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. बाटलीतलं पाणी पिऊन त्याने तो कागद उलगडला वाचला. त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या एक पानी मजकुराची पारायणं करीत राहिला. पुढे काय झालं ते मी पाहिलं नाही. कदाचित त्याने पुन्हा फोन करुन तिला मागे बोलावलं असेल. कदाचित तिची मनधरणी करायला तो तिच्या मागून गेला असेल. काय माहीत काय झालं. पण इथून पुढे काही वर्षांनी कदाचित ती दोघं वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या जोडीदारांसोबतही असतील तेव्हा त्यांना आजचा हा प्रसंग आठवला की काय वाटेल.

असो. मी उगाच विचार करतेय. म्हातारपणात असलेच विचार येतात की काय डोक्यात?

रस्ता ८

आता साखळी तोडण्याच्या नावाखाली वेगळ्या अर्थी टाळेबंदी असली तरी रोज तरुणांची टोळकी फिरत असतात. तशीच एक चौकडी समोरच्या रस्त्यावर धमाल मस्ती करीत होती. इतक्यात मागे असलेल्या फाटकाची हालचाल झाल्यावर ते जरा बाजूला सरले. आतून पायाने फाटक ढकलत एक वयस्कर जोडपं आलं. पुढे गेल्यावर त्यांच्या ध्यानी आलं की नातू मागेच राहिलाय. तो होता सायकलवर. मग पुन्हा मागे येऊन पायाने फाटक ढकललं, नातवाला सोबत घेऊन चालायला बाहेर पडले.

समोरच्या खारफुटीत राहणारं ते नोकरी करणारं जोडपं आज चक्क एकत्र आलं होतं. अर्थात तरीही नवरा पुढे आणि बायको पाच पावलं मागे, खाली मान घालून चालत होती. त्यापेक्षा मला दोन दिवसांपूर्वीचं दृश्य अधिक आवडलं. नवरा लांबून येतांना दिसल्यावर बायको उठून चालायला लागली. त्यामुळे ती पुढे नि नवरा पाठीमागून पळत येतोय. हे जरा नेहमीपेक्षा वेगळं घडलेलं बघायला मज्जा आली. पण नेहमी थोडंच होणार असं.

तेवढ्यात नेहमी साडेसहाच्या ठोक्याला चालायला बाहेर पडणारी मायलेकराची जोडी – तरुण लेक आणि वयस्कर आई- आली. हेही पायाने फाटक ढकलतात. पण काल बाहेर आल्यावर घरातलं उरलंसुरलं पुण्यकर्म म्हणून कुत्र्यांना खाऊ घालतांना मात्र खालच्या जमिनीला हात लागला होता तो पुसला नव्हता त्यांनी. कुत्र्यांना ज्या कागदाच्या पुडक्यात अन्न दिलं  ते पुडकंही सकाळी कचरा नेईपर्यंत तसंच पडलं होतं. आजही दोघं फाटक पायाने ढकलून बाहेर आले खरे, पण झालं काय की कालच्या दातृत्वामुळे कुत्रे त्यांना पाहिल्यावर आठवणीने येऊन पायात घोटाळायला लागले, मग त्यांना हाकलतांना पुरेवाट झाली. त्यात एका कुत्र्याने हात चाटला . मग बाईंनी घाईघाईने ओरडून लेकाकडून हँड सॅनिटायझरमधलं द्रव्य हातवर ओतून घेतलं.

त्यांच्या नंतर फाटकाजवळ येणारी तरुणी मात्र फाटक उघडायचंय, उघडायचंय असं मनाशी घोकत असल्यासारखी लांबूनच हात लांब करीत आली आणि तिने हाताने फाटक ढकललं.

कुत्रे अजूनही आशेने घुटमळत होते. तर एक बाई आल्या. त्यांनी हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीतलं फाफड्यासारखं दिसणारं काहीतरी त्यांच्यासमोर ओतल्यावर कावळेही त्या दिशेने धावले आणि एकच झुंबड उडाल्यावर बाईंची तारांबळ उडाली.

आमच्या परिसरात काय कोण जाणे हे एक खूळ पसरलंय. पक्ष्यांना शेव, फाफडा वगैरे खाऊ घालायचं. सुरुवातीला तर गंमतच झाली. मी एक कावळा पाहिला, त्याची चोच पिवळी होती. मी मनात म्हटलं असा कसा पिवळ्या चोचीचा कावळा. मग दुर्बिणीतून पाहिल्यावर कळलं की त्या कावळ्याच्या चोचीत जाड शेवेचा मोठ्ठा तुकडा आहे. बरं हे उरलंसुरलं खाऊ घालतात असंही नाही. शेजारच्या रोहाऊसमधली बाई पिशवीभर शेव रोज पक्ष्यांसाठी ठेवते. पक्ष्यांच्या आरोग्याचा विचार हे दाते करतात की नाही काय माहीत. त्यांच्या लेखी पुण्य मिळवलं की संपलं.

दुर्बिणीवरुन आठवलं. ह्या काळात कशाचा काय उपयोग होईल सांगता येत नाही . मी पक्षीनिरिक्षणासाठी दुर्बिण वापरत असले तरी एकदा काय झालं की आमच्या लेकाला काही कागदपत्रांसाठी नोटरी हवा होता. समोरच्या बैठ्या घरात एक गृहस्थ नोटरीचं काम करीत हे माहीत होतं. त्यांच्या फाटकावरच्या पाटीवर त्यांचा संपर्क क्रमांक लिहिलेला होता. पण इतक्या उंचावरुन तो दिसेना. आत्ताच्या काळात खाली निव्वळ त्यासाठी जाणं म्हणजे जीवावरच आलेलं. मग चक्क दुर्बिणीचा वापर करुन तो क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. हसू नका वाचून तुम्हीही करा अशी डोकॅलिटी.

कुछ बढिया मंगा लो

एका जाहिरातीत “मॅच है कुछ बढ़िया बना लो” असं नवरा बायकोला फर्मावतो. मग बायको त्याला उलट फर्मावते “मॅच है कुछ बढ़िया मंगा लो”. खरं तर नवऱ्यालाही करता येईल की काहीतरी चटपटीत. काही नवरे करतही असतील. माझ्या चमूतल्या एका मुलाच्या घरी क्रिकेटचा सामना असला की घरच्या बायकांनाही तो निर्वेधपणे बघता यावा म्हणून बाहेरुन सँडविचेस किंवा तत्सम काही पदार्थ मागवले जात. पण काही ठिकाणी नक्कीच घरातला एखादा पुरुष करीत असेल. फक्त मागचा पसारा मात्र बायकोला आवरावा लागत असेल कदाचित. आपल्या कुटुंबात, आजूबाजूला असे बरेच पुरुष दिसतात अधूनमधून (संख्येने फार नसले तरी).

माझ्या वडीलांना स्वयंपाक येत असावा, मी त्यांना भात करतांना पाहिलंय क्वचित. पण घरी ते कधी स्वयंपाक करीत नसत. आई, आजी (आईची आई) आम्ही सात बहिणी असतांना त्यांच्यावर स्वयंपाक करण्याची पाळी फारशी आली नाही. चहा मात्र ते करीत असत. चहा करण्याचं त्यांचं असं तंत्र असे. ते आम्ही चहा केला तरी सांभाळावं लागे. नाहीतर चुकून जास्त उकळला की “विष झालंय त्याचं विष” असं ऐकून घ्यावं लागे. ते चहा करतांना कपाने मोजून आधण ठेवीत. मग उकळ आल्यावर मोजून पण फार कमी साखर घालीत. ती पाण्यात विरघळली की मग चहाची पूडही मोजून टाकीत. लगेच आच बंद करुन झाकण ठेवीत. झाकून घड्याळ लावून तीन मिनिटं ठेवीत. मग कपात दूध गाळलं जाई, तेही मोजूनच. त्यावर मग गाळलेल्या चहाचा अर्क ओतला जाई. आम्ही भावंडं अजूनही ह्याच पद्धतीने चहा करतो.

भावाचंही वडीलांसारखंच. एक तर तो सगळ्यात धाकटा, एकुलता एक मुलगा, आम्ही इतक्याजणी असतांना स्वयंपाकघरात जाणं सोडाच पण साधं पाणीही कधी घ्यावं लागलं नाही. पण आमची सगळ्यांची लग्न झाल्यावर कसा, कधी कोण जाणे पण त्याने स्वयंपाक शिकला असावा. पण हेही तितकंच खरं की त्याला स्वयंपाकाची आवड असावी. त्याची पहिली चुणूक पहायला मिळाली ती माझ्या गरोदरपणात. मुलीच्या वेळी गरोदर असतांना मला सक्तीची विश्रांती देण्यात आली होती डॉक्टरांकडून. सासूबाई आणि घरातली इतर माणसं बाहेर गेली होती. मला लागली भूक. नवऱ्याला काही सुचेना. कारण आम्ही होतो माझ्या दीराकडे. जावेच्या स्वयंपाकघरातलं काही त्याच्या सवयीचं नव्हतं. तेवढ्यात भावाचा फोन आल्यावर नवऱ्याने त्याला ही अडचण सांगितली. भावाने नुकताच ‘क्रॅमर व्हर्सस क्रॅमर’ हा चित्रपट पाहिला होता. त्यात नायक फ्रेंच टोस्ट करतांना दाखवलं होतं. ते पाहून बंधुराजांनी घरी आल्यावर फ्रेंच टोस्ट केला होता. त्याचीच कृती त्याने नवऱ्याला सांगितली आणि मला मस्तपैकी फ्रेंच टोस्ट खायला मिळाले. नंतरही धाकटी बहीण आणि भाऊ शेजारी शेजारी राहात असल्याने तिथे गेलो की जेवतांना तोही काही पदार्थ करुन आणीत असे. त्यातला त्याने केलेला दही घातलेला पुलाव नेहमी आठवतो. आपल्या मुलांना भूक लागली म्हणून स्वयंपाक करणाऱ्या माझ्या माहितीतल्या काही पुरुषांपैकी तो एक. दुसरे आमचे तरुण मित्र शैलेश औटी, उदय रोटे आणि येशू पाटील. शैलेश काही वेगळेच प्रयोग करीत असे. पण त्यातले बरेचसे सफल होत.

माझा नवरा गावी वाढलेला. त्याला बहीण नव्हती. सगळे भाऊच. त्यामुळे घरकामात आईला मदत करावीच लागे. त्यातूनही पाळीच्या काळात बाईला वेगळं बसावं लागल्याने तेव्हा तर स्वयंपाक करावाच लागे. मग लांब वेगळं बसलेली आई हातवारे करीत “अरे मेल्या, अस्सा नाही अस्सा घसरा दे पीठाला” असं सांगत भाकरी करुन घेई. एकदा माझ्या मोठ्या दीरांनी अशाच वेळी शिरा केला. तो इतका कडक झाला की खलबत्त्यात कुटून खावा लागला. धाकटा दीर आमच्या लग्नाआधी मी घरी जाई तेव्हा एकदोनदा मटण केलं होतं ते फार छान झालं होतं. मात्र भाज्या त्याला जमत नसत. गवारीच्या शेंगा न निवडता अख्ख्या ठेवून तो त्याला चटणी लावून परतत असे. पण असा थोडाफार स्वयंपाक येत असला तरी त्याने लग्नानंतर कधीही स्वयंपाकघरात पाउल टाकलेलं मी पाहिलं नाही. नवऱ्याला पोळीभाकरी उत्तम जमतात. भात, ऑम्लेट, चहा चांगला करता येतो, इतर स्वयंपाक सांगितला किंवा कृती लिहून दिली तर उत्तम जमतो. पण हे सगळं तो नाईलाजाने, कर्तव्य म्हणून करतो. आवडीने नाही. पण इतर साफसफाईची कामं मात्र तो आवडीने करतो.

बरेच पुरुष त्यांना स्वयंपाक येत असला तरी आपल्याला स्वयंपाक येतो हे कुणालाही कळू देत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते की एकदा केला की रोजच आपल्याला स्वयंपाक करावा लागेल. एकदा प्रसिद्ध अभिनेते रमेश देव ह्यांनी सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांच्या लग्नानंतर सीमाताईंनी त्यांना सकाळी चहा करायला सांगितला. त्यांनी अगदी किटलीत चहा, दूध, साखर वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घालून कपबशा ट्रेमध्ये ठेवून चहा आणला. पण तो पिण्याजोगा नव्हता. ह्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की मला चहा करता येत नव्हता असं नाही, पण चांगला चहा केला असता तर मला रोजच करावा लागला असता. असा विचार करणाऱ्या पुरुषांनी कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का की रोजच आपल्याला चहा नाश्ता हातात आणून देणाऱ्या आपल्या बायकांनी असा विचार केला असता तर आपलं काय झालं असतं. कित्येक बायकांना लग्न होईपर्यंत स्वयंपाक येत नसतो. लग्नाआधी आई शिकवते किंवा लग्नानंतर सासू शिकवते. पण ठीक आहे, नाही ना तुला स्वयंपाक येत आपण मिळून शिकू आणि करु किंवा बाहेरुन डबा मागवू असं म्हणणारं सासर किंवा नवरा क्वचितच पहायला मिळतो. ह्यावरुन एक गंमत आठवली. एका तरुण मित्राने लग्नाआधी लावलेला डबा लग्नानंतरही चालू ठेवला. बायकोला कळेना हा काय प्रकार आहे. तिला वाटलं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काळजीपोटी ठेवला असेल. नंतर एक दिवस त्याचा मित्र जेवायला येणार होता तेव्हा बायको म्हणाली “डबा नको, आज मी करते स्वयंपाक”. तेव्हा त्याने नवलाने विचारलं,”म्हणजे तुला येतो का स्वयंपाक?” तरीही त्याला खात्री नव्हती, मग तिने केलेला स्वयंपाक मित्राने चाटूनपुसून खाल्ल्यावर खात्री पटली. मग डबा बंद केला. अर्थात नंतर तिला नोकरी लागल्यावर नोकरी आणि शिक्षण दोन्ही चालू होतं म्हणून मग स्वयंपाकाला बाई ठेवली.

आता बऱ्याच ठिकाणी बायका नोकरी करीत असल्याने, कामाच्या वेळा अनियमित असल्याने पोळ्या करायला बाई, किंवा भाजी चिरुन, वाटण वाटून, पीठ भिजवून द्यायला बाई, कधी संपूर्ण स्वयंपाकच करायला बाई अशी गरजेनुसार सोय केलेली असते. पूर्वी उच्चमध्यमवर्गीय घरांमध्येच स्वयंपाकाला बाई किंवा आचारी असे. कनिष्ठमध्यमवर्गीय घरातले  ब्रह्मचारी किंवा विधुर पुरुष बहुधा स्वतः स्वयंपाक करीत. माझे एक मामा आमच्या मामीच्या आजारपणामुळे आणि नंतर ती गेल्यावर त्यांच्या तीन मुलांचं आवरुन स्वयंपाक करीत. माझ्या एका सहकाऱ्यांची आई वारली. त्या धक्क्याने त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्याआधी त्यांनी कधी स्वयंपाकघरात पाऊलही टाकलं नव्हतं. पण घरात दोन लहान मुली. डबा रोज मागवणं किंवा स्वयंपाक करणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे ते स्वतःच हळूहळू स्वयंपाक शिकून करु लागले. पण सहसा अशा घरांमधल्या मुली कितीही लहान असल्या तरी हे काम त्यांच्यावर पडतं. आमची एक चुलती वारल्यावर त्यावेळी दहाबारा वर्षांच्या असलेल्या माझ्या चुलतबहिणीवर पाच भांवडं आणि वडील अशा सहासात माणसांच्या स्वयंपाकाची जबाबदारी येऊन कोसळली. आमच्या शेजारच्या एका कुटुंबातही असाच प्रकार घडला. पण  अशा वेळी घरातल्या मुलाला मात्र स्वयंपाक करावा लागत नाही. घरात मुलगी नसली तरच तो मुलांना/पुरुषांना करावा लागतो.

त्यामुळे काही वेळा पंचाईत होते. आमचा एक अविवाहित मित्र जोवर नोकरी करीत होता तोवर रोज कार्यालयातल्या कँटीनला न्याहारी आणि सकाळचं जेवण ह्यासाठी उदार आश्रय देत असे. संध्याकाळी बाहेर जेवून घरी जाई. निवृत्तीनंतर घर घेऊन दूरवरच्या उपनगरात स्थायिक झाल्यावर रोज चहानाश्ता बाहेर, जेवणासाठी डबा. पण टाळेबंदीच्या काळात त्याला डबा मिळेना. ह्याला तर साधा चहाही जेमतेम करता येई. घरात स्वयंपाकाची भांडीही पुरेशी नव्हती. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून रहावं लागलं. “तुम्ही लिहा तुमचं काय ते, घर मी सांभाळते” असं प्रेमाने म्हणणारी बायको आक्समिकपणे आजारात साथ सोडून गेल्यावर एका प्रसिद्ध नाटककारावर अशीच काहीतरी शिजवून खायची पाळी आली. कित्येकांना तेही जमत नाही. एका पत्रकार मैत्रिणीने अशाच एका मित्राला टाळेबंदीच्या काळात फोनवरुन खिचडी करायला शिकवली. ती अर्धी कच्ची राहिली की जळाली असंच काहीतरी झालं.

माझे वडील आम्हाला सांगत निर्जन बेटावर तुम्हाला कुणी सोडलं तरी जगता आलं पाहिजे. माझ्या धाकट्या बहिणीला स्वयंपाक तर येतंच असे. पण वायरिंग करणं, फर्निचर करणं, सगळ्याप्रकारची तांत्रिक कामं करणं उत्तम जमत असे. वडील म्हणत “हिला एकटीला निर्जन बेटावर सोडलं तरीही ही हातपाय हालवील, तुमचं काय?” स्वयंपाक हेही अशीच एक गरजेची, शिकून घेण्याजोगी गोष्ट आहे – बाईचं काम नव्हे. कारण पोट तर सगळ्यांनाच असतं आणि भूक लागली की खावं हे लागतंच. त्यामुळे तोही सर्वांना आला पाहिजे. अगदी साग्रसंगीत नसला तरी पोटापाण्यापुरता तरी. त्यासाठी लहानपणापासूनच मुलगामुलगी भेद न करता सर्वांनाच तो शिकायला हवा.

आमची मुलं लहानपणापासून स्वयंपाक करीत आली कारण त्यांनी त्यांचे आईबाबा दोघांनाही स्वयंपाक करतांना पाहिलं होतं. आमचा मुलगा सहासात वर्षांचा असतांना त्याने पावाचा चुरा, फ्रीजमध्ये उकडलेला बटाटा ठेवलेला होता, त्याचा लगदा आणि कुस्करलेलं चीज ह्यांच्या मिश्रणात मीठ, तिखट टाकून त्याला वेगवेगळे आकार देऊन पॅटीस केले होते. मुलांना त्यांची कल्पनाशक्ती चालवू दिली की ते बरेच नवे प्रकार शोधू शकतात. कधी कधी गडबड होतेही. एकदा आमची मुलं मावशीकडे रहायला गेली. बहिणीची मुलं आणि आमची मुलं सगळीच सातआठ वर्षांच्या आतली. घरात वडीलमाणसं नसल्यामुळे श्रीखंड करायला घेतलं. त्यातले घटकपदार्थ श्रीखंडाच्या जुन्या डब्यावर पाहून घेतले. इतकं डोकं लढवलं तरी हिंदी अजून शालेय पातळीवर शिकत नसल्याने चिनी म्हणजे काय ह्यावर गाडी अडली. पण अशा वेळी आपण असतोच मदत करायला. आज आमची मुलं उत्कृष्ट स्वयंपाक करतात.(आत्ताच मी लेकाने ऑलिव्ह तेलात जिरं परतून ते कोथिंबीरीसह वाटून केलेला आणि अजिबात हिंवस न लागणारा हलवा मासा खाल्ला.) श्रीनगरमध्ये आमचे जावई पोळ्या भाजताहेत, घरच्या अक्रोडाची आणि मुळ्याची चटणी करताहेत, गूळ घालून शिरा करताहेत अशी छायाचित्र पाहिली की वाटतं आता पुढची पिढीही ह्या दोघांचं पाहून शिकेल. वरच्या छायाचित्रात आमचा एक नातू सात्विक (भाचीचा मुलगा) स्वयंपाक करतोय. असं लहानपणापासून पोटापाण्यापुरत्या गोष्टी शिकलो नाही तर आहेच मग “कुछ बढ़िया मंगा लो”. पण आताच्या काळात एखाद वेळी तेही कठीणच.

रस्ता ७

आज रोजचे ‘निष्ठावंत’ चालणारे दिसत नव्हते. पण टाळेबंदीत काही मिळणार नाही अशा भयाने जवळच्या डी मार्टमधून गाड्या भरभरून सामान नेणाऱ्यांची मात्र वर्दळ होती. समोरच्या खाजणात राहणारं ते नोकरी करणारं जोडपं आज सूर्यास्ताच्या वीसपंचवीस मिनिटं अगोदरच पोचलं होतं. नेहमी नवरा नंतर येतो नि बायको वाट पाहत बसते. पण आज उलटं झालं. नवरा आधी आला. एरवी बायको बिचारी त्याला कितीही वेळ लागला तरी सोशिकपणे वाट पाहते. हा फार अस्वस्थ झाला होता. सारखा रस्त्याकडे पाहत फेऱ्या घालत होता. तेवढ्यात रिक्षातून बायको उतरली. नेहमीसारख्याच तिच्या हातात कांदे, बटाटे, वाणसामानाच्या जड पिशव्या होत्या. ती गरोदर असावी असंही वाटतंय. ह्या गृहस्थाचं मी एक पाहून ठेवलंय. तो आला की आपला वेग अजिबात कमी न करता, बायकोशी एकाही शब्दाची देवाणघेवाण न करता सरळ चालत राहतो, कधी कधी कुणा ओळखीच्या व्यक्तीला हात हलवून अभिवादन करतो. पण बायकोशी काही बोलणं, तिच्या हातातलं ओझं घेणं कधीच नाही. मला आठवतंय आमची मैत्री होती तेव्हापासूनच चंदर- माझा नवरा- माझ्या हातात काहीही असलं -अगदी खांद्यावरची सत्राशेसाठ गोष्टींनी भरलेली पर्सही घेतो. मी मग मोकळेपणी मजेत चालायला लागते. सुनीताबाईंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आठवतंय की त्यांच्या प्रणयाराधनेच्या काळात आणि बहुधा नंतरही पुलंनी कधी त्यांच्या हातातली पिशवी घेण्यासाठी हातही पुढे केला नव्हता हे त्यांना जरा खटकत असे. बायकोची ओझी वाटल्यास तिची तिने वहावीत पण निदान तिची दखल तरी घ्यायला हवी ना? राजीव गांधी पंतप्रधान असतांनाचं एक दृश्य अशी जोडपी बघतांना नेहमी आठवतं. ते कुठल्या तरी दौऱ्यावरून विमानतळावर उतरले. मंत्रीसंत्री सगळे लगबगीने पुढे धावले. पण राजीव गांधीच्या लक्षात आलं की सोनिया मागे राहिल्यात. ते तिथेच थबकले. त्या आल्या मग त्यांना सोबत घेऊनच पुढे निघाले.

हे सर्व मनात येईस्तोवर सूर्य मावळत आला, रस्त्यावरून रोज जाणारं जोडपं दिसलं एकमेकांच्या चालीशी चाल जुळवत चाललेलं

अशी ही थट्टा

आमच्या कार्यालयातले एक जरा वयस्कर सहकारी होते. बरीच तरुण मुलं येताजाता त्यांच्या पाया पडत. मला वाटे बरेच ‘बुवा’ समाजात वावरत असतात, त्यांचं बरंच प्रस्थ असतं, तसं हे कुणी चमत्कारी ‘बुवा’ असावेत. एकदा सहज मी माझ्या ओळखीच्या तरुण सहकाऱ्याला त्याविषयी विचारल्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झाले. त्या गृहस्थांचा असा समज होता की कुणीतरी आपल्याला वाकून नमस्कार केला की त्या व्यक्तीला आपलं सगळं पुण्य मिळतं. म्हणून हे गृहस्थ कुणी त्यांच्या पाया पडलं की उलट त्या व्यक्तीच्या पाया पडत. एक तर ते मध्यमवयीन त्यातून स्थूल, पोट सुटलेलं. त्यामुळे त्यांना असं पाया पडतांना त्रास होत असे. तरीही त्यांचा तो जो समज होता त्यामुळे ते कष्ट पडले तरी पाया पडत असत. त्यांना त्रास होतो ते पाहून ह्या तरुणांना गंमत वाटत असे म्हणून ते मुद्दाम पुन्हा पुन्हा येऊन त्यांच्या पाया पडत.

आम्हीही कुणाकुणाची थट्टा उडवित असू. उदाहरणार्थ वाढदिवसाला एकात एक अशा अनेक खोक्यात छोटीशी भेटवस्तू ठेवणं. एक एप्रिलला तुला फोन आलाय म्हणून त्याकाळी दुर्मिळ असलेल्या कुणाच्या तरी फोनवर बोलायला जायला लावणं. पण आता अशी साधीसुधी थट्टा कुणी करीत नाही. विशेष म्हणजे दुसऱ्याला मनस्ताप होईल अशी थट्टा करुन त्याला होणाऱ्या त्रासाचा आनंद लुटणं आता वाढत चाललंय. आणि तो आनंदही पुन्हा पुन्हा लुटण्याची प्रथाही पडत चाललीय. असं करतांना त्या व्यक्तीला होणारा मनस्ताप, शारिरीक त्रास, कधी कधी त्या साऱ्याचे दूरगामी परिणाम याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं.

माझ्या ओळखीतल्या एका तरुण मुलीच्या बाबतीत घडलेली घटना ह्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. ती कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसायला जात असतांना काही सहकाऱ्यांनी संगनमताने ती खुर्ची अचानक मागे ओढली. त्यामुळे ही मुलगी खाली घसरुन पडली. तिच्या मांडीचं हाड मोडलं. साधारण तीन महिने तिला घरी बसावं लागलं. घरची परिस्थिती चांगली नसल्याने नवरा मध्यपूर्वेत कसलीशी नोकरी करीत होता. त्याला येता येणं शक्य नव्हतं. सत्तरी ओलांडलेली म्हातारी सासू आणि शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. आता तीच अंथरुणावर पडल्यावर घर कसं चालायचं. शेवटी केरळहून तिच्या आईला यावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात ती खाजगी कार्यालयात असल्याने काही दिवसांच्या रजेचा पगार कापला गेला. औषधपाण्याचा खर्च झाला तो वेगळाच. त्यानंतर काही महिने उलटले तरी तिला नीट चालता येत नव्हतं. हे सगळं नुकसान कोण भरुन देणार? तिच्या सहकाऱ्यांनी तर हात झटकले. पण हाच प्रकार त्यांच्या बाबतीत घडला असता तर? निदान आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारुन नुकसानभरपाई तरी आपणहून द्यावी असंही त्यांना वाटलं नाही. ही असंवेदनशीलता फार खुपणारी आहे.

एखाद्याला विशिष्ट गोष्टीचा किंवा वादाचा त्रास होत असेल तर मुद्दाम तो वाद पुन्हा पुन्हा उकरुन काढणं किंवा ती गोष्ट पुन्हा पुन्हा “अरे तो चिडतो ना, मग मज्जा येते फार” असं म्हणत करणं हाही त्यातलाच प्रकार आहे. त्यातून त्या व्यक्तीचा रक्तदाब किंवा पित्त वाढत असेल, त्यामुळे तिला पुढे उपचार घ्यायची पाळी येत असेल तर त्याला कोण जबाबदार?

एखाद्याला किंवा एखादीला अमक्यातमक्याचं किंवा अमकीतमकीचं तुझ्यावर प्रेम आहे असं खोटंच सांगून, किंवा त्या व्यक्तीच्या नावे बनावट पत्र पाठवून त्या व्यक्तीची मजा बघणं हाही सर्रास चालणारा एक प्रकार. ह्या सगळ्यामुळे मुलगी असेल तर तिला आणि घरच्यांना त्रास होतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा थट्टेतून त्या व्यक्तीच्या मनातल्या गैरसमजामुळे कधी कधी तिच्याकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. एक प्रकारे ही हत्याच असते थट्टेथट्टेत केलेली. हलक्याफुलक्या, निरागस थट्टेने मित्र जवळ येतात, आयुष्य थोडं हलकंफुलकं होतं. पण हल्ली तिची जागा ही जीवघेणी थट्टा घ्यायला लागलीय. हे समाजाच्या वाढत्या असंवेदनशीलतेचं लक्षण तर नाही ना?

चालणारीची रोजनिशी-५

कालपासून कोकिळ पक्ष्याची कुहू ऐकू यायला लागलीय. आंब्याच्या मोहोराचा वास तर कधीपासूनच आहे वातावरणात. लस घेतल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी खाली चालायला उतरले. रस्त्यालगतच्या नारळीवर कधी कधी पाणकावळे (Cormorants) आपले पंख वाळवत बसलेले दिसतात, म्हणून आज तिकडे पाहिलं, तर ते गायब होते. म्हणून हिरमुसले. तर पुढे बागेत तांबडा चाफा पूर्ण फुलला होता. त्याचा लालसर रंग फार मोहक दिसत होता निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमिवर. थोडं पुढे गेल्यावर मागल्या भिंतीपाशी बहाव्याला सुंदर, सोनेरी, नाजूक घोस लटकतांना दिसल्यावर माझ्या आनंदाला उधाण आलं. माझी मैत्रीण शोभा भालेकरने (ही लेखिका आहे, नुकतंच तिचं पुस्तक प्रसिध्द झालं)  आमची गृहनिर्माण संस्था उभी राहिली त्या सुरुवातीच्या काळात हे झाड इथे लावलं. पण कुंपणाच्या भिंतीजवळ असल्याने त्याची काटछाट होत राहिली. आताही काही फांद्या उरल्यात. पण त्या तुटपुंज्या फांद्यांवरही बरेच घोस डोळ्यांना मेजवानी देत वाऱ्यावर डोलत होते. तिसऱ्या  फेरीच्या दरम्यान भारद्वाजाचा ऊप, ऊप आवाज घुमायला लागला. कुठेतरी लपून बसून आपल्या भरदार आवाजात हाका घालत होते साहेब. तेवढ्यात निळ्या रंगाचा खंड्या डावीकडून उडत चाफ्याच्या मागे असलेल्या एका निष्पर्ण झाडावर जाऊन बसला. आज मोबाईल जवळ नसल्याचं वाईट वाटलं. पण नंतर लगेच असं वाटलं की मोबाईल असता तर छायाचित्र घेण्याच्या नादात हे सगळं सौंदर्य डोळ्यांनी टिपण्याच्या आनंदाला मुकले असते.

एकूणच असं वाटलं की आज सगळे  माझं खास स्वागत करताहेत, “आलीस का? ये, ये. बऱ्याच दिवसांनी आलीस, म्हणून आम्हीही आलोय. येत रहा गं बयो, दिसत रहा.”

बबडं माझं गुण करतंय

परदेशी असणारा आमचा लेक सध्या भारतात आलाय. आपण सुट्टीवर घरी आलोच आहोत तर म्हाताऱ्या आईवडीलांना जरा आराम द्यावा म्हणून तो स्वयंपाक करतो बरेचदा. पण जर काही जळालं तर मला जळालेलं आवडतं म्हणून स्वतः खातो आणि न जळालेलं आम्हाला देतो. हा त्याच्या स्वभावातला ह्रद्य भाग आहे, हे खरं आणि हेही खरं की कुणीही असं करु नये. पण सहसा बायकाच हे करतांना आढळतात. मला खरपूड आवडते असं सांगत जळालेलं खाणाऱ्या, स्वयंपाक उरला नाही की “नाहीतरी दुपारी जरा जास्तच खाल्लंय, त्यामुळे भूकच नव्हती” असं म्हणणाऱ्या बायका हमखास आढळतात. स्वयंपाक चांगला झाला म्हणून घरच्यांनी मनसोक्त हादडल्यावर उरलासुरला भात किंवा पोळी लोणच्याशी खाणाऱ्या माऊलींना तोटा नाही. तर स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणून घरच्यांनी नीट खाल्लं नाही की उरलंसुरलं शिळंपाकंही याच माऊलीला खावं लागतं. सासुरवाशीणींचं – विशेषतः खेडेगावातल्या – तर पहायलाच नको. शौचाला जायचं निमित्त करुन चोरुन भाकरी खाणाऱ्या सासुरवाशीणींविषयी मी सासू आणि थोरल्या जावेकडून बरेचदा ऐकलंय. आधी दोनतीन मुलीच झाल्या असल्या तर गरोदर बाईलाही “आताही हिच्या पोटाला पोरगीच येती का काय कुणाला दखल” म्हणत उपाशी ठेवणारे सासरचे लोक अजूनही जागोजागी सापडतात.

बाईने कमीच खावं यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीने शास्त्रपुराणांमधून खास बायकांसाठी अनेक व्रतवैकल्यं योजून ठेवलेली असतातच. शिवाय स्त्रीची प्रतिमा अशी तयार केलेली असते की खादाड स्त्री ही नेहमी विनोदाचा विषय व्हावी. संत एकनाथांच्या भारुडातली असो की लोककथांमधली असो, नवऱ्याला कमी खायला देऊन स्वतः हादडणारी किंवा त्याच्या माघारी भरपूर खाऊन घेणारी स्त्री ही विनोदाचा विषय तर असतेच पण तिरस्करणीयही. पुरुष मात्र त्याच्या खाण्यामुळे कधी विनोदाचा विषय ठरत नाही. उलट त्याच्या गाडाभर खाण्याचंही कौतुकच होतं. पुरुषाच्या ह्रदयात शिरायचा मार्ग त्याच्या पोटातून जात असल्याने त्याला भरपूर आणि चांगलंचुंगलं खाऊ घाल असा सल्ला नेहमीच दिला जातो. बायकाही हा सल्ला मनावर घेऊन मनोभावे स्वैंपाकपाण्यात बुडून जातात. स्वैंपाकपाणीच नव्हे तर नवरा आणि मुलांची दिनचर्या, त्यांची कामं ह्या सगळ्यात त्यांचं आयुष्य गुंतलेलं असतं. अगदी वनवासाला जाणारी सीतामाईसुद्धा काय करते हे जात्यावरच्या ओव्यात कसं सांगितलंय पहा-

सीता चाल्ली वनवासा, गेली सांगून तेलणीला।

गेली सांगून तेलणीला। बाई हंडाभर त्याल रामाच्या आंगुळीला।

रामाच्या आंगुळीला।।

सीता चाल्ली वनवासा, गेली सांगून कोळणीला।

गेली सांगून कोळणीला। बाई दहा हंडं पानी रामाच्या आंगुळीला।।

रामाच्या आंगुळीला।।

अशी नवऱ्याच्या आणि मुलांच्या आयुष्याभोवती गरागरा आपलं आयुष्य बांधून घेणारी, उपाशीतापाशी बाई कुणाच्या खिजगणतीत नसते. पण तिला स्वतःला हे कळत नाही का? कळत असावं. आपल्या नशीबी जे होतं ते आपल्या लेकीच्या नशीबी तरी येऊ नये. ती गरोदर असतांना, तिचं बाळ तान्हं असतांना तरी तिने भरपूर खावं प्यावं असं तिला वाटतं. म्हणूनच भातुकलीत रमलेल्या आपल्या बबडीकडे प्रेमाने बघत ती म्हणते

बबडं माजं गुण करतंय, शेराच्या भाकरी तीन करतंय

नवऱ्या मेल्याला येक देतंय, आपल्या जीवाला दोन खातंय

नवऱ्या मेल्याचं काय जायचं, बबडीच्या बाळाला दूद यायचं

कोपरा

मी तिसरीत असतांना ऐन परीक्षेच्या आधी घटसर्पाने आजारी झाले. शाळेत मावसबहिणीकडून निरोप दिला होता. पण तिने चुकून उलटा निरोप सांगितला की ती येणार नाही, नाव काढून टाकायला सांगितलंय. वडील शाळेत गेल्यावर हे कळलं तेव्हा त्यांनी शाळेतल्या लोकांना लेखी पत्र न देता लहान मुलीच्या सांगण्यावरुन हे कसं केलंत वगैरे विचारलं, पण नगरपालिकांच्या शाळेत हे असं होत असावं. मग वडीलांनी मला वर्षभर तब्येत सुधारण्याच्या नावाखाली (टिळकांना डोक्यात खवडे झाले होते तेव्हा त्यांच्या वडीलांनी असंच केलं होतं असं ऐकवत) घरी बसवलं. वडील कामात असत. मोठी भावंडं त्यांच्या व्यापात. आई धाकट्या भावंडांचं करणं, स्वैंपाकपाणी यात गुंतलेली. मग मी उठून चाळीचे तीन मजले उतरुन खाली येत असे. तीनचार मिनिटं चाललं की एक कोपरा होता. तिथे मोठ्या खांबांखाली बसायला अगदी लहान मुलालाच बसता येईल असे चौथरे होते. त्यातल्या एका चौथऱ्यावर बसकण मांडून पुढचे कित्येक तास मी मजेत असे. समोर वाहता आंबेडकर रस्ता. डावीकडे एक रस्ता गणेश टॉकीजवरुन चिंचपोकळीकडे जायचा. समोर लालबाग मार्केट. समोरुन ट्राम, मोटारी, टॅक्श्या, घोडागाड्या, लॉऱ्या,ट्रक, बैलगाड्या, हातगाड्या अशी वाहनं आणि माणसं हे सगळं वाहत चाललंय. तास न् तास. तसंच्या तसंच. मीही तशीच तास न् तास बसून. स्तब्ध, शांत, निवांत. फक्त शांततेखेरीज काहीच नव्हतं.

माझा आणि त्या वर्दळीचा एकमेकांशी काही संबंध नव्हताही आणि होताही. मी त्या वर्दळीचा एक भाग नव्हते. मी धावत नव्हते जीवापाड. मी फक्त त्या वर्दळीची एक प्रेक्षक होते. त्या वर्दळीचा भाग नसल्याने माझ्या मनावर त्याचा काही ताण नव्हता. एखादं चलच्चित्र पहावं तशी ती वर्दळ मी पाहत होते.

वर्षभराने शाळा पुन्हा सुरु आणि आयुष्याची वर्दळही. त्यानंतर कधीच असा निवांत कोपरा मिळाला नाही.