टाळेबंदीतली नाती

आताच्या पिढीला बागुलबुवा माहीत नसेल, कारण हल्ली अशी भीती मुलांना घालणं चुकीचं आहे हे पालकांना कळायला लागलंय. पण आमच्या लहानपणी सर्रास बागुलबुवा बोकाळलेले असत. आता बऱ्याच वर्षांनी ती बागुलबुवाची भीती जाणवायला लागलीय. सोसायटीच्या फाटकापर्यंत गेलं तरी असं वाटतं काहीतरी दबा धरुन बसलंय, आत्ता येऊन आपल्याला पकडणार किंवा भॉssक करणार. एक भीती सर्वत्र पसरलीय.

त्याचा एक भाग असा आहे की आपल्या सवयीचं जे काही आजूबाजूला होतं ते तसं राहिलं नाही. खेडेगावात आयुष्य थोडं संथ असलं तरी दिवसभर जे कष्ट करायचे असतात ते पहाटेच सुरु होतात. मुंबईसारख्या शहरातही पहाटे सगळं सुरु होतं, पण त्यामागे सततचा ताण असतो. घड्याळ्याच्या काट्यावर अख्खी मुंबई धावत असते. इथे रात्रीची निरव शांतता हवीहवीशी वाटे. पण आता चोवीस तासांची शांतता अंगावर यायला लागलीय. घड्याळ्याच्या काट्यावर धावणारं शहर ही मुंबईची ओळखच हरवलीय या काळात. अजूनही काहीतरी हरवलंय. जातीय दंगली असोत, बॉम्बस्फोट असोत, २६ जुलैसारखा हाहाकार असो, अतिरेकी हल्ला असो, मुंबईकर एकमेकांना हात देत त्यातून सावरत पुन्हा धावायला लागतात. आता हे हात हातात घेणं थांबलंय. एक एक इमारत म्हणजे किल्ला झालाय. त्यात बाहेरच्या लोकांना तर जाऊं देत, त्या इमारतीत हक्काचं घर असलेल्या माणसालाही बाधित असल्याच्या किंवा याच्या/हिच्यामुळे बाधा होऊ शकेल अशा आशंकेमुळे आयुष्यभराची कमाई घालवून घेतलेल्या घरातही घेतलं जात नाहीय. एक बाई मेधाताई पाटकरांना सांगत होत्या की त्यांच्या फाटकाजवळून आपल्या घरी परतू पहाणारे रोजंदारीवर जगणारे लोक, मजूर पाहून त्यांना मदत करावीशी वाटत असली तरी सोसायटीतले लोक, रखवालदार त्यांना तसं करु देणार नाहीत हे माहीत असल्याने त्या हतबल झाल्याहेत. हे घरी जाऊ पहाणारे मजूर ना नात्याचे ना गोताचे, पण तरीही त्या बाईंना ते आपले वाटताहेत, तर दुसरीकडे एका पत्रकार मैत्रिणीने सांगितलेला अनुभव असा की एका कुटुंबातले वडील कोरोनाग्रस्त होऊन गेले तर पोलीसांनी सांगूनही मुलं अंत्यदर्शनासाठी घराबाहेर येईनात. कहर म्हणजे नंतर त्यांनी त्या पत्रकार मैत्रिणीला सांगितलं की ती रात्र त्यांनी तळमळत काढली. तेव्हा ती म्हणाली की साहजिक आहे असा प्रसंग ओढवल्यावर होतं असं, बाहेर पडाल त्यातून हळुहळू. तर ते म्हणे की तुम्ही समजताय तसं नाही, इथं विलगीकरण कक्षात पंखा नाही म्हणून तळमळत होतो. अगदी अलीकडे एका आईने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने अनेक मैल प्रवास करुन घरी आलेला मुलगा, सून आणि नातू यांना प्रवेश नाकारल्याची घटना ताजी आहे. तसंच ज्या आरोग्यसेवकांसाठी दिवे लावणं, थाळ्या, घंटा वाजवणं, फुलं उधळणं केलं गेलं त्यांनाच घरातून बाहेर काढणं, वाळीत टाकणं हेही अनुभवाला आलंय.

दुसरीकडे परदेशात अडकलेली मुलं आईबापांच्या अधिक जवळ आलीत. नव्या तंत्रज्ञानामुळे एकमेकांना थेट पहात बोलणं शक्य होतंय. मग मुंबईतले आईवडील, आंध्र प्रदेश किंवा केरळमधली बहीण आणि जर्मनीतला भाऊ एकमेकांच्या वेळा जुळवून एकत्र गप्पा मारताहेत, खेळ खेळताहेत किंवा चहापान करताहेत. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे मनाला घेरुन टाकणारी भीती, एकटेपणा या सगळ्यात अशा भेटींनी धीर मिळतो. शिवाय लांब असलेल्या आईवडीलांसाठी काही करु शकत नाही असं मुलांना आणि मुलांसाठी काही करु शकत नाही असं आईबापांना वाटतंय. अशा भेटींमुळे आपली माणसं डोळ्यांना दिसल्यावर ती सुरक्षित आहेत हे कळल्यावर तो थोडा कमी होतो. त्यामुळे अशा जास्त अंतरावरच्या नात्यांमध्ये कधी नव्हे इतके मानसिक पातळीवर सूर जुळत आलेत आणि नाती घट्ट होताहेत.

चौकोनी कुटुंबात नवराबायको, मुलं आता चोवीस तास एकत्र आहेत, तिथेही टोकाची दृश्य दिसताहेत. कधी नव्हे ते आईबापांशी खेळायला मिळाल्याने लहान मुलं आनंदी झालीत, त्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आईबाप वेगवेगळे खेळ शोधून काढताहेत, कुठे गोष्टी सांगण्याची आमच्या लहानपणातली परंपरा परतून आलीय. कुठे मुलं घरातली छोटी छोटी कामं, स्वयंपाक करायला शिकताहेत. किंवा खरं तर अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा ओढवेल या भीतीने पालक मुलांना ‘आत्मनिर्भर’ करु पहाताहेत.गावी आईबापांसोबत गेलेली मुलं गाईगुरांना चारा घालणं, वाळवणं राखणं यासारखी एरवी त्यांना करायला मिळत नाही अशी कामं करताहेत. प्रश्न निर्माण झालाय तो पौगंडावस्थेतल्या मुलांचा. मित्रमैत्रिणींसोबत धम्माल करता येत नाही, आईवडील घरात असल्याने लैंगिक कुतूहल भागविण्यासाठी पॉर्न पहाता येत नाहीय. परीक्षा लांबत चालल्याने सततच्या अभ्यासाचा कंटाळा आलाय. या सर्वांमुळे मुलं वैतागलीत आणि तो राग आईवडीलांवर काढला जातोय. मुलांच्या बापांचीही अशीच पंचाईत झालीय. भारतीय पुरुषांना अशीही घरात रहायची सर्वसाधारणपणे फारशी सवय नसते. आता ते किराणा, भाज्या आणायच्या निमित्ताने बाहेर जाऊ पहातात म्हणा पण ते काही खरं नाही. काहींना आपल्या बायकांना किती काम पडतं याचा साक्षात्कार झालाय आणि ते ‘मदत’ करु पहातात. अर्थात काही ठिकाणी ही मदत सामाजिक माध्यमांवरच्या दाखवेगिरीपुरतीही असू शकते, पण त्या निमित्ताने का होईना बायकांना किती काम पडतं याची एकूणच कुटुंबांना जाणीव तरी व्हायला लागलीय. असं असलं तरी एकूण असुरक्षितता, नोकरी गमावण्याची भीती, आर्थिक ताण हे सगळं वाढीला लागलंय.  शिवाय मुंबईतल्या छोट्या घरात सगळी माणसं एकाच वेळी एकत्र कोंडली गेली की हातपाय हलवणंही अशक्य. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तर होतोच. पण आधीपासूनच आक्रमक, रागीट असलेल्या, बोलता बोलता हाणामारीवर उतरणाऱ्या व्यक्तींवर त्याचा अधिक परिणाम होतोय आणि यातून घरगुती हिंसाचार टाळेबंदीच्या काळात वाढीला लागलेत. या सगळ्याला बळी पडणाऱ्या व्यक्तीला एरवी जे संरक्षण किंवा मदत मिळू शकते ती आता सहजासहजी मिळणं शक्य नाही याची जाणीव असल्याने धरबंदही रहात नाही.

धारावीसारख्या किंवा गिरणगावासारख्या इतर भागात घरं छोटी असली तरी एकाच घरात अनेक माणसं रहातात. त्यात कुटुंबातली माणसंच नव्हे तर दूरच्या नात्यातली, गावाकडच्या ओळखीची अशी माणसंही असतात. पूर्वी ती कामानिमित्त, शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या वेळी बाहेर जात त्यामुळे वेगवेगळ्या वेळी घरी असत. रात्री जागेची अडचण होऊ नये म्हणून त्यातली काही बाहेर दुकानाच्या फळीवर, समाजकल्याण केंद्र, मंदिर अथवा तत्सम ठिकाणी किंवा पदपथावर झोपायला जात. आता तेही शक्य नाही. त्यामुळे सगळी एकत्र कोंबलेली. परिणामी उरलासुरला खाजगी अवकाशही नाहीसा झालाय. याआधी कुटुंबातले नसले तरी सोबत रहाणाऱ्या इतरांना कुटुंबातल्यासारखंच वागवलं जाई. आता त्यांची अडचण व्हायला लागली. घरातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेशी साधनं हाती नाहीत. मोबाईल रिचार्ज करायला आईबापांकडे पैसे नाहीत, मुलांना पैसे कमावण्यासाठी, निदान आपला खर्च भागवण्यासाठी पूर्वी करता येत असे तसं काम करता येत नाही, त्यामुळे आपण इतर मुलांच्या तुलनेत कमी पडतोय असं वाटून त्यांना नैराश्य येत चाललंय. त्याचा परिणाम म्हणून आईबापांशी तणातणी वाढलीय.

या सगळ्या वेगवेगळ्या छटा नात्यांना दिसताहेत याचं कारण काय असावं? नाती तर तीच आहेत जी टाळेबंदीआधी होती. मग असे बदल का घडताहेत? टाळेबंदीच्या काळात माणसांना स्वतःविषयी भीती आहे, तशीच इतरांविषयीही. आत्तापर्यंत जे जीवाभावाचे होते, ते जीवाच्या भीतीने आता ‘इतर’ झालेत. पूर्वीच्या नातेसंबंधांची लय या सगळ्यामुळे जुळत नाहीय. नवं निवडता येत नाही.विस्कटणाऱ्या शक्तींची ताकद वाढती आहे आणि संबंधांची नवी रूपे दिसत नाहीत. आता खरं तर हे सगळं लोक प्रेमसंबंधात It’s complicated असं जाहीर करतात, तसं गुंतागुंतीचं होत चाललंय. अशा वेळी नाती टिकवायला जगण्याच्या शैलीत, मानसिकतेत बदलाची आवश्यकता आहे. जिथे शक्य असेल तिथे एकाच घरात इतरांना शारीरिक आणि मानसिक अवकाश देण्याची आवश्यकता आहे. शारीरिक अवकाश एक वेळ परवडत असेल तर आखून देता येईल, पण मानसिक अवकाशाचं काय? असाही स्त्रिया आणि लहान मुलं यांना वेगळा अवकाश लागतो, तो देण्याची गरज आहे हे आपल्या देशात सहजपणे मान्य केलं जात नाही. आता तो विशेषत्वाने द्यायची गरज आहे. पण दिला जाईल का? या सर्वस्वी अनोळखी रोगाच्या संसर्गाच्या भीतीने इतकं ग्रासलं आहे की आपल्याला इतरांचा संसर्ग होऊ नये, आणि आपला इतरांना होऊ नये अशा दोन्ही प्रकारे काळजी घेऊन संबंध ठेवणं कठीण जातं आहे. मुळात या रोगाची भयावह अशी धास्ती खोलवर रुजली आहे, ती काढून टाकण्याची गरज आहे. रोग जरी भयानक असला तरी योग्य ती काळजी घेऊन संबंध राखता येतील अशी काही घडी बसवली गेली पाहिजे. भारतीय नातेसंबंधात स्पर्शाला आधीच्या पिढीत फारसं महत्त्व नव्हतं. पण आता हात मिळवणं, आलिंगन देणं हे सहज होत चाललं होतं. या परिस्थितीत ते शक्य नसलं तरी त्यातून विनोदबुद्धी शाबूत ठेवून काही उपाय शोधले जाताहेत ते खरंच फार ह्रद्य वाटतात. पण स्पर्शातल्या आश्वासकतेला, आधाराला, ऊबेला पर्याय शोधला पाहिजे.  तो पर्याय आहे मानसिक पातळीवर जोडले जाण्याचा. हे आव्हान फार अवघड नाही, फक्त त्यासाठी दोन पावलं आपल्या बाजूने टाकण्याची गरज आहे.