गुन्हा

आम्ही मॉरिशसला गेलो होतो तेव्हा चंदरच्या विद्यार्थ्याच्या घरी गेलो होतो. त्याचे वृद्ध वडील अजूनही महाराष्ट्रातल्या गावाकडच्या दोन इसा, तीन इसा अशा भाषेत त्यांचं वय सांगत होते. चंदर म्हणायचा या लोकांकडे पाहिलं की माझ्या पोटात कालवतं. जेव्हा इथल्या लोकांना मजूर म्हणून इथे आणलं गेलं तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की आपलं गाव, आपलं घर आपल्याला पुन्हा दिसणार नाही. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं असेल तेव्हा त्यांच्या मनात कोणतं काहूर उठलं असेल. आपल्या मुलुखापासून, आपल्या मातीपासून दूर मरण येणं यापरतं दुःखदायक काय असेल. माझ्या सासूबाई शेवटच्या काळात वरचेवर आम्हाला सांगत  मी मेले की मला गावी नेऊन जाळा. खरं तर गेल्या जीवाला ममई काय अन गाव काय, पण मेल्यावरही कित्येकांना आपल्या मातीत रहायचं असतं. आपलं घर कसं का चंद्रमौळी असेना, तिथे कितीही गैरसोय का असेना, पण तिथे सुरक्षित वाटतं. गोड वाटतं. माझा एक मूळचा हिमाचलचा, पण मुंबईत स्थायिक झालेला मित्र दरवर्षी मुलीला गावी घेऊन जात असे. मुंबईत जन्मलेली, वाढलेली ही छोटी मुलगी धरमशाला जवळ यायला लागलं की म्हणायची आपल्या गावाचा, मातीचा सुगंध येतोय. अगदी आमच्यासारखे मध्यमवर्गीय, सुखवस्तू लोकही विरार लोकलच्या भयानक गर्दीत दारात लटकत राहून प्रवास करतात तेव्हा त्यांना फक्त समोर घर दिसत असतं. ते घर चालवायला पैसा ज्या त्यांच्या कामाच्या ठिकाणामुळे मिळतो त्याबद्दल त्यांना प्रेम नसतं असं नाही, ते एकनिष्ठतेने, प्रामाणिकपणे कष्ट करतात. पण धोधो पावसात मुंबई बुडत असतांना समोर घरात अडकलेलं लेकरु दिसत असतं म्हणून ते खांद्यापर्यंतच्या पाण्यातून चालत जायचा, प्रसंगी गटारात बुडून मरायचाही धोका पत्करतात. माझी मोठी बहीण आरती भोगले ही मुलगा लहान असतांना कित्येकदा दक्षिण मुंबईतल्या विधानभवनातल्या तिच्या कार्यालयातून मुलुंडच्या घरी गुडघाभर पाण्यातून चालत गेलीय.

रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाणारे कित्येक असतात. आम्ही कळव्याला रहात होतो तेव्हा काही कारणाने लोकल धावत नसल्या तर रिकाम्या ट्रॅकवरून ठाण्याला चालत जात असू. कारण रस्त्यावरून गेलं तर चाळीस मिनिटं लागत, तेच ट्रॅकवरून चालत गेलं तर वीस मिनिटं लागत. फार काळजी घेऊन चालावं लागे. पायात चपला असतं त्या तसं चालतांना निसटत. खडी त्या चपलांमधून टोचत असे तर कधी त्यांना भोक पडत असे. खाली नाला असेल तर मग बघायलाच नको, पण लोक एकमेकांना आधार देत चालत कारण समोर मस्टर दिसत असे.

दिवसभर बैठं का होईना काम करून थकलेले कित्येक लोक डोळा लागल्याने यार्डात पोचलेले पाहिलेत आपण. भुकेने, कष्टाने, धास्तीने थकलेलं शरीर म्हणत पाच मिनिटं बसू जरा आणि नकळत झोपेच्या गाढ अंमलाखाली जातं ते कळतही नाही.

निरनिराळे ताण सहन करीत रूळावरून वाट चालणाऱ्या त्या मजुरांचा डोळा बसल्या बसल्या लागला हा  त्यांचा गुन्हा आहे का?

मग गुन्हा कुणाचा आहे?