दिव्याखालचा अंधार

दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरियात काल आमचा मुलगा तिथल्या लोकांनी जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येविरोधात पुकारलेल्या संपात सामील झाला. आमचे मित्र कुमुद कोरडे आणि राजाराम देसाई यांची मुलगी अनुजाही न्यूयॉर्क शहरातल्या आंदोलनात सामील झाली होती. त्यांच्यासारखे जगभर पसरलेले अनेक भारतीय या आंदोलनात सामील झालेत. हे आंदोलन आता जगभर पसरेल. पण भारतात मात्र त्याची साधी दखलही घेतली जात नाहीय. याचं कारण काय असावं?

जगात कुठेच नसेल अशी जातीव्यवस्था भारतात आहे. गेली कित्येक शतकं ती हटवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न करुन झाले. पण लोकांच्या मनातली जात काही जात नाही. अगदी धर्मांतर केलेले लोकही धर्मांतराच्या आधी ज्या जातीत होते त्याच जातीत आजही विवाहादी व्यवहार करतात. त्यामुळे श्रेष्ठकनिष्ठतेचे जातीधर्मावर आधारित निकष समाजात अगदी मुरलेले आहेतच. पण वर्णभेदावर आधारित निकषही समाजाच्या मनात खोलवर दडलेले आहेत.

गोऱ्या रंगाचं आपल्या समाजाला प्रचंड आकर्षण. शुभ्र असलेलं सगळं काही सुंदर, पवित्र असाच आपल्याकडे समज असतो. मुलगी जन्माला आली तर लोकांना दुःख होतंच पण ती जर रंगाने सावळी असेल तर त्या दुःखात फार वाढ होते. एखादी व्यक्ती रंगाने काळीसावळी असेल तर तिला शाळेत, शेजारीपाजारी काळू म्हणून हिणवलं जातंच, पण अगदी नोकरीसाठी मुलाखतीतही दिसणं महत्त्वाचं ठरतं. (संध्या नावाच्या सावळ्या मुलींना “संध्या काळी संध्या काळी, संध्या अमुची का काळी” असं गाणं ऐकवलं जाई). त्यामुळे बऱ्याच तरुण मुली गोरेपणा देणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमागे वेड्यासारख्या लागलेल्या असतात. पश्चिम बंगालमधल्या बर्द्वानमध्ये एका प्राथमिक शाळेत यू फॉर अग्ली असं शिकवलं जातंय आणि सोबतच्या चित्रात एक काळीसावळी व्यक्ती दाखवलेली आहे. काळ्या व्यक्तींना कायम या अशा वागणुकीमुळे एक गंड निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीतही अडथळे येतात. एखादी गोरी व्यक्ती असेल तर तिला मात्र गोरेपणाचा फायदा मिळतो. विशेषतः लग्नाळू लोकांच्या जाहिराती पाहिल्या तर त्यात मुलींच्या गोरेपणाला फार महत्त्व असतं आणि त्यापुढे जणू काही गोरी म्हणजेच सुंदर असल्यासारखं सुंदर हे विशेषणंही डकवलं जातं. त्यातून विदेशी गोरी व्यक्ती म्हणजे तर देवच. तिला दरवानही लगेच सलाम ठोकणार, पण तीच जर देशीविदेशी कृष्णवर्णीय व्यक्ती असेल तर तिला सत्राशेसाठ प्रश्न विचारुन मगच प्रवेश मिळणार. शिवाय या सगळ्यात लोकांना काहीही गैर वाटत नाही.

बुटक्या लोकांना ए छोटू, टक्कल पडलेल्या लोकांना ए टकल्या आणि तोतरं बोलणाऱ्यांना हकल्या म्हणणं, ईशान्य भारतीयांना चीनी म्हणणं आणि कृष्णवर्णीयांना कालू म्हणणं यात लोकांना काहीही फरक वाटत नाही.

वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाचा कर्णधार डॅरेल सामीला आणि श्रीलंकेच्या थिसारा परेराला सनराइज हैदराबादच्या आयपीएल चमूतले सहकारी ‘कालू’ म्हणत, तेव्हा त्याला वाटे ते त्याच्या दणकटपणासाठी त्याची स्तुती करणारं काहीतरी संबोधन असावं. पण हसन मिन्हाज या विनोदवीराला ऐकतांना त्याला अचानक कळलं की हे त्याच्या काळ्या वर्णावरुन त्याला खिजवणारं संबोधन आहे. काय वाटलं असेल त्याला तेव्हा जे संबोधन त्याने आपल्याला सहकाऱ्यांनी प्रेमाने वापरलंय असं वाटत होतं त्यामागचं सत्य कळल्यावर? 

एझुगो लॉरेन्स हा चोवीस वर्षीय नायजेरियन विद्यार्थी भारतातल्या आपल्या अनुभवाविषयी लिहितो, “चार वर्षांपूर्वी मी भारतात आलो तेव्हा एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने भारत, त्याचा इतिहास, त्याचा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण विस्तार, वेगवेगळे लोक, तिथलं अन्न, भाषा, संगीत आणि चित्रपट यांचा शोध घेण्यासाठी आलो होतो. मी वर्गात शिरलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्मित होतं. पण या गेल्या वर्षांमधल्या प्रत्येक दिवशी मला वर्णभेदाचा प्रत्यय येत गेला….मी पहिला हिंदी शब्द शिकलो तो म्हणजे कालू. वर्गात, रस्त्यावर, भाजीवाल्याकडे सतत हा शब्द माझ्या कानावर आदळत असतो.” तो पुढे सांगतो की अगदी घरमालकही भाडं घेतांना लांब उभा असतो, भारतीयांच्या आदरातिथ्याविषयी मी खूप ऐकलंय, पण आजवर चहा तर सोडाच पण कुणी मला पाणी घे असंही म्हटलेलं नाही. आमच्यासारख्या लोकांकडे कायम संशयाने पाहिलं जातं.

आता यावर काही लोक म्हणतील की आमचे देव पहा सगळे सावळे किंवा कृष्णवर्णीय आहेत. राम घ्या, कृष्ण घ्या, विठ्ठल घ्या. आम्ही तर त्यांची पूजा करतो. खरंय, पण मग अशी पूजा आपल्या देशाच्या लॉरेन्ससारख्या अतिथीची नाही केलीत तरी चालेल फक्त त्याला माणसासारखं वागवा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का?

ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ही दोन हजार तेरा साली सुरु झालेली चळवळ दलित चळवळ आणि स्त्रीवादी, डाव्या चळवळी या सर्वांना  आपलीशी वाटायला हरकत नाही. कारण ती शतकानुशतके वंचित ठेवल्या गेलेल्या समाजातील व्यक्तींवरील राज्य-पुरस्कृत हिंसाचाराच्या विरोधात, दमनाच्या विरोधात आहे, ती या समाजाच्या व्यक्तींना सर्व प्रकारचा अवकाश मिळावा, त्यांना आनंदाने, सुखाने जगता यावं यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे भारतात या चळवळीला पाठिंबा द्यायला या सर्वांनी एकत्र यायला हवं, तेही लवकर.

सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे भारताबाहेरच्या भारतीयांना मात्र पाश्चात्य देशातल्या वर्णभेदांचा अनुभव आहे, ते सगळं त्यांच्या नजरेसमोर घडतंय, त्यामुळे ते त्याच्याशी जोडले जाताहेत. ती चळवळ त्यांना आपलीशी वाटतेय. काहींचं तर असंही म्हणणं आहे की भारतातही लोकांनी जातीभेदाविरोधात अशा प्रकारे एकत्र यायला हवं. पण इथल्या महान संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांनी लोकांना दिव्याखालचा अंधार दिसू नये याची पुरती सोय केलेली आहे.