काय काय हरवलं?

काय काय हरवलं या कोरोनाच्या काळात मी? बागेच्या वळणावरचा बहावा पूर्ण फुललेला. चाहूल लागताच पळून जाणारी भारद्वाजाची जोडी, निवांत किलबिलत बसलेले बुलबुल. वाटेतल्या बोरांचा रस्त्यावर पडलेला सडा. झाडावरच्या कैऱ्यांचा ताजा वास. कडूनिंबाची सावली. मैत्रिणींशी गप्पा, त्यांचा स्पर्श, त्यांच्या सोबत खाल्लेला खाऊ, त्यांच्या फालतू विनोदांना खिंकाळून दिलेली दाद, बाजूला खेळणाऱ्या मुलांचं हसणंखिदळणंरडणंखेळणंमाऱ्यामाऱ्यापडणं, सोबत फेऱ्या घालणाऱ्या, समोरुन ख्यालीखुशाली विचारणाऱ्या, नमस्कारचमत्कार करणाऱ्या माणसांचा वावर, त्यांच्या घामाचा, अत्त्तरांचा, पावडरींचा वास, त्यांचे वादविवाद, रुसणीफुगणी, रस्त्यावरुन वाहणारी वर्दळ, अगदी अनोळखी माणसंही ओळखीची वाटायला लावणारी, थोडक्यात एक अख्खं जग जिवंत. हरवून गेलंय.