माझ्या उंचीमुळे नेहमीच ‘अटकमटक चवळी चटक, उंची वाढवायची असेल तर झाडाला लटक’ अशा प्रकारचे शेला पागोटे मिळत असत. एकदा बँकेत मी एक घोळ निस्तरल्यावर आमचा आयटीवाला मोठ्या कौतुकाने म्हणाला “But for our chhota madam, that (तो घोळ) would have never been sorted out.” हे छोटेपणही मला नेहमीच चिकटून राहिलं. पण तरीही माझ्या कधी ध्यानात हे आलंच नाही की आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक ‘छोटूं’चं स्वतःचं काही वेगळं नाव असेल. दुकानावर मी छोटूमल आणि कुं. किंवा छोटेलाल ड्रेसवाला अशा प्रकारची नावं पाहिली होती. त्यामुळे ते इतर नावांसारखंच एक नाव असं मी धरून चालले होते. एकदा आमच्या बँकेतल्या एक लिफ्टमनला मी हाक मारली, “छोटू जरा थांबा हं.” तेव्हा एक सहकारी हळूच दुसरीला म्हणाली, “Look, who’s saying chhotu!” तत्क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली. नंतर मी त्याला त्याचं खरं नाव विचारलं तेव्हा ते विजय निघालं. मग मी आवर्जून नाव विचारायला लागले. आमच्याकडे वीजेची कामं करायला येणाऱ्या इलेक्ट्रीशियनला सगळे पिंटू म्हणतात, त्याचं खरं नाव अजय सिंह निघालं. पण कित्येकदा लोक खरं नाव विसरुन स्वतःची ओळख लोकांनी त्यांना दिलेल्या अशा नावानेच करुन देतात. आजही आमचा रद्दीवाला आला होता. मी दार उघडताच म्हणाला, “आंटी, मैं छोटू, छोटू रद्दीवाला.” बायकांना जसं आपल्या गुलामगिरीच्या निशाण्या अंगाखांद्यावर बाळगतांना उमगत नाही तसंच यांचं होऊन जातं.
अधोलोकाने तर हकल्या, चकण्या, टकल्या वगैरे लोकप्रिय करुन टाकलंय. त्याच्याशी गुंडगिरीतून येणाऱ्या सत्तेचा, सामर्थ्याचा प्रत्यय येत असावा बहुतेक. त्यामुळे लोकांना ते वापरायला फार आवडतं.
वजनदार लोक तर कायम हक्काचा विनोदाचा विषय. एकदा एका वाढदिवसाच्या सोहळ्यात अशा प्रकारच्या सोहळ्यांचं संयोजन करणाऱ्या माणसाने जवळ उभ्या असलेल्या एका वजनदार आणि डोक्यावर जरा कमी केस असलेल्या तरूणाला जवळ बोलावून घेतलं. मग पुढचा सगळा सोहळा संपेपर्यंत “यह भाईसाब एक बार पार्क में गये…”असं करीत वेगवेगळ्या प्रकारचे विनोद केले गेले. त्या तरुणालाही मनात नसतांना चेहऱ्यावर हसू बाळगत ते झेलायला लागलं. नंतर त्याला या सगळ्या प्रकाराने समजा नैराश्य आलं तर त्याला कोण जबाबदार हा विचार त्या सोहळ्यात अशा विनोदांवर खळखळून हसणाऱ्या कुणाच्याही मनात आला नसेल का?
एका मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात तर कायम आमच्यासारख्या बुटक्या, वजनदार, कृष्ण वर्णाच्या लोकांची टिंगल उडवली जाते. इतकंच नाही तर ते अधोरेखित करायला पात्रांची नावं किंवा आडनावंही त्यावरून ठेवली जातात. त्यावरुन आठवलं काही लोकांच्या आडनावावरूनही त्यांचा छळ मांडला जातो. आमच्या बँकेत आमच्या एका मित्राचं आडनाव खरं तर हरम असं होतं. पण आमचा एक सहकारी कायम त्याला “ए हराम इकडे ये.” असं म्हणत असे.
आपल्या समाजात आदर्श दिसणारी व्यक्ती कशी असते हे कळण्यासाठी विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तरी कल्पना येईल. माझ्या परिचयातली एक मुलगी दिसायला खरं तर फार सुंदर, उंची, बांधा सगळं छान असं होतं. पण ती सावळी आहे आणि तिला चष्मा आहे हे कळल्यावरच माझ्या एका मैत्रिणीने भविष्यवाणी वर्तवली, “हिचं लग्न जमणं कठीण आहे.” प्रत्यक्षात तिला एका मुलाकडून लवकरच मागणी आली आणि तिचं लग्न झालं ही गोष्ट वेगळी, पण जणू काही अशा लोकांनी लग्नाच्या फंदात पडूच नये असाच लोकांचा आविर्भाव असतो.
मुलींच्या बाबतीत तर नुसतं रंगरुपच नव्हे तर तिच्या अंगावर किती केस आहेत, ते तिने काढलेत की नाही हेही पाहिलं जातं. आमच्या लोकलमध्ये एक तरुण मुलगी असे. तिला मिशा होत्या. तर लोक तिच्याकडे अगदी विचित्र नजरेने पाहत. कुणीही तिच्याशी बोलत नसे. त्या अनुभवामुळे कार्यकर्त्या अनीता पगारे यांनी टाळेबंदीकाळातल्या मिशांबद्दल मोकळेपणी लिहिल्यावर फार बरं वाटलं.
आमचा एक परिचित जरा नाजूक हालचाली करीत असे. तो होता खूप हुशार, कामसू, कुठलंही अवघड काम झटक्यात पार पाडणारा. पण त्याच्या ह्या सगळ्या गुणांकडे दुर्लक्ष करुन त्याच्या हालचालींवरून त्याला चिडवलं जाऊ लागलं. परिणामी तो इतरांशी बोलणं टाळायला लागला. मग त्याला शर्मिला नाव ठेवलं गेलं. पुढे काही मित्रांनी प्रयत्नपूर्वक त्याला माणसात आणलं.
जात, धर्मावरून वाईट वागवलं जाणं तर आपल्या समाजाला मुळीच नवीन नाही. ‘सरकारी जावई’ म्हणून इतरांना हिणवणारे उच्चभ्रू एके काळी वेगळ्या प्रकारे ‘सरकारी जावई’ होते हे मात्र विसरुन जातात. इतर धर्मीयांनाच काय इतर प्रांतीयांनाही नावं ठेवली जातात. ‘नगरी मापं’ ‘मावळी भुतं’ ‘कोकणाटं’ ‘वायदेशी रानदांडगे’ ‘घाटी बरबाट चाटी’ हे वानगीदाखल. एकूण काय तर आम्ही तेवढे सर्वगुणसंपन्न.
दिसणं, प्रांत, जातधर्म ह्या माणसाच्या जन्माआधीच ठरलेल्या, त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींवरून लचके तोडणारी ही जमात कधी नष्ट होणार काय माहीत.